राम म्हणजे कोण? तर, ‘रमयती सर्वान्.’ जो सर्वांना रमवतो, आनंद देतो तो राम. याच अर्थाला धरून राम शोधू म्हटलं तर जी गोष्ट वा जे काम आपल्याला परमोच्च समाधानाचा आनंद देतं ते काम म्हणजेच राम. अरे वा, खूप सहज कळला की राम आपल्याला असं मनाला वाटू लागतानाच मग ‘रामराज्य आणणं’ वा ‘रामासारखं राज्य’ करणं इतकं कठीण का जात असावं माणसाला, हा प्रश्न मनात येतो. याचं उत्तरही फार कठीण असं नसतंच. आपलं शरीर, शक्ती, मन, बुद्धी, विचार हे सगळं नीती आणि विवेकाने वापरणं कर्मकठीण आणि म्हणूनच राम मिळणं कठीण आणि रामराज्य दुरापास्त!
रामगावा
राम घ्यावा
रामजिवीचा विसावा...
रामदास स्वामींनी हे म्हणून ठेवलंय. यातला ‘राम घ्यावा’ हा जो भाग आहे, तो साधायचा प्रवास म्हणजेच आयुष्य असावं. रामाची स्तुती भजन, कीर्तन, प्रवचन हे आपण करतो व ऐकत असतोच. त्यायोगे राम भजतोही सहजच, येता जाता. पण, राम घ्यावा म्हटलं, तर किती कठीण असेल नाही का? आणि मुळात हा राम कसा घ्यायचा?
सुखात जगणं अवघड नाही, पण आनंदात जगणं मात्र अवघड. किती पटकन आनंद मावळू शकतो आपला! नुसती त्या अमक्याने माझ्यापेक्षा मोठी गाडी घेतली तरी माझ्या काल आलेल्या नव्या कोर्या! गाडीचा आनंद झटक्यात मावळून जातो. गाडीचं सुख आहे तिथे असतंच, पण आनंद मावळला की नाही. दुसर्याझचं चांगलं मला खपतच नाही, हा केवढा मोठा रोग खरंतर! कबूल करा वा न करा, आपल्यातला हरएकजण या रोगाने कमी जास्त प्रमाणात पछाडलेला आहेच!
म्हणूनच श्रीराम चरित्रातला असाध्य वाटणारा भाग म्हणजे राम घेणे आणि ओढ लावणारा पण तरीही अप्राप्य असा भाग म्हणजे ‘रामराज्य.’ रामाची कथा बालपणापासून गोष्टीरूपाने आपण ऐकलेली व वाचलेली असतेच. त्यानंतर कळत्यावयात आल्यावर, ‘रामाची सीता कोण’ ही म्हणही आपल्यावर येऊन आदळते आणि समजुतीपरत्वे तिचा अर्थही कळून जातो. मग कधीतरी ‘कबीराचे विणतो शेले’ या गाण्यातून भक्तीत भिजलेला राम आपल्याला भेटून जातो.
महाराष्ट्रातील मराठी कुटुंबात जर तुमचा जन्म झाला असेल, तर गदिमा आणि बाबूजींनी ‘गीतरामायण’ नावाचा अजरामर असा ठेवा आपल्याला दिला आहे हे लक्षात येतं. मी ही त्याला अपवाद नाही. स्वये श्री रामप्रभू ऐकतीपासून सुरू झालेली ‘गीतरामायणा’ची मोहिनी एकदा तुमच्या मनावर चढली की तुम्ही त्या तारेत आयुष्य घालवू शकता. या संपूर्ण ‘गीतरामायणा’तून श्रीराम जणू आपल्यापुढे प्रत्यक्ष उभे राहतात.
