आनंद सोहळा...

    01-Feb-2023
Total Views | 95
Seva Sahayog


सेवा सहयोगअभ्यासिकेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सशक्त व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कोरोना काळातच २०२१ पासून वार्षिकोत्सवाची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी विविध स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या. यंदा हे वार्षिकोत्सवाचे तिसरे वर्ष. या वार्षिकोत्सवाचा आनंद सोहळा शब्दात मांडण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

 
आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव असलेल्या संजय हेगडे, अतुल नागरस, किशोर मोघे आणि अन्य सहकार्‍यांनी आपल्या व्यावसायिक सेवेतून सेवानिवृत्त होत समाजसेवेचं व्रत घेऊन २००९ मध्ये ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ची स्थापना केली. सद्य:स्थितीत ‘सेवा सहयोग’ शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, शास्त्र व तंत्रज्ञान, रोजगार आणि ग्रामविकास अशा विविध आयामांवर महाराष्ट्रभर काम करत असून वर्ष २०२१-२२ मध्ये सहा लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. विद्यार्थी आणि वस्ती यांच्या विकासाचे ध्येय निश्चित करून सुरू झालेल्या ‘समुत्कर्ष प्रकल्पा’ची सुरुवात २०१४ साली पुण्यातून झाली. २०१५ साली विक्रोळीतील ‘हरियाली व्हिलेज’मध्ये ‘सेवा सहयोग’ च्या मुंबईतील पहिल्या अभ्यासिकेला सुरुवात झाली.


सद्य:स्थितीत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे अशा सहा जिल्ह्यांमध्ये नऊ विभागांमध्ये हा प्रकल्प विस्तारलेला आहे. मुंबईमध्ये सुमारे २५०० विद्यार्थी - ७३ अभ्यासिका - ७५ अभ्यासिका प्रमुख- ०९ विभाग समन्वयक - २० हून अधिक कार्यकारी समिती स्वयंसेवक सदस्य आणि २०० हून अधिक ‘अ‍ॅक्टिव्ह’ स्वयंसेवक या प्रकल्पाचे वाहक आहेत. अभ्यासिकांच्या सेवावस्त्यांमध्ये अभ्यासिकेबरोबरच किशोरवयीन मुलींसाठी किशोरी विकास वर्गसुद्धा चालवले जातात. किशोरवयीन मुलींना वाढत्या वयात होणारे बदल, मानसिक व शारीरिक आरोग्य, आहार, स्वसुरक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाते, आजमितीस एकूण ४० किशोरी वर्ग चालवले जात असून एक हजारांहून अधिक विद्यार्थिनी लाभ घेत आहेत. अभ्यासिकांमधून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी २०२२ पासून विद्याश्रय उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमातून पहिल्याच वर्षात ४२ होतकरु विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीबरोबर विविध स्वयंसेवकांच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शनसुद्धा दिले जात आहे.

‘समुत्कर्ष’ हा प्रकल्प वर्षभर चालणारा प्रकल्प असून सोमवार ते शनिवार दररोज दोन तास विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याच वस्तीत या अभ्यासिका चालवल्या जातात. शहरी वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये राहणार्‍या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभरात कला, क्रीडा, सामान्य ज्ञान, भाषा, गणित आणि इंग्रजी विषयांवर उपक्रम राबवले जातात.अभ्यासिकेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सशक्त व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने २०२१ पासून वार्षिकोत्सवाची सुरुवात झाली. यंदा हे वार्षिकोत्सवाचे तिसरे पर्व! नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सर्व विभागांमध्ये वार्षिकोत्सवाच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले होते, एकूण ७३ अभ्यासिकांमधील इयत्ता तिसरी ते दहावी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांची लहान, मध्यम व मोठा अशा तीन गटांमध्ये विभागणी केली.

