हरवलेले वैश्विक स्वास्थ्य - आरोग्यपूर्ण जीवन : जनतेचा अधिकार

    06-Apr-2023
Total Views | 84
Global Health
 
आज दि. ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य व्यवस्था, आहार व्यवस्था, अन्नधान्य उत्पादन, साठवणूक व वितरण व्यवस्था यात आमूलाग्र सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करून, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरण, शुद्ध, भेसळमुक्त नैसर्गिक अन्न व खाद्यपदार्थ यांची वाजवी दरात उपलब्धता करून, त्या आधारे पर्यावरणस्नेही निरोगी जीवन जगण्याच्या आपल्या अधिकाराची जपणूक देशोदेशीच्या शासनकर्त्यांनी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला भाग पाडण्याची मागणी जनतेने केली पाहिजे.

आजच्या धावपळीच्या ताणतणावयुक्त जीवनशैलीमुळे मनुष्याला आपले व आपल्या कुटुंबीयांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. त्यात भर म्हणून महिला, मुलांना, आरोग्यास घातक असे कृत्रिम रंग इत्यादी रासायनिक पदार्थ वापरून बनवलेले, मीठ-तेल-साखर यांचे अतिरिक्त प्रमाण असलेले पाकीटबंद, डबाबंद खाद्यपदार्थ व बाटलीबंद पेये, शक्तिवर्धके, सौंदर्यप्रसाधने यांच्या भ्रामक जाहिरातींद्वारा भुलवून, वापर करण्यास भाग पाडले जाते. यामुळे आरोग्याच्या नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. बैठे काम, व्यायामाचा अभाव, जंक फूड-बाहेरचे गाडीवरचे खाद्य सेवन, जागरण हेही आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत होत आहेत.आजची आरोग्यसेवा ही सेवा राहिली नसून, जनतेच्या आरोग्याशी काही देणेघेणे नसलेला, कोणत्याही टोकाला जाऊन, नीतिनियमांची पायमल्ली करून प्रचंड नफा कमावणारा एक धंदा झालेला आहे. जनतेने मोठ्या कष्टाने मिळवलेला पैसा महागड्या रासायनिक औषधांवर, शक्तिवर्धकांवर खर्च करूनही व्याधीमुक्त निरोगी जीवन जगता येत नाही, ही आजची परिस्थिती. त्यामुळे सामान्य माणूस आज हवालदिल व संभ्रमित झाला आहे, गांजला आहे.

खरं म्हणजे मूल जन्मल्यापासून जर मातेने स्तनपान दिले, शैशवाच्या काळात आवश्यक त्या रोगप्रतिबंधक लसी दिल्या, साध्या सर्दी-खोकला-तापासाठी उठसूठ डॉक्टरकडे न धावता, प्रादेशिक, पारंपरिक, नैसर्गिक, घरगुती औषधे व शक्तिवर्धके, गाईचे (शक्य झाल्यास देशी गाईचे) पाश्चराईझड दूध, घरातल्या ज्येष्ठांच्या सल्ल्याने दिल्यास, पुढे वाढत्या वयात व पौगंडावस्थेत मैदानी खेळ, सूर्यनमस्कार, योगासने व घरगुती पौष्टिक आहार व फळे, सुकामेवा असा सकस व पौष्टिक आहार दिल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढून मुले शारीरिक, बौद्धिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ व निरोगी होण्यास मदत होते, असा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे.तरुणांनी आपल्या नोकरी-व्यवसायानुसार आपली जीवनशैली आखल्यास व त्यात व्यायाम, योगासने, ध्यान, सीमित व नैसर्गिक घरगुती आहाराची सवय, शिस्त व विश्रांती-झोपेची जोड दिल्यास आरोग्य चांगले राहते, हा आजच्या काळातला अनुभव आहे. अमली पदार्थ व धूम्रपान यापासून मात्र दूर राहायला पाहिजे.

