वयाच्या 70व्या वर्षी कालिंदी काकू वाचायला-लिहायला शिकल्या. अगदी दत्तसेवेपासून ते अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्या सक्रिय असायच्या. घराबाहेर न पडताही एखादी स्त्री कशा पद्धतीने कुटुंब, समाजासाठी आपले योगदान देऊ शकते, याचे त्या उत्तम उदाहरण होत्या. अत्यंत धर्मदायी आचरण करीत त्यांनी आपले आयुष्य व्यतीत केले. कालिंदी काकू यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
रंगपंचमीचा दिवस, सगळीकडे रंग खेळण्यात सर्वचजण उत्सुक व त्यातच मश्गुल होते. रंगपंचमीच्या दिवशी नाशिकला रंगपंचमी खेळली जाते. शेखर गायधनीच्या घरी सर्वच कुटुंबीय दुपारच्या वेळेत रंगपंचमीचा आनंद लुटत होते. शेखरच्या आईने म्हणजे कालिंदी काकूंनी रोजच्याप्रमाणे सकाळचे सर्व व्यवहार केले. दुपारचा भोजनाचा आनंद घेतला आणि शेवटचा घास घेतल्यानंतर त्याच टेबलावर आपली मान टाकली. भूतलावरील शेवटचा श्वास घेऊन त्या परलोकप्रवासाला निघून गेल्या. शेखरच्या घरी आज असे काही घडेल, अशी कोणाला सुतरामही शंका नव्हती. कालिंदी काकू रंगपंचमीच्या दिवशी शेवटचा श्वास घेतील, असे कोणासही वाटले नव्हते. दुपारच्या भोजनानंतर त्यांनी भूतलावरील आपली यात्रा संपवली.
कालिंदी काकूंचे माहेर आणि सासर दोन्हीही नाशिकचे. चार अपत्ये, पती श्रीपाद गायधनी सरकारी नोकरीत. काकूंचे त्यावेळेसच्या वातावरणानुसार शिक्षण कमी झालेले होते. विवाहानंतर क्षेमकल्याणी कुटुंबातून काकू गायधनी परिवारात आल्या. घराचा ताबा घेतला आणि त्या उत्तम गृहिणी म्हणून कार्यरत राहिल्या. आपल्या चारही अपत्यांना उत्तम संस्कार देत आपल्या पतीची सेवा करत त्यांचा जीवनक्रम चालू होता. रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष इत्यादी स्तोत्रे त्यांची तोंडपाठ होती. ती साधना आयुष्यभर त्यांनी केली. त्याकरिता त्यांना आपल्यासमोर कोणत्याही पुस्तकाची आवश्यकता नव्हती. आपण स्वतः करीत असलेली साधना त्यांनी आपल्या अपत्यांनाही दिली.
पतीची सरकारी नोकरी, मुलांचे संगोपन यामध्ये त्या व्यग्र होत्या. पती सेवानिवृत्त झाल्यानंतर नाशिकच्या गोरेगाव लेनमधून पाथर्डी फाट्यावर त्यांचा मुक्काम वळला. पती सेवानिवृत्त झाल्यामुळे आता त्यांना पतीचा अधिकाधिक सहवास लाभू लागला. पाथर्डी फाट्यावर गेल्यावर बंगल्यातील अंगणात वृक्षारोपण करण्यास दोघेही पती-पत्नी मग्न झाले. वृक्षप्रेमी असलेल्या काकूंना पाथर्डी फाट्यावर राहण्यास गेल्यामुळे वृक्षसेवा करण्यास अधिक चांगले जमू लागले. आपल्या अंगणात विविध प्रकारची वृक्षे लावून त्यांची जोपासना करण्यात काकू अग्रेसर राहिल्या.
