मुंबई : भाजप विरुद्ध उबाठा गटात रंगलेल्या राजकीय संघर्षात आणखी एकदा हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकणार आहेत. ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दहीहंडी उत्सवावरून मुंबईत पुन्हा एकदा राजकीय हंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असून वरळीची हंडी कोण फोडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
गेल्या वर्षभरातील राजकीय उलथापालथींमुळे वरळीत ठाकरेंना हादरे बसले होते. दहिहंडीसह सार्वजनिक उत्सवांचा मुंबईच्या राजकारणावर मोठा परिणाम दिसून आलेला आहे. त्यामुळे शिंदेंच्या बंडानंतर तडे गेलेल्या आदित्य यांच्या वरळीचे आणि उबाठा गटाचे भवितव्य दहिहंडीवरून ठरणार आहे.
गेल्या वर्षी भाजपने मारली होती बाजी
वरळीतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जांबोरी मैदानावर गेल्या वर्षी दहीहंडीचे आयोजन करून भाजपने ठाकरेंना धक्का दिला होता. वरळीत उबाठा गटाचे माजी मंत्री आदित्य ठाकरेंसह सुनील शिंदे आणि सचिन अहिर असे तीन आमदार असूनही दहीहंडीचे आयोजन करण्यात पक्षाला अपयश आले होते. उबाठा गटातील विसंवादाचा फायदा घेत भाजपने राजकीय खेळी करत जांबोरी मैदानावर दहीहंडी आयोजित करत सचिन अहिर म्हणजेच पर्यायाने उद्धव ठाकरेंना तगडा झटका दिला होता. गेल्या वर्षी नाट्यमयरित्या भाजपने या दहीहंडीच्या आयोजनात बाजी मारली होती. उबाठा गटाच्या सचिन अहिर आणि सुनील शिंदे या विधान परिषदेच्या दोन आमदारांमधील अंतर्गत वाद पक्षाच्या मुळावर उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपची परिवर्तन हंडी ; उबाठा गटाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, वरळीतील सुप्रसिद्ध जांबोरी मैदानावर यंदाच्या वर्षीही भाजपच्या वतीने परिवर्तन दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे भाजप नेते दीपक सावंत यांच्यावतीने पोचखान मार्गावर शेतकरी दहीहंडीचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र, दुसरीकडे उबाठा गटाचा कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या वरळीत अद्याप तरी कुठलाही ठोस कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही अशी माहिती समोर येत आहे. भाजपने परिवर्तन दहीहंडीची घोषणा केल्यानंतरही उबाठा गटाच्या दहीहंडी आयोजनावर प्रश्नचिन्ह कायम आहे.