बालपणापासून केलेली आरोग्यसाधना वृद्धावस्थेत, जीवनशैलीत किरकोळ बदल करून आनंदी, निरोगी व उत्साही जीवन जगण्यास मदत करते. तरुणपणापासून मात्र व्यसनांपासून दूर राहणे अत्यावश्यक आहे, हे ध्यानात ठेवावे. वृद्धावस्थेत हलका चालण्याचा व्यायाम, भुकेच्या दोन वेळा ओळखून हलका, सहज पचेल, असा आहार घेणे, विश्रांती घेणे, आध्यात्मिक साधना करणे व नियमित आरोग्य तपासणी करणे जरुरीचे. या सर्वाचा अर्थ म्हणजे मन मारून जगणे, असा नाही; तर कोणतीही गोष्ट अतिरेक, व्यसनाधीनता टाळून केल्यास व थोडा संयम पाळून, पचनसंस्था मजबूत ठेवून सदाचारी आचरण ठेवल्यास जीवनाचा आनंद घेता येतो, असा अनेकांचा अनुभव आहे. भारतीय आहार, वैदिक धर्माधारित जीवन पद्धती व भारतीय शास्त्रे यांचे सकल सृष्टीच्या स्वास्थ्यासाठी असलेले महत्त्व आज अमेरिकेसारख्या देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेल्या प्रयोग व संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधाराने सिद्ध झाले आहे. त्यामुळे युरोप-अमेरिकेत आता सेंद्रिय खते वापरून पिकवलेले ’ऑरगॅनिक फूड’ (सेंद्रिय अन्न) यांचे प्रस्थ वाढत चालले आहे व योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचाही समावेश जीवनशैलीत होत आहे.

आरोग्याच्या अनेक समस्या मुख्यत्वेकरून चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या आहारामुळे निर्माण होतात. पण, आज आहाराव्यतिरिक्त सभोवतालच्या अनेक गोष्टी ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत. उदा. प्रदूषण, मानसिक ताणतणाव, भेसळयुक्त अन्न व रसायनयुक्त खाद्यपदार्थ व औषधे इत्यादी गोष्टी ही आपल्या आरोग्यविषयक समस्या वाढवत आहेत. या गोष्टींना शासनकर्त्यांनी आवर घातल्यास आपल्याला चांगले आरोग्य लाभू शकते. त्या गोष्टी अशा:

  • कृत्रिम रासायनिक खतांचा अतिरेकी वापर. यामुळे जमिनीचा कस कमी होत असून, जमिनीतले उपयुक्त जीवाणू नष्ट होत आहेत. या खतांचा अंश अन्नावाटे पोटात गेल्यास आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे अजून माहीत नाही. यासाठी नैसर्गिक शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, जीवाणूयुक्त खत अशा खतांवर प्रयोग व संशोधन करून पीकवाढीसाठी उपयुक्तता सिद्ध झाल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून रासायनिक खतांवर नियंत्रण हे उपाय केले पाहिजेत.
  • कृत्रिम रासायनिक विषारी कीटकनाशकांचा अतिरेकी व अवेळी वापर केल्यामुळे निसर्गातले उपयुक्त जीवाणू, पशू-पक्षी नाश पावत असून, निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. यांचा अंश पोटात गेल्यास काय होऊ शकते, हे कीटकनाशक पिऊन आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या उदाहरणावरून दिसू शकते.
  • मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड रोखून, बिनविषारी साप (उंदीर, घुशी खाणारे) बेडूक, सरडे(कीटक खाणारे) व काही पक्षी (उडत्या टोळासारखे कीटक खाणारे) अशा जीवांची हत्या न करता त्यांच्या नैसर्गिक वाढीला प्रोत्साहन दिल्यास ते विषारी कीटकनाशकांना पर्याय ठरू शकतात. नैसर्गिक कीटकनाशके (कडुलिंब, तंबाखू, करंजी तेल इत्यादी)यांच्या धान्य साठवणीसाठीच्या प्रभावी वापराचाही विचार व्हावा.
  • फळे लवकर पिकावी किंवा पिकल्यासारखी दिसावी यासाठी व त्यांना सुंदर रंग यावा, यासाठी ‘कॅल्शियम कार्बाईड’सारखी ‘इथिलिन’ हा विषारी गॅस निर्माण करणारी रसायने वापरली जातात. त्यांचा आरोग्यावर होणार्‍या परिणामांचा सखोल अभ्यास होणे जरुरीचे आहे.

