आत्मार्पण आणि आत्महत्या

यांत कांहीच का फरक नाही? आहे म्हणावा तर नाही आणि नाही म्हणावा तर आहे!

    25-Feb-2023
Total Views | 275
Savarkar

आज २६ फेब्रुवारी... स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी याच दिवशी १९६६ साली प्रायोपवेशन करून मुंबई येथे देह ठेवला. म्हणूनच या दिवसाला ‘आत्मार्पण दिन’ असेही संबोधले जाते. परंतु, सावरकरांच्या ‘आत्मार्पणा’लाही ‘आत्महत्या’ असे सरसकट संबोधून आजही पुरोगामी कंपूतून याविषयी अपप्रचार अन् समाजात गैरसमज पसरविण्याचे उद्योग केले जातात. तेव्हा, नेमके सावरकर यांचे ‘आत्मार्पणा’विषयीचे विचार त्यांच्याच शब्दांत जाणून घेण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. ‘केसरी-मराठा’ संस्थेच्या मालकीचे असलेल्या ‘सह्याद्री’ या मासिकात १९६४ साली, म्हणजे आत्मार्पणाच्या ठीक दोन वर्षांपूर्वी खुद्द सावरकरांनीच एका प्रदीर्घ लेखातून ‘आत्महत्या’ आणि ‘आत्मार्पण’ या दोहोंमधील तफावत अगदी स्पष्ट शब्दांत विषद केली होती. तेव्हा, आज सावरकरांच्या आत्मर्पणदिनानिमित्त दस्तुरखुद्द सावरकरांचेच याविषयीचे हे तात्विक चिंतन...

धन्योऽहम्। धन्योऽहं कर्तव्यं मे न विद्यते किंचित्। प्राणधन्योऽहम्। धन्योऽहं प्राप्तव्यं सर्वमद्य संपन्नम्॥


व्याधींनी, अपघाताने किंवा अशाच कोणत्यातरी कारणामुळे मरण न येतां, जीव न जातां, जे लोक कोणत्याहि कारणाने जीव नकोसा होउन स्वतःच स्वतःचे मरण स्वतःवरं ओढवून घेतात त्यांनी त्यांनी ’आत्महत्या’ केली असें आपण म्हणतों. पुष्कळ समाजातून तो एक दंडनीय अपराधहि (गुन्हाहि) समजला जातो. ‘आत्मा’ नि ‘जीव’ या शब्दांतील तात्त्विक भेद काय मानला जातो, याची चर्चा येथे न करता, व्यवहारांत आपण होउन आपला जीव देण्याच्या कृत्यास जो वर सांगितल्याप्रमाणे ’आत्महत्या’ शब्द वापरला जातो, त्यांतला तो ‘आत्मा’ हा शब्द त्याच व्यावहारिक अर्थी येथे आम्ही वापरीत आहोत. तथापि कांही प्रकरणी आपण होऊन आपला जीव देणार्‍याच्या, आपल्याच हाताने आपल्या प्राणांचं बळी देणार्‍याच्या कृत्यांना, तीं कृत्ये वरील व्यावहारिक अर्थी ’आत्महत्या’च असतांनाहि त्यांना मात्र ‘आत्महत्या’ न म्हणतां ‘आत्मार्पण’, ‘आत्मविसर्जन’ इत्यादि संस्कृत शब्द योजून तीं कृत्यें प्राचीन कालापासून गौरवार्ह मानली जात आली आहेत. ही भिन्नता कां आली? कांही प्रकारच्या आत्महत्यांना मनुष्यसमाजाने तो एक दंडनीय अपराध न मानतां, त्याला एक पुण्यकृत्य, महनीय कृत्य, गौरवार्ह कृत्य, कां मानलें, त्याचें मर्म आम्हीं येथे दिलेल्या तशा कांही उदाहरणांवरून आपोआपच स्पष्ट होइल. हीं उदाहरणे देताना आमच्या आजच्या परिस्थितीत त्यांच्या विवरणांत कांही त्रुटी राहण्याचा संभव आहे. कारण, वयोमानानुसार आम्ही सध्या वार्धक्य नि व्याधी यांच्यामुळे अंथरुणास खिळून पडलेले आहोत. अशा स्थितींत त्या त्या उदाहरणासंबंधीचीं संदर्भ पुस्तकें पुन्हा एकदा वाचून पाहण्याची शक्ति नाही, इच्छा नाही, आवश्यकताहि वाटत नाहीं. असलेल्या आठवणींवर काय ते विसंबून त्या उदाहरणांचे वर्णन दिलें आहे. त्यांत न्यूनाधिक ज्या कांही फुटकळ त्रुटी असतील त्या वजा घालूनहि त्या उदाहरणांवरून जो अंतिम निष्कर्ष आम्ही काढूं इच्छितों त्याला कांही उणेपणा येणार नाही, ही आमची निश्चिति आहे.
 
