मुंबई : कुसुमाग्रजांच्या अनेक अजरामर कलाकृतींमधील एक अविस्मरणीय कलाकृती म्हणजे 'नटसम्राट' नाटक. या नाटकात एकदा तरी अप्पासाहेब बेलवणकरांची भूमिका करावी किंवा या नाटकाचा लहानसा भाग व्हावा अशी इच्छा प्रत्येक नाट्यकर्मीला असतेच. मात्र, दिवंगत ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना या 'नटसम्राट' नाटकात कधी काम करावेसे वाटलेच नाही. बऱ्याच वर्षांपुर्वी एका मुलाखतीत अण्णांनी अर्थात जयंत सावरकर यांनी याचा खुलासा केला. सोमवार दि. २३ जुलै रोजी जयंत सावरकर यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. २५ जुलै रोजी ठाण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
तर, "कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकाच्या भाषेचा मोह मला खेचत होता. परंतु, त्यातील मुख्य भूमिका जी अप्पासाहेब बेलवणकरांची होती, त्यासाठी लागणारं राजबिंड रुप, शरीरयष्ठी माझ्याकडे नव्हती. कारण, ज्यावेळी अप्पासाहेबांची पत्नी त्यांना बोलते की तुमच्या तरुण वयात अनेक मुली माझ्या सवती असतील. तर ज्या पुरुषाच्या मागे स्त्रियांचा वेढा असेल तो पुरुष किती देखणा असला पाहिजे जो मी नव्हतो. शिवाय ज्यावेळी मी स्वत:ला आरशात पाहायचो त्यावेळी त्या व्यक्तिरेखेला मी शोभून दिसेल का हा देखील विचार करायचो”, असा अण्णांनी नटसम्राट नाटक न करण्याचा किस्सा सांगितला होता.
सात दशकांहून अधिक काळ गाजवणारे अभिनेते..
.
जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी झाला. वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली. आधी रंगभूमी आणि नंतर दूरचित्रवाणी आणि कालांतराने चित्रपट या तीनही माध्यमांतून सावरकर घरोघरी पोचले आणि कुटुंबातील सर्वच पिढ्यातील प्रत्येकाच्याच परिचयाचेही बनले. सुरुवातीची अनेक वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. तसेच, अभिनयाच्या प्रारंभी हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी लहानसहान कामे केली आणि नंतर साहित्य संघाच्या नाट्यशाखेत कार्यरत असताना त्यांनी नाटकांत काम करण्याची मिळालेली संधी सोडली नाही. ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी अविस्मरणीय केल्या. रंगभूमीवरील कलावंतांसाठी आजही दंतकथा असलेले केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना लाभले. इतकेच नव्हे तर आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम आदींच्या दिग्दर्शनाखालीही सावरकरांना रंगमंचावर आपल्या अभिनयाची जादू दाखवता आली. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी, याही नाटकांमधून सावरकरांनी छाप पाडली.