आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार माणूस शारीरिक व मानसिक पवित्रा घेत असतो, त्यातही जेव्हा परिस्थिती त्याच्या आवाक्याबाहेर जाते, तेव्हा तो निरुपयोगी पवित्रा घेतो. आता असा पवित्रा का घेतला जातो? तर माणसाच्या अनुभवातून व पूर्वीच्या घटनांमधून शिकून हा पवित्रा आलेला असतो. उदहारणार्थ- एखाद्या माणसाची जर पूर्वी फसवणूक झाली असेल किंवा जवळच्या माणसाने विश्वासघात केला असेल, तर नंतर त्या माणसाचा सर्वांवरचा विश्वास उडतो व प्रत्येकाकडे तो संशयी नजरेने पाहू लागतो. सर्वांवर संशय घेऊ लागतो.
अशा काही घटना ज्या मनात खोलवर जाऊन रुजतात व त्या घटनांमुळे मनात जे भावनिक बदल होतात, त्या भावनिक बदलांमुळे, मनाची एक विशिष्ट प्रकारची अवस्था तयार होते व या अवस्थेमुळे वर्तमानकाळातील घटनांनासुद्धा हे लोक त्याच भावनेने पाहतात व चुकीचा पवित्रा घेतात. एखाद्या गोष्टीचा पगडा जेव्हा फार मोठ्या कालावधीपर्यंत माणसाच्या मनावर राहातो, त्याच पगड्यामुळे मग प्रत्येक प्रसंगात गरज नसतानाही मग त्याच प्रकारची प्रतिक्रिया दिली जाते. आपण अजून एक उदाहरण पाहू.
माझ्या क्लिनिकमध्ये एक रुग्ण आला. साधारण ५५ वर्षे वयाची ती काश्मीरला राहणारी काश्मिरी पंडित महिला होती. ती लहान असताना काश्मीरमध्ये अतिरेकी व दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला होता. त्या धुमाळीत या महिलेला आपल्या कुटुंबीयांसमवेत अचानकपणे काश्मीर सोडावे लागले. त्यात त्यांच्या काही नातेवाईकांना जीवही गमवावा लागला. सतत ताणतणावाखाली राहिल्यामुळे या स्त्रीच्या मनात खोलवर प्रचंड भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती व त्यामुळे आताही अगदी लहान-सहान आवाजालाही ती घाबरत होती. रस्त्याने चालत असतानाही अजूनही ती सतत मागे पुढे व आजूबाजूला पाहून घाईघाईने चालत होती. लांबून पाहणार्या एखाद्याला असे वाटेल की, या बाईच्या मागे कोणी लागले आहे का किंवा कोणी तिचा पाठलाग तर करत नाही ना? हा जो पवित्रा या स्त्रीने घेतला होता, तो आताच्या काळात पूर्णपणे विसंगत व चुकीचा होता.
परंतु, या बाईच्या मनात जी भीती उत्पन्न झाली होती, त्या भीतीपोटी तिची अशी मानसिक स्थिती तयार झाली होती. त्यामुळेच चुकीचा पवित्रा ती घेत होती. अशी प्रतिक्रिया का येत होती, तर ज्या वातावरणात ती वाढली, त्या अंतर्मनावर खोलवर परिणाम झाला व हेच या भीतीचे मूळ कारण झाले. ज्यालाच आपण ’Root cause’ असे म्हणतो. याच मूळ कारणामुळे जी स्थिती तयार होते, तीच सर्व लक्षणे व चिन्हे दाखवत असते आणि आधीच्यास्थितीशी जराही साम्य असलेली दुसरी स्थिती जर निर्माण झाली, तर मग अशी वेगळ्याप्रकारची प्रतिक्रिया जशी प्रतिक्षिप्त क्रिया आपल्याला पाहायला मिळते. याच प्रतिक्षिप्त क्रियेचा अभ्यास होमियोपॅथीत केला जातोे, जो इतर शास्त्रांमध्ये क्वचितच पाहायला मिळतो. होमियोपॅथिक डॉक्टर म्हणूनच रुग्णाच्या मानसिक स्थितीचा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा अभ्यास करून लक्षणे व चिन्हे कुठल्या मूळ कारणापासून (Root cause) तयार होत आहे, याचा शोध घेतात व त्याचा अॅनालिसिस करतात. याचं मूळ कारणाचा अजून अभ्यास आपण आता करणार आहोत. (क्रमश:)
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६