  • मोठ्या घाऊक प्रमाणावर फळे पिकवण्यासाठी नवी नैसर्गिक, सुलभ व सुरक्षित पद्धत शोधून काढावी.


  • मांस वाढवून लवकर नफा कमवण्यासाठी ‘पोल्ट्री फार्म्स’मध्ये ‘ब्रॉयलर’ चिकन मोठ्या प्रमाणात वाढवून विक्री केली जाते. आज जगभरात ‘ब्रॉयलर’ चिकन खाण्यासाठी वापरले जाते. अंडी देणार्‍या कोंबड्या व अंड्यांना फलित करणारे कोंबडे हे वेगळ्या फार्ममध्ये वाढवले जातात. अमेरिकेत कोंबड्यांचे मांस वाढवण्यासाठी ’हार्मोन्स’ किंवा ‘स्टिरॉइड्स’चा वापर करण्यास बंदी आहे. (पूर्वी यांचा वापर केल्याने स्त्रियांना मिशा फुटल्याचे व पुरुषांचे स्तन वाढल्याचे निदर्शनास आले होते. ‘स्टिरॉइड्स’चा वापर केल्याने मनुष्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे आढळले होते.) भारतातली आजची परिस्थिती काय आहे, माहीत नाही. कोंबड्यांच्या खाण्यातही प्रतिजैविके बनवणार्‍या कारखान्यातील कचर्‍याचा वापर केला जातो, असे समजते. ‘ब्रॉयलर’ कोंबड्यांचे मांस खाणार्‍यांच्या प्रजनन क्षमतेवर व रोगप्रतिकारक शक्तीवर काय परिणाम होतो, याचा शोध घेणे गरजेचे आहे. कोंबड्यांचे मांस वाढवण्यासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे.


  • गाई-म्हशींनी आजच्या काळात निरुपयोगी असलेल्या नर वासरांना जन्म देऊ नये म्हणून काही इंजेक्शने दिली जातात (असे ऐकिवात आहे) किंवा नवजात नर वासरांची हत्या करून त्यांचे मांस विकले जाते, तसेच वासराच्या जन्मानंतर भरपूर दूध द्यावे व त्यातला बराचसा भाग विकता यावा, यासाठी (दूध उत्पादन वाढीसाठी) काही बंदी असलेली कृत्रिम इंजेक्शने (ऑक्सिटोसिन) व कृत्रिम रासायनिक औषधे दिली जातात का, याचा शोध घेऊन अशा गाईंचे दूध पिणार्‍या बालकांच्या आरोग्यावर किंवा मनुष्याच्या प्रजननक्षमतेवर काही परिणाम होतो का, याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. परिणाम होत असल्यास त्वरित कारवाई करणे महत्त्वाचे.


  • दूध वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधून देशी गाईचे पालन व त्यांचे दूध उत्पादन वाढवणे, हे व परदेशी जर्सी जनावरे पाळण्यास प्रोत्साहन न देणे, हे उपाय योजले पाहिजेत. तसेच नरांचा (बैलांचा) शेण, मूत्रखत निर्मितीसाठी व काही संयंत्रे चालवण्यासाठी वापर करावा. थोडक्यात, गोसंवर्धन करणे महत्त्वाचे.


  • गाई-म्हशींचे दूध वाढवण्यासाठी नैसर्गिक चारा व इतर उपायांचे प्रयोग व संशोधन करणे गरजेचे. गोमूत्राच्या औषधी गुणांवरही अधिकृत संशोधन होणे सर्वांच्या हिताचे ठरेल. गोहत्येवर बंदी घालून, भाकड गाईंना मोकाट न सोडता, गोशाळेत ठेवून त्यांचा शेणखत, गोबर गॅस इत्यादींच्या उत्पादनासाठी वापर करता येईल.

