नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी जुम्म्याच्या दिवशी मंदिरावर दगडफेकीची घटना घडली आहे. बंगालमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवरही हल्ला झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे, हिंदू मुस्लिमांच्या वस्तीत गेलेच का, असा सवाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हिंदूंना विचारला आहे.
बंगालच्या हावडा येथील शिवपूर येथे रामनवमीच्या मिरवणुकीत गुरुवारी मुस्लिमबहुल परिसरात छतावरून दगडफेक झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा हिंसाचार भडकला. आजूबाजूच्या हिंदूंच्या घरांवर हल्ले झाले असून दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरएएफला पाचारण करण्यात आले आहे.
या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करून विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांची याचिका मान्य करण्यात आली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. एनआयए चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. या हिंसाचारासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे. त्याचप्रमाणे तृणमूलचे गुंड आणि देशविरोधी शक्ती या घटनेत सामील असून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आल्याचेही ते म्हणाले आहेत.
या हिंसाचारासाठी ममता बॅनर्जी यांनी भाजपला जबाबदार धरले आहे. श्रीरामनवमीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी हिंदूंना मुस्लिम भागात न जाण्याचा सल्ला दिला होता. हा रमजानचा महिना आहे, अशा परिस्थितीत मुस्लिम भागात रामनवमीची मिरवणूक काढू नका. तरीदेखील मिरवणूक काढल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा बॅनर्जी यांनी दिला होता.
दरम्यान, श्रीरामनमवीच्या दिवशी प. बंगालसह गुजरातमधील वडोदरा येथील फतेहपुरा आणि कुंभारवाड्यातून जाणाऱ्या दोन मिरवणुकांवर दगडफेक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे कर्नाटकातील हसन येथील मशिदीजवळ रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राज्यपालांशी चर्चा
शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याशी चर्चा करून हावडा येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यापूर्वी अमित शाह यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांच्याशी फोनवर बोलून कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती घेतली होती.