अथ:पासून इतिपर्यंत रामकथा जाणून घेताना माझ्या अल्पमतीला श्रीरामाचा जो गुण ठळकपणे लक्षात आला आणि भावलाही तो गुण म्हणजे परिस्थितीचा स्वीकार करणे. 14 वर्षांच्या वनवासाच्या रूपाने जेव्हा श्रीरामांसमोर कठीण परिस्थिती उभी राहिली तेव्हा सगळ्यात आधी त्यांनी काय केलं असेल तर आहे ती परिस्थिती स्वीकारली.
त्यांनी हे स्वीकारलं की, आपले वडील असं असं वचन कैकयीमातेला देऊन बसले आहेत आणि आता त्या वचनपूर्तीचा क्षण आलेला आहेजी, आपल्याला करावी लागणार आहे. त्यामुळे कुठलाही त्रागा करून न घेता उलट आपल्या वडिलांची आणि प्रजाजनांची समजूत घालून राम वनवासाला बाहेर पडले आणि पुढे वनवासाचा काळ पूर्ण होईपर्यंत जे काही घडलं ज्याला आपण ‘रामायण’ असे म्हणतो. त्या प्रत्येक वेळी श्रीरामांनी केलेला परिस्थितीचा स्वीकार आधी दिसून येतो आणि हीच गोष्ट श्रीरामांकडून मला घ्यावीशी वाटते.
परिस्थितीचा स्वीकार करणे म्हणजे हार मानणे, असा त्याचा अर्थ आहे का? तर अजिबातच नाही. परिस्थितीचा स्वीकार हा शांत डोक्यानेच करता येतो, जे कलियुगात आपल्यासाठी महाकठीण असले तरी अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र, स्वीकारानंतरच आकलन आणि त्यानंतर मात या पायर्यार येतात, हे विसरून चालणार नाही.
अर्थातच, श्रीरामांचा आदर्श आपण घेऊ शकतो. आपली तुलना काही त्यांच्याशी होऊ शकत नाही, हे मनोमन कळलं की समोर येणार्याा प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढायला श्रीराम साहाय्य करतात.
श्रीरामांशी जोडून घेणे यामुळेही सोपे होते की, आपल्यासारखेच तेही गोतावळ्यात अडकलेले होते. राजा दशरथाचा लाडका राजपुत्र, कौसल्येचा राम, कैकयीसारख्या सावत्र आईचाही अनादर कधी करत नाही. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नसारख्या अनुजांचा ज्येष्ठ बंधू असलेला श्रीराम, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकिर्तीचा ज्येष्ठदीरही होता. ‘निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता’ असं म्हणणार्याि सीतेचा तो एकपत्नी, एकबाणीव्रती पती होता. हनुमानासारखा शक्तिशाली योद्धा त्याचा दास होता आणि या सगळ्याहूनही वरचढ जी भूमिका श्रीरामाने निभावली आणि ती निभावताना जीवनातली सगळ्यात मोठी सत्वपरीक्षाही दिली, ती भूमिका म्हणजे अयोध्येच्या राजाची भूमिका. लाखो-करोडो प्रजाजनांचे डोळे ज्या आशेने त्यांच्याकडे बघत होते ती आशा म्हणजेसुद्धा श्रीरामांच्या पुढे उभी टाकलेली कठीण परिस्थितीच होती, ज्याचा स्वीकार त्यांनी केला, मग आकलन केलं आणि मार्गही काढला.
संसाराच्या, गोतावळ्याच्या भवसागरात अडकलेल्या आपल्यापुढेही अनेकदा आपली काहीही चूक नसताना ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी परिस्थिती उभी राहते. आर्थिक, शारीरिक, मानसिक, भावनिक यापैकी कुठलीही पिळवणूक झालेली नाही, असा माणूस विरळाच. याचवेळी ‘दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या गदिमांच्या ओळींतून श्रीराम आपल्याला भेटतात आणि आधी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार कर तरच पुढचा मार्ग दिसेल, असं सांगतात. मला भावलेला श्रीराम हाच. परिस्थितीचा स्वीकार करणारा मात्र परिस्थितीवश न होणारा.
जय श्रीराम
- शिवानी गोखले