  • घातक कृत्रिम रासायनिक औषधे व घातक रसायने वापरलेल्या खाद्य व पेयपदार्थांच्या जाहिराती व विक्रीवर नियंत्रण ठेवून, नैसर्गिक, भेसळमुक्त औषधे, खाद्यपदार्थ व पेये (लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळ पाणी) यांच्या उत्पादन व विक्रीला प्रोत्साहन द्यावे.

  • खेळाडू, मॉडेल्स व महिला यांना कृत्रिम रासायनिक औषधे व सौंदर्य प्रसाधने वापरण्यास व जनतेलाही कृत्रिम सौंदर्य प्रसाधने वापरण्यास जाहिरातींद्वारे प्रोत्साहन देण्यास मनाई करून नैसर्गिक शक्तिवर्धके व सौंदर्यप्रसाधने वापरण्यास प्रोत्साहित करावे.


  • घातक गर्भनिरोधक, गर्भपात गोळ्यांची पुनर्तपासणी करून, त्यांच्या उत्पादन व निर्मितीवर निर्बंध आणावे.


  • शिशु, बालके व मुले यांच्यासाठी बेबी पावडर इ.चा वापर टाळावा. स्तनपान, देशी गाईचे दूध, फळे, सुकामेवा, घरगुती, पारंपरिक पौष्टिक खाद्य पदार्थ देण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करावे. मुलांना चॉकलेट, पाव, केक, नूडल्स, पास्ता, चायनीज पदार्थ, पाकीटबंद पदार्थ, आईस्क्रीम सतत देण्याचे टाळून, त्यांना चणे, शेंगदाणे, शिरा, उपमा, पोहे, चुरमुरे या खाण्याची आवड निर्माण करावी.


  • मुलांवर रामरक्षा, मारुती स्तोत्र, मनाचे श्लोक यांचे पठण पाठांतर करून घेऊन त्यांच्यावर सदाचाराचे संस्कार करावे.


  • मुलांना लहानपणापासून स्वच्छतेची, शिस्तीची,पर्यावरणस्नेही आचरणाची सवय लावावी.


  • अन्न व खाद्यपदार्थांत भेसळ करणार्‍यांना मनुष्य वधाच्या कलमाखाली शिक्षा देण्याची तरतूद करावी व कठोरतेने अंमलात आणावी. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला आवश्यक ते सर्व साहाय्य पुरवावे.


  • हवा, पाणी व जमीन यात प्रदूषण व ध्वनिप्रदूषण करणार्‍यांना कठोर शिक्षा व त्याची पारदर्शी अंमलबजावणी, त्यासाठी प्रदूषण मंडळाला प्रशिक्षित मनुष्य बळ व आधुनिक साधने देऊन, त्यांच्या प्रशिक्षण व साधनांच्या दुरुस्ती देखभालीसाठी निधी व इतर सोई पुरवाव्यात.


  • बंदी असलेली व मुदत संपलेली औषधे, घातक प्रदूषण करणारे भंगार व इलेक्ट्रॉनिक भंगार परदेशातून भारतात पाठवण्यास कठोर निर्बंध घालावे.


  • महाभारत काळात दीर्घायुषी योद्धे वृद्धावस्थेतही महायुद्धात भाग घेण्याइतके सक्षम होते ते कशाच्या बळावर व कोणत्या जीवनपद्धतीमुळे याचा शोध घेतला तर वैदिक धर्माधारित शास्त्रोक्त आहार व जीवनशैलीचे महत्व जगाला पटेल.


मानवासहित सकल चराचर विश्वाचे स्वास्थ्य जपण्यासाठी आपल्या प्राचीन धर्म संस्कृतीनुसार आधुनिक काळाला अनुसरून नवी नैसर्गिक आहारपद्धती व त्यानुसार जीवनशैली निर्माण करण्यात भारत सरकारने पुढाकार घेणे, ही काळाची गरज आहे व ते आपले दायित्व आहे.जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आरोग्यपूर्ण स्वस्थ जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा!



-ज्ञानचंद्र वाघ



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121