इयत्ता दुसरी-तिसरीपर्यंत शिक्षण झालेले होते. पण लेखन-वाचनाशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहिला नसल्याने अक्षरओळख त्या पूर्णतः विसरून गेल्या होत्या. पती सेवानिवृत्त झाले होते. दिवसभर घरीच असायचे. त्यामुळे पतीने त्यांना लिहिता-वाचता आले पाहिजे, असे सांगितले. पतीची आज्ञा शिरसावंद्य मानून काकूंनी वाचनास सुरुवात केली. आपल्या पतीच्या मार्गदर्शनाखालीच 30-40 वर्षांपूर्वी सोडलेली अक्षरांची ओळख त्या आता परत करू लागल्या. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी वाचनास पुन्हा सुरुवात केली. रोज आपल्या पतीस वृत्तपत्र वाचून दाखविण्यास त्यांनी सुरुवात केली. वाचनास सुरुवात केल्यावर वृत्तपत्राबरोबरच त्यांनी सर्व धार्मिक पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. रोजच्या रोज कुलस्वामिनीची पोथी वाचण्याचा त्यांनी दिनक्रम केला. तो दिनक्रम त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत पाळला. पती जे सांगेल ते केलेच पाहिजे, या भक्तिभावाने वयाच्या 70व्या वर्षी वाचनास सुरुवात करून वयाच्या 92व्या वर्षी शेवटचा श्वास घेतानाही त्यांचे वाचन चालू होते. 92व्या वर्षीही विनाचष्मा त्या वाचन करीत असत. याचा अर्थ त्या खूप शिकलेल्या आहेत, असे इतरांना वाटू शकते. मात्र, काकूंचे शालेय शिक्षण अत्यंत कमी झाले होते. परंतु, इच्छाशक्तीच्या बळावर अक्षरओळख करून त्यांनी वाचनाची गोडी लावून घेतली. आपल्या चारही अपत्यांना उत्तम शिक्षण देऊन त्यांच्या क्षेत्रात ते त्यांच्या पायावर उभे राहिले. आता काकूंना सोबत फक्त आपल्या पतीची होती. पतीच्या आज्ञेप्रमाणे त्यांचा जीवनक्रम चालू होता. लहानपणापासूनच त्यांना ईश्वराची आवड होती. पूजाअर्चा करण्यात त्या नेहमीच मग्न असत. आपल्या पूजाअर्चेत कुलस्वामिनीबरोबरच दत्तभक्ती करण्यात त्यांना विशेष आवड होती. पाथर्डी फाट्यावर राहायला गेल्यावर तेथे असलेल्या दत्त मंदिरात त्यांनी अनेक वर्षे सेवा दिली. परमपूज्य नारायण काका ढेकणे महाराजांच्या त्या शिष्या होत्या.
काकांनी दिलेल्या अनुग्रहामुळे काकूंचा जीवनक्रम एकदम बदलला होता. काकांनी सांगितलेल्या सगळ्या नियमांचे पालन त्या अत्यंत काटेकोरपणे करीत असत. त्यांच्या दैनंदिन जीवनक्रमात रोजच्या साधनेबरोबरच कुलदेवीची प्रार्थना करणे, कुलदेवीची पोथी वाचणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्या निस्सीम दत्तभक्त होत्या. कॉलनीत असलेल्या दत्त मंदिराची अखंड सेवा त्यांनी केली. फक्त सेवाच नाही, तर सदर मंदिराकरिता आर्थिक व इतर मदतही वेळोवेळी त्यांनी केली. कॉलनीतील दत्त मंदिर अधिक सुशोभित व चांगले कसे राहील, याकरिता त्या सतत प्रयत्नशील होत्या. दत्त मंदिराकरिता जे जे करणे शक्य होते, ते सर्व त्यांनी अग्रक्रमाने केले. काकू अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. रोजची पूजाअर्चा, कॉलनीतील दत्त मंदिराची सेवा यामध्येच त्या नेहमीच मश्गुल असायच्या. काकांकडून अनुग्रह घेतल्यानंतर काकांनी सांगितलेल्या नियमांची अत्यंत श्रद्धेने त्या अंमलबजावणी करीत असत. काकांमुळे आपले आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे संपन्न झाले आहे, असे त्यांचे नेहमीच सांगणे असे.
काकू अचानकपणे भूतलावरून परलोकवासी झालेल्या असल्या, तरी मुलांवर केलेल्या संस्कारांतून व मुलांच्या आचरणातून त्या सदैव भूतलावरच आहेत, असे सर्वांनाच जाणवत राहील. एक संपन्न जीवनक्रम जगत आपले पती, मुले, नातू अशा सगळ्यांचीच त्यांनी सेवा केली. काकू घरात सर्वांत मोठ्या होत्या; पण कामकाजात त्या सर्वांत पुढे असायच्या. अत्यंत धर्मदायी आचरण करीतच त्यांनी आपले आयुष्य व्यतीत केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
- शरद जाधव
(लेखक ‘सहकार भारती’चे प्रदेश संघटन प्रमुख आहेत.)