कलेशी निगडित सात विविध स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये सुमारे १,१२५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले कला-कौशल्य सिद्ध केले. प्राथमिक फेरीसाठी सेवा सहयोग व अभ्यासिका प्रकल्पाशी जोडलेल्या जुन्या-नव्या अशा ८५ जाणकार व्यक्तींनी परीक्षकांची भूमिका बजावली. दि. १५ जानेवारी रोजी आंतरविभागीय स्तरावर कथाकथन, कविता वाचन, वक्तृत्व, निबंध लेखन, समूहगीत गायन आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले गेले. यामध्ये एकूण सहा स्पर्धांमध्ये प्राथमिक फेरीत प्रथम क्रमांकाने विजयी झालेले नऊ विभागांतील एकूण २२५ विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व स्पर्धांचे परीक्षण १७ मात्तबर परीक्षकांनी केले. आंतर विभागीय फेरीतील विजेत्यांचा गुणगौरव करणारा ‘समुत्कर्ष’ अभ्यासिका प्रकल्पाचा-वार्षिकोत्सव रविवार, दि. २९ जानेवारी रोजी रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात जल्लोषामध्ये साजरा झाला.


Seva Sahayog


विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाबरोबरच कार्यक्रमाच्या सुरुवातीस पश्चिम-मध्य मुंबई विभागातील विद्यार्थ्यांचे लेझीम, कर्जत विभागातील विद्यार्थिनींची कथ्थक नृत्यातून श्रीगणेश वंदना तसेच ठाणे विभागातील विद्यार्थिनींनी सादर केलेले देशप्रेमावर आधारित संस्कृत गीत लक्षवेधी ठरले.विविध स्पर्धांमधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांकडून सादर झालेल्या वक्तृत्व, समूहगीत व कथाकथनाने संपूर्ण प्रेक्षकवर्ग भारावून गेला. नवी मुंबई विभागातील किशोरींनी पथनाट्याच्या माध्यमातून किशोरीवयीन मुलांना सोशल मीडियाबाबत केलेले समाज प्रबोधन आणि राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणार्‍या बोईसर विभागातील पाटीलपाडा अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले डांगी नृत्य यांनी सभागृहातील सर्व प्रेक्षकांसह कार्यक्रमाच्या प्रमुख मान्यवरांना उभे राहून दाद देण्यासाठी भाग पडलं. संपूर्ण सभागृह हाऊसफुल झालेल्या या आनंदोत्सवाचे सुमारे पावणे चारशे लोकं भागीदार होते.

यंदा सर्व नऊ विभागांतील (पूर्व मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, कर्जत, पश्चिम मुंबई, पश्चिम मध्य मुंबई, बोईसर, सफाळे व मुळशी) उत्कृष्ट विद्यार्थ्यांना व शिक्षकांनासंजय ‘हेगडे स्मृती पुरस्कार’ मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. वार्षिकोत्सवातील विजेत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी श्रीकांत बापट - संचालक, लॅब इंडिया, अखिलेश्वरन - संचालक, ग्लेनफिन केमिकल्स, पंकज वाघमारे- CSR प्रमुख Hexawware, दीपक बिरेवार - संस्थापक, बिरेवार फाऊंडेशन, राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार कुमार दिव्येश इंदुलकर, कुमार वरुण बुद्धदेव या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीबरोबरच ’सेवा सहयोग’चे अध्यक्ष, संचालक व कार्यकारी समितीचे प्रतिष्ठित सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते. वार्षिकोत्सवाच्या कलामहोत्सवाचा विजेतेपद चषक कर्जत विभागाने आणि उपविजेतेपद मुंबई पूर्वउपनगर विभागाने पटकावला.

विजेता आणि उपविजेता विभागाला मानाचे चषक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वार्षिकोत्सवात उल्लेखनीय कामगिरीसाठी ठाणे आणि नवी मुंबई विभागालासुद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी गेले महिनाभर झटत असलेल्या सर्व विभाग समनव्ययक, स्वयंसेवक, अभ्यासिका शिक्षक तसेच शहरी व ग्रामीण प्रकल्प प्रमुख, सर्वाना सभागृहामध्ये स्टेजवर बोलवून सर्वांचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले गेले. गेले तीन वर्षे सातत्याने होणारा हा ’समुत्कर्ष’ वार्षिकोत्सव ‘सेवा सहयोग’च्या अनेकानेक मानाच्या शिरपेचातील एक लखलखता तुरा आहे, यात काहीच शंकाच नाही.ग्रामीण व शहरी भागातील वंचित विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी २०१५-१६ साली सुरू केलेल्या ‘समुत्कर्ष अभ्यासिका’ प्रकल्प प्रयोगशाळेची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे, ही खात्री पटते.




-संदेश घरत



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121