 
प्रथमतः प्रख्यात मीमांसक आणि वैदिक कर्मकांडाचे कट्टर पुरस्कर्ते श्री. कुमारील भट्ट यांचे घेउं. वैदिक धर्माचा संपूर्ण पाडाव करूं इच्छिणार्‍या बौद्ध सिद्धांतांचा कोटिक्रमाने उच्छेद करण्यासाठी अगदी बुद्धांच्याच ग्रंथांतून त्या सिद्धांतांचा अभ्यास करावा म्हणून त्यांनी त्रिपिटकादिक बुद्धग्रंथांचा अभ्यास केला. त्यांचे आचार पाळले, तसें बुद्धधर्मीय जीवन जगून पाहिलें. नंतर त्या मतांचा पराजय करण्याच्या आणि त्या आचारांचा फोलपणा दाखविण्याच्या महत्कार्यास हात घातला, मोठमोठ्या वादविवादांच्या सभांतून, प्रवचनांतून प्रचार करीत करीत सार्‍या भारतभर वैदिक मीमांसकांच्या मताची पुन्हा प्रस्थापना केली. शेवटीं आपलें हें मुख्य जीवनकार्य यशस्वीपणें संपलें आहे असें जेव्हा त्यांना वाटले, तेव्हा मग वैदिक धर्माच्या विजयाकरितांच कां होइना पण अवैदिक आणि पाखण्डीय अशा बुद्धधर्मग्रंथांच्या वाचनाचा आणि त्यांच्या आचार-विचारांचा जो अवलंब करावा लागला, त्या पापसंपर्काचें प्रायश्चित्त घेण्यासाठी नैसर्गिक निधन होण्यापूर्वी तुषाराग्नींत स्वतःचा देह भस्म करून घेण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. तीप्रमाणे त्यांनी स्वहस्ते चिता पेटवून तींत प्रवेश केला. पाहतां पाहतां त्या अग्निज्वालांच्या कल्लोळांत त्यांच्या देहाचें भस्म होउन गेले!!\परंतु त्या महान् बलिदानास ’आत्महत्या’ असें न म्हटलें जातां ’अग्निदिव्य’, ’आत्मार्पण’ अशाच शब्दांनी इतिहासांत गौरविलें गेलें आहे.

* * *
दुसरें उदाहरण जगद्गुरु श्री आद्य शंकराचार्य यांचे देतां येइल. अद्वैत मताच्या दिग्विजयासाठी सार्‍या भारतभर संचार करीत ते जेव्हा आसाममध्ये (त्या वेळच्या कामरूपमध्ये) गेले तेव्हा तेथे शाक्त पंथाशीं त्यांचा वादविवाद झाला. त्यांतहि त्यांनी विजयश्री संपादन केली. परंतु शाक्तांतील उग्रपंथीयांना तें सहन न होउन त्यांनी शंकराचार्यांवर विषप्रयोग केला. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला बराच अपाय झाला. तथापि तेथून ते काश्मीरपर्यंत संचार करीत गेले. काश्मीरला जातांच आपल्या दिग्विजयाची पूर्णता झाली असें पाहून आपला चौथा प्रमुख मठ त्यांनी स्थापला. शृंगेरी, द्वारका, पुरी आणि हा काश्मीरचा मठ मिळून चार दिशांस देखील मतप्रचारार्थ चार धामें स्थापण्याचें त्यांचे महत्कार्य असें तडीस गेलें. श्रीशंकराचार्य त्या वेळेस भर तारुण्यांत होते, हें प्रसिद्धच आहे. तथापि एकतर वर उल्लेखिल्याप्रमाणे खचत चाललेली त्यांची प्रकृति, दुसरें की महाभाष्यादि ग्रंथ लिहून आणि वर दिलेलीं चार धामें स्थापून आपलें अवतारकार्य आपण संपूर्ण केलें आहे असें वाटणारें समाधान आणि तिसरे म्हणजे बालवयापासूनच त्यांच्या अंगीं ’यदहरेव विरजेत् तदहरेव प्रव्रजेत्। गृहाद् वा बनाद् वा।’


