"कोमसाप" खोपोली शाखेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन.
28-Feb-2023
Total Views | 62
खोपोली: मायबोली मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न असा इतिहास आहे. भाषेची व्यक्ती, समाज व संस्कृती घडवण्यात महत्त्वाची भूमिका असते. लहानपणापासूनच नव्या पिढीत भाषेचे योग्य संस्कार आपण केले, त्यांच्या भाषा विकासाला योग्य दिशा दिली तर नवी पिढी भाषेबाबत सजगता होईल. सदृढ अशी नवी पिढी त्यातून घडेल. दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या वैभववासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा के एम सी महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. भाऊसाहेब नन्नावरे यांनी व्यक्त केली.
कोकण मराठी साहित्य परिषद खोपोली शाखेच्या अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री उज्वलाताई दिघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात पत्रकार नितीन भावे, वसंत देशमुख मेमोरियल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष उल्हासराव देशमुख, के.एम.सी. महाविद्यालयाचे डॉ.भाऊसाहेब नन्नवरे, अल्टा लॅबोरोटरीजचे जनरल मॅनेजर बी.एस.म्हात्रे यांनी उपस्थित रसिकांशी भाषा दिनाच्या निमित्ताने संवाद साधला.
मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठकार 'कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर' यांचा जन्मदिवस 'मराठी राज्यभाषा दिन' म्हणून सर्वत्र साजरा होतो. कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा सर्वच क्षेत्रात कुसुमाग्रजांनी दिलेल्या साहित्यिक योगदानाची नोंद घेत मराठी भाषा व साहित्यातील त्यांच्या कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरोद्गार काढले. नितीन भावे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'बालविभाग' आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन यावेळी गौरवण्यात आले.
'कोमसाप' बालविभागाचे प्रमुख प्रकाश राजोपाध्ये, शाखेच्या उपाध्यक्ष सुधा इतराज, कार्यवाह जयश्री पोळ, कार्याध्यक्ष वामनराव दिघे, निशा दळवी, जिल्हा प्रतिनिधी कवयित्री रेखा कोरे, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनिलकुमार रानडे, चौक कोमसाप शाखेचे अध्यक्ष यशवंत सपकाळ, डॉक्टर अस्मी सावरेकर, शाखेतील सर्व कार्यकारणी सभासद, पदाधिकारी, मराठी भाषा प्रेमी रसिक श्रोते, विद्यार्थी व पत्रकार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. के.एम.सी. महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी प्रथमेश धायगुडे यांनी 'मराठी भाषेचे वैभव' या विषयावरील भाषणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. कोमसापच्या सदस्यांनी स्वागत गीत व 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे गौरव गीत यावेळी सादर केले. प्रकाश राजोपाध्ये यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमाची भूमिका विशद केली. कवयित्री रेखा कोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मधुमिता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.