मुंबई : गुजरात आणि केरळमध्ये हा प्रकल्प सुरु झाला पण आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात अजून जैसे थे च आहे, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राज्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर आता राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे म्हणाले की, "काही दिवसांपासून सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाच्या बाबतीत उलटसुलट बातम्या येत आहेत. कुठलीही माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी भुंकण्याचं काम विरोधक करत आहे. सिंधुदुर्ग प्रकल्प गुजरातला जाणार नाही. पण महाराष्ट्रात असलेल्या पाणबुडी प्रकल्पासारखाच एक प्रकल्प गुजरात आणि केरळमध्येदेखील होणार आहे. त्यामुळे कुणीही आपला प्रकल्प पळवलेला नाही."
ते पुढे म्हणाले की, "२०१८ च्या जवळपास दीपक केसरकर यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली होती. परंतू, महाविकास आघाडी सरकारच्या काळात असलेल्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी याला कुठलीही चालना दिली नाही. हा प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त जोर दिला. त्यामुळेच आज गुजरात आणि केरळमध्ये हा प्रकल्प सुरु झाला पण आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात अजून जैसे थे च आहे. तरीही आमचं महायुती सरकार हा पाणबुडी प्रकल्प पुर्ण करेल आणि देशात एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल," अशी ग्वाही नितेश राणेंनी दिली आहे.