या त्यांच्या सूत्राप्रमाणे बाणलेली उपजत वैराग्यवृत्ति, या तिन्ही कारणांमुळे ज्या आपल्या जीवनाची अशी संपूर्ण कृतकृत्यता झाली आहे तें एहिक जीवन आता संपवून परब्रह्मीं विलीन व्हावे, अशी त्यांना आतुरता वाटू लागली. ह्यास्तव त्यांनी स्वतः महान् योग्यांच्या पूर्वपरंपरेनुसार गुहाप्रवेश करण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे गुहेंत जाऊन आपण योगासन घालून बसले आणि त्यांच्याच आज्ञेप्रमाणे त्यांच्याच शिष्यांनी एका भल्या मोठ्या शिलेने तें गुहेचें द्वार बंद करून टाकले. याप्रमाणें योगमार्गे जगद्गुरु शंकराचार्यांनी मोठ्या समाधानाने प्राणविसर्जन केलें.आपण होउन न जाणारा जीव बळाने देण्याची क्रिया ही, ज्याला आपण दंडनीय आत्महत्या म्हणतों तींत आणि अशा योगिक प्राणविसर्जनात, आत्मविसर्जनांत, जरी एक सामान्य घटक असला तरीहि जगद्गुरु शंकराचार्यांचा हा गुहाप्रवेश इतिहासांत ’आत्महत्या’ म्हणून उल्लेखिला न जातां ’आत्मार्पण’ ह्या गौरवाह नांवानेंच यथार्थपणें उल्लेखिला जात आला आहे.अशीं योगेश्वरांच्या गुहाप्रवेशाचीं अनेक उदाहरणें आपल्या प्राचीन इतिहासांत सांपडतात. आतां सापेक्षतः अगदीं अर्वाचीन इतिहासांतील अशा कृतकृत्यतेच्या समाधानानेच आपण होउन स्वदेह विसर्जन केल्याचीं, आत्मार्पणाचीं कांहीं उदाहरणे उल्लेखूं.

* * *

’गौरांगप्रभु’ अशा प्रेमादर्शक नांवाने बंगालमधील ज्या वैष्णवाचार्यांची, महाप्रभु चैतन्यांची, कीर्ति भारतभर पसरली आहे त्यांच्या निधनाविषयी अशीच एक कथा सांगितली जाते. श्रीकृष्णाच्या भक्तिसंप्रदायाचा प्रचार करीत करीत हे श्रीचैतन्यप्रभु सामुदायिक भजनांत रंगून मोठमोठ्या नगरयात्रा काढीत तेव्हा त्या भक्तिरसाच्या आनंदांत वाहत जाउन त्या त्या नगरांत सहस्रावधि स्त्री-पुरुष त्याच्यामागे नामाचा गजर करीत चालू लागत आणि भक्तीच्या भावोन्मादांत मार्गामार्गातून नाचत नाचत चैतन्यप्रभु पुढे पुढे चालत. आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत सार्‍या बंगालभर भक्तिसंप्रदायाचा असा उत्कट प्रचार करीत करीत ते शेवटीं जगन्नाथपुरीला गेले. तेव्हा एकदा तेथील सागराच्या तटावर ते सामुदायिक भजन-यात्रेंत चालले असतां त्या सागराच्या सुनील जलाशयास पाहतांच भावावेशांत येऊन घनःशामल श्रीकृष्णाचेंच हें स्वरूप आहे, तो श्रीकृष्णच दिसत आहे, असा उत्कट भास त्यांना झाला आणि त्या स्वरूपास प्रत्यक्ष आलिंगन देण्याकरिता ’हे कृष्ण! हे शाम!! हे शाम!!!’ असा टाहो फोडीत देहभान सुटून त्यांनी अकस्मात् त्या अफाट सागरांतच उडी घेतली. ते आत्मविसर्जन करते झाले! परंतु, या देहत्यागास चैतन्यानं ’आत्महत्या’ केली असें न म्हणतां चैतन्यप्रभूने जलसमाधि घेतली, आत्मार्पण केलें असेंच इतिहास म्हणत आला आहे.
* * *

