मुंबई : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात बांगलादेशी घुसखोरांनी शासकीय योजनेत घुसून लाभ उठवल्याचा प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी करून बांगलादेशातून आलेल्या रहिवाशांनी बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने या प्रकारची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. ठाकरे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात हा प्रकार घडल्याने बांगलादेशी घुसखोरांना मिळणाऱ्या राजकीय पाठबळाची प्रचिती आली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मौजे डिगज गावातील १०८ बांगलादेशी नागरिकांनी अर्ज दाखल करून लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमुळे हा प्रकार घडल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
दरम्यान, बांगलादेशी घुसखोरांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदरील प्रकारची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कुडाळच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेष करून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनानेच 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली आहे.