kesari paper article on savarkar


आपल्या महाराष्ट्रांत श्रीज्ञानेश्वर महाराजांची कथा तर प्रसिद्धच आहे. ह्या अलौकिक विभूतीने अगदी तरुण वयांतच ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’ यासारखे तत्त्वज्ञानाच्या मंदिराचे सुवर्ण कलशच शोभावे असे दोन ग्रंथ लिहिले. आपलें जें अवतारकार्य होतें तें आता संपलें आहे, ह्यापुढे जग त्यांप्रमाणे चालो किंवा न चालो; त्याचें उत्तरादायित्व आपणांवर राहिलें नाही, अशा कृतकृत्यतेच्या जाणिवेने वयाच्या अवघ्या तिशी-पस्तिशीच्या आतच त्यांनी अंतिम समाधि घेण्याचा निश्चय केला. जे जे योगिजन समाधिस्थ होउं शकतात त्यांची ती समाधिस्थ स्थिति अंतिम असते असें नाही. समाधि घेतलेला योगी ती समाधि स्वेच्छेने उतरवूंहि शकतो. पुन्हा व्यावहारिक, संसारिक, जागतिक जागृतींत, इच्छा असल्यास तो येउं शकतो. पण अशी कालावधीची समाधि न घेतां ज्ञानेश्वरांनी ‘यद्गत्वा न निवर्तते तद्धाम परमम् मम्।’ अशा अंतिम समाधीला घेण्याचें ठरविलें.त्यांचे गुरूच असलेले त्यांचे ज्येष्ठ बंधु जे निवृत्तिनाथ त्यांनी स्वतः ज्ञानेश्वरांच्या त्या निर्धारास अनुमति दिली. अनेक संत मंडळींच्या समक्ष, भजनाच्या गजरांत, स्वतःच बांधविलेल्या समाधिस्थानामध्ये कृतकृत्यतेच्या परम समाधानांत श्रीज्ञानेश्वर महाराज उतरले आणि योगासन घालून बसले. स्वतः निवृत्तिनाथांनी त्या समाधिस्थानावर शेवटचा चिरा स्वहस्तें बसविला. अशा प्रकारें ज्ञानेश्वरांनी अंतिम समाधि घेतली.जो जीव बाह्य निमित्ताने जात नाही तो आपला जीव आपण होउन बळाने देणें हें कृत्य, व्यवहारांत ज्याला ’आत्महत्या’ म्हणतात तींत आणि ह्या जिवंतपणीं आपण होउन अंतिम समाधि घेण्यांत उभयसामान्य असतांहि त्याला ज्ञानेश्वरांनी ’आत्महत्या केली’ असें न म्हणतां ‘श्रीज्ञानेश्वरांनी आत्मार्पण केलें, श्रीज्ञानेश्वर समाधिस्थ झाले’ असेंच संत-महंतांपासून तो सामान्य जनतेपर्यंत सर्वोमुखी म्हटले जात आहे.

***

 
तीच गोष्ट समर्थ रामदासांच्या आत्मार्पणाची आहे. प्रस्तुत ‘यवनांचे बंड। हिंदु उरला नाही चंड। बहुता दिसांचे मुंड । शास्ता न मिळे तपासी॥’ अशा परिस्थितीने व्याकूळ होउन त्या यवनांच्या बंडाचा समूळ निःपात करण्याच्या कार्यासच श्रीसमर्थांनी आपलें जीवनकार्य मानलें. महाराष्ट्रांतील हिंदु-समाजांत धर्मयुद्धाची आग पेटवून देण्यासाठी आपल्या तपोबळाने प्रचंड संघटना अभारली. त्याला जोडूनच तिकडे त्याच महान् ध्येयाने प्रेरित होभून श्रीशिवछत्रपतींनी आपल्या शस्त्रबळाने मुसलमानांच्या शहांचीं नि पातशहांचीं तक्ते गदगदा हालवीत जेव्हा प्रत्यक्ष औरंगजेबाच्या छातीवरच रायगडचें स्वतंत्र हिंदुराज्य, हिंदुध्वज नि हिंदुसिंहासन उभारलें तेव्हा हिंदु-जातीच्या त्या महान् विजयाने प्रफुल्लित होउन समर्थ गर्जते झाले

 
स्वप्नीं जें देखिलें रात्रीं तें तें तैसेचि होतसे। बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छ संहार जाहला॥
मांडिलीं मोडिलीं क्षेत्रे,
हिंदुस्थान बळावलें!!


आपल्या प्रतिज्ञेची अशी कल्पनातीत पूर्तता झाली, अशा कृतकृत्यतेच्या भावनेने आपल्या वयाच्या ८०व्या वर्षी समर्थ रामदासांना आपलें अवतारकार्य संपलें असें वाटूं लागलें. इतिक्यांत शिवछत्रपतींचा अंत:काल झाल्याची दुष्ट वार्ता समर्थांना कळली. ’राजे आम्हांला सोडून गेले’ असे शोकाकुल उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. लगोलग संभाजीमहाराजांनी उच्छृंखलपणाने शिवछत्रपतींना अनुकूल असलेल्या अनेक प्रमुख व्यक्तींना बंदींत घातले, कित्येकांना ठार मारलें. स्वराज्यांत भाउबंदकीचा वणवा पेटला. स्वतः संभाजी सज्जनगडाच्या पायथ्याशीं येथून समर्थांना भेटण्यासाठी आग्रह धरून बसला. शिव- छत्रपतींच्या अनेक विश्वासपात्र मंत्र्यांचा ज्याने घातपात केला तो शिवछत्रपतींचे राजगुरूच असलेल्या समर्थांनाहि कांही उपद्रव देण्यास सोडणार नाही, हें उघड दिसत असल्याने समर्थांनी कळविलें की, वयोमानाने आता गडाखाली उतरण्याची शक्ति आमच्यांत राहिली नाही. यास्तव आशीर्वादाचें एक पत्र तेवढें धाडीत आहे. तेंच तें खणखणीत, सणसणीत सुप्रसिद्ध पत्र होय की, ज्यांत समर्थांनी लिहिलें होतें - ‘शिवरायाचें आठवावें रूप। शिवरायाचा आठवावा प्रताप। शिवरायाचा आठवावा साक्षेप। जीवित तृणवत मानावें। कष्टें करूनि घसरावें। म्लेंच्छावरी॥ आहे तितुकें जतन करावें। पुढें आणिक मेळवावें। महाराष्ट्र राज्यचि करावें। जिकडे तिकडे॥’

tarun bharat paper article on savarkar
 

त्याचवेळीं हिंदूंचें स्वतंत्र राज्य स्थापन झाल्याचें एकून चवताळलेला औरंगजेब सार्‍या मुसलमानी शक्ति एकवटून स्वतः मराठ्यांवर चढून येत आहे, अशी बातमी आली. अशा या नवीन संकटाला तोंड देण्याची ज्या अर्थी आपल्या ८० वर्षांवर गेलेल्या वयोमानांत नि व्याधिग्रस्त शरीरांत शक्ति नाही, महाराजांसुद्धा आपली पिढीची पिढी निघून गेली. त्या अर्थी आपले कर्तव्य संपलें, ’अपाधीचे काम असें। कांही साधें कांही नासें॥’ ह्या न्यायाने स्वतंत्र हिंदुराज्य स्थापनेचें जें महान् कार्य पार पडलें तीच आपल्या जीवनाची कृत-कृत्यता ठरावी अशी भगवंताची इच्छा दिसते! आता नवीन पिढीचे प्रश्न, नवीन पिढीच्या कर्तृत्वावर नि भगवंताच्या कृपेवर अवलंबून! असा विचार करून समर्थांनी प्रयोपवेशन करण्याचा निश्चय केला. आपल्या सर्व शिष्यशिष्यिणींना एकत्र करून सांगितलें की, आम्ही आता देह ठेवणार. आमचें अवतारकृत्य संपलें. देहाचें सार्थक झालें. तें एकतांच शोकाकुल झालेल्या आपल्या भक्तांना त्यांनी धीर दिला. ‘जरी माझी वाणी, गेली म्हणाल अंतःकरणीं, तरी मी असे जगजीवनीं, निरंतर’ आणि मार्गदर्शनाविषयी विचाराल, तर हा माझा ‘दासबोध’ मी मागे ठेवतोंच आहे. असे आश्वासून, अचल आसन मांडून, अन्नत्याग करून, रामनामाच्या गजरास समर्थांनी आरंभ केला. अशी कथा आहे की, त्या अखंड नामजपाच्या शेवटीं प्रत्यक्ष श्रीरामांनी समर्थांना दर्शन दिलें. तेव्हा अत्यंत कृतकृत्य भावनेने श्रीरामाच्याच चरणीं समर्थांनी अन्नत्यागाने क्षीणतम झालेला आपला शेवटचा निःश्वास सोडला.
आपल्या जीवनाची संपूर्ण सफलता झाल्यानंतरहि जो जीव समाजाला आणि स्वतःलाहि केवळ भारभूत होऊन रेंगाळत राहतो त्याची आपण होऊन इतिश्री करणें ही क्रिया अशा ’आत्मार्पणांत’ आणि ’आत्महत्येंत’ जरी समानच असली, तरी समर्थ रामदासांनी आत्महत्या केली असें कोणी म्हणत नाही, मानीत नाही. तर समर्थांनी प्रायोपवेशन केलें, आत्मसमर्पण केलें, असेंच इतिहास म्हणत आला आहे.
 
***
एकनाथ-तुकाराम महाराजांच्या निधनाच्या कथा अशाच प्रकारच्या आहेत. एकनाथ महाराजांनी अनेक उत्कृष्ट ग्रंथ लिहिल्यानंतर आणि हरिभक्तीचा उदंड प्रचार केल्यानंतर वयोमानानुसार त्यांची प्रकृति अत्यंत क्षीण झाली. आपल्या हातून जें व्हायचें तें देवकार्य पूर्ण झालें आहे, आता यापुढे समाजाची कोणती अधिक सेवा घडावी, अशी देवाचीच इच्छा नाही, हें आपली प्रकृति क्षीण झाली, अधिक कार्य करण्यास दुर्बल झाली आहे, यावरूनच दिसतें असें एकनाथ महाराजांना वाटू लागलें. एकदा तर त्यांना व्याधिग्रस्त देह इतका मरणासन्न झाला की त्यांत चेतना म्हणून उरलीच नाही. पण थोड्याच समयानंतर तो निश्चेतन झालेला देह पुन्हा सचेतन झाला. आपलें पारमार्थिक कार्य शक्य तितकें पूर्ण झाल्यानंतर असा स्वतःला नि समाजाला भारभूत झालेला देह आपण होऊन इश्वरार्पण करणें हेंच आता आपलें अंतिम कर्तव्य आहे. अशा जाणिवेने आणि मोठ्या सुखासमाधानाने एकनाथ महाराजांनी, स्नानसंध्या करावयास ते पैठणला ज्या गंगेवर जात त्याच गंगेत शिरून जलसमाधि घेतली.तें त्यांचें जलसमाधीचें कृत्य आत्महत्येसारखें निंद्य न मानले जातां समाजामध्ये इतकें वंद्य मानले गेलें कीं त्यांच्या जलसमाधीच्या स्थानाला पवित्र तीर्थाचें स्वरूप प्राप्त झालें.

***
 
एकनाथ महाराजांच्या ह्याच समाधिस्थानाचे दर्शन घेण्याकरिता पुढे स्वतः श्रीतुकाराम महाराज एकदा पैठणला गेले होते. श्री एकनाथांची ती आत्मविसर्जनाची कथा तुकाराम महाराजांनाहि अवगत होती. पुढे जेव्हां तुकाराम महाराजांना आपलें भक्तिसंप्रदायाचें प्रचार करण्याचे महत्कार्य पूर्ण झाल्याची जाणीव होऊन मध्यम वयांतच परमेश्वराच्या प्रत्यक्ष भेटीची उत्कट आतुरंता अत्पन्न झाली तेव्हा त्यांनीहि ऐहिक जीवनाचा त्याग करण्याचें मनांत आणून सगळ्यांचा मोठ्या समाधानाने शेवटचा निरोप घेण्यासाठी देहूगावांत घरोघर भेट देऊन ’आम्ही जातो आमुच्या गावा। आमुचा रामराम घ्यावा। आता कैचे येणें जाणें। सहज खुंटलें बोलणें॥ ’हा सुप्रसिद्ध अभंग गात गात ते इंद्रायणी नदीवर गेले. भजनानंदांत तल्लीन होतां होतां भगवंताचें विमानच आपल्याला नेण्याकरिता इंद्रायणीच्या पल्याड आलें आहे, असें त्यांना भासूं लागलें. परमोल्हासाने त्यांनी इंद्रायणींत प्रवेश केला. एक कथा सांगते की, त्या नदींतच एकनाथाप्रमाणे त्यांनी जल-समाधि घेतली. दुसर्‍या कथेप्रमाणे त्या विमानांत बसून ते सदेह स्वर्गास गेले.

 
maratha paper article on savarkar


तथापि दोन्ही कथांचा आशय एकच की, तुकाराम महाराजांनी अत्यंत सुखासमाधानाने आपले ऐहिक जीवन कृतकृत्य झालें असें समजून ऐहिक जगाचा निरोप घेतला; ऐहिक जीवनाचा त्याग केला आणि परमात्मस्वरूपीं विलीन झाले. म्हणूनच त्यांच्या ह्या ऐहिक अस्तित्वाच्या त्यागाला ’आत्महत्या’ न म्हणतां ’आत्मार्पण’ म्हणूनच गौरविलें गेलें आहे.वर तशा शतावधि उदाहरणांपैकी जी कांही उदाहरणें दिलेलीं आहेत त्या सर्वोवरून जो निष्कर्ष निघतो तो असा की, जो जीव आपण होउन जात नाही तो हेतुपूर्वक बळाने देण्याच्या सर्व कृत्यांना आत्महत्या म्हणत नाहीत. तसें कृत्य निंद्यच मानलें जातें असें नाही. तर अत्यंत असमाधानाने, विफलतेच्या तीव्र जाणिवेने, संकटांना कंटाळून, इच्छा असतांनाहि सुखाने जगतां येत नाही म्हणून, अत्यंत अतृप्त अशा मनःस्थितींत वैतागाच्या भरांत जे बळाने जीव देतात त्यांच्या त्या कृत्याला साधारणतः ‘आत्महत्या’ म्हटले जाते; परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतु संपूर्णपणे सफल झालेला आहे अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची - हर्षभराने समाप्ति करतात त्यांच्या त्या कृत्यास ‘आत्मार्पण’ असें म्हणतात. यद्यपि ह्या परिवर्तनशील किंवा अखंड विकसनशील जगांत सर्वतोपरी परिपूर्णता अशी केव्हाहि असूं शकणार नाही.जें जीवनांत संपादावयाचें होतें तें सर्व संपादिलेले आहे म्हणून आता कर्तव्य असें कांही उरलेले नाही अशा कृतकृत्य भावनेने रिक्तकाम किंवा पूर्णकाम झालेले धन्य पुरुष आपण होउन आपले प्राण विसर्जन करतात. ते आपलें नश्वर जीवन विश्वाच्या चिरंतन जीवनांत विलीन करून टाकतात. योगवाशिष्ठांत म्हटल्याप्रमाणे-


अंतरिक्तो बहिर्रिक्तो रिक्त कुंभरिवांबरे।
अंतः पूर्णो बहिःपूर्णो पूर्णकुंभरिवार्णवे॥

 
तथापि आपल्या या जीवनकार्याची सापेक्षतः परिपूर्णता झाली आहे, अशी आत्मसंतुष्टता वाटल्यानंतर समाजाला किंवा स्वतःला जो देह वार्धक्याने म्हणा, व्याधीने म्हणा, पण केवळ भारभूत असाच राहणार आहे, त्या देहाचा गुहाप्रवेशाने, प्रायोपवेशनाने, अग्निदिव्यांने, समुद्रसमाधि किंवा जलसमाधि किंवा अंतिम योगसमाधि घेऊन किंवा अशाच कोणत्यातरी मार्गाने जे त्याग करतात तें त्यांचे कृत्य, उत्तांन अर्थी ’बळाने जीव देणें’च असतांहि त्याला ’आत्मसमर्पण’ म्हणून जें गौरविलें जातें तें यथार्थच असतें!
 
धन्योऽहम्। धन्योऽहं कर्तव्यं मे न विद्यते किंचित्।
धन्योऽहम्। धन्योऽहं
प्राप्तव्यं सर्वमद्य संपन्नम्॥



 
 
- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

(साभार : सह्याद्री मासिक
साहित्य संदर्भ : अक्षय जोग)


अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121