भारताचे सर्वात आक्रमक आणि अपराजित योद्धा जनरल सगत सिंग यांची शौर्यगाथा

    23-Dec-2023
Total Views | 118
Article on Goa Liberation War

दि. १६ डिसेंबर रोजी १९७१च्या युद्धाला नुकतीच ५२ वर्षे पूर्ण झाली आहे. याशिवाय दि. १९ डिसेंबर १९६१च्या गोवा मुक्ती संग्रामाला यंदा ६२ वर्षं पूर्ण झाली आहेत. या दोन्ही युद्धांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेले, सैनिकी अधिकारी होते-लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांच्या शौर्यगौरवाचा आढावा घेणारा हा लेख...

लेफ्टनंट जनरल सगत सिंग, परम विशिष्ट सेवा पदक (१४ जुलै १९१८-२६ सप्टेंबर २००१) हे भारतीय लष्कराचे थ्री-स्टार रँक जनरल होते. १९६१ मध्ये गोवा मुक्ती युद्ध, १९६७ मध्ये चीनबरोबर नाथुला येथे झालेला संघर्ष, मिझोराममधील बंडखोरी आणि बांगलादेश मुक्ती युद्धात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. अशा या जनरल सगत सिंग यांना भारताचे सर्वात आक्रमक आणि कधीही युद्ध न हरलेले जनरल मानले जाते. १९६१ गोवा मुक्ती संग्राममध्ये १९६१ जनरल सगत सिंग यांना ब्रिगेडियर या हुद्द्यावर असताना, ‘५० पॅराशूट ब्रिगेड’चे कमांडर बनवण्यात आले. असे पहिल्यांदा झाले की, ‘५० पॅराशूट ब्रिगेड’ नेतृत्व एका पायदळाच्या अधिकार्‍यांना देण्यात आले होते. मात्र, पॅराट्रूपर नसल्यामुळे त्यांना पॅराट्रूपर चिन्ह (WINGS) लावता येत नव्हते. त्यांना हे माहिती होते की, जर त्यांनी विमानातून जम्प्स करून आपले ‘पॅरा ब्रिगेड’चे प्रोबेशन (परीक्षा) पूर्ण पास केले नाही, तर त्यांना ‘पॅराशूट ब्रिगेड’च्या सैनिकांकडून सन्मान मिळणार नाही. म्हणून त्यांनी वयाच्या ४०व्या वर्षी आकाशातून पॅरा जम्पस मारून, आपली पात्रता सिद्ध केली.

१९६२ गोवा मुक्ती संग्रामात त्यांच्या ‘५० पॅराशूट ब्रिगेड’ने वेगाने गोव्याची राजधानी पणजीकडे कूच केले आणि तिथे असलेल्या पोर्तुगीज सैनिकांना आश्चर्यचकित केले. यामुळे गोव्याची मुक्ती झाली. गोवा मुक्तीचे श्रेय सगत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या ‘५० पॅराशूट ब्रिगेड’कडे जाते. पोर्तुगाल सरकारने जनरल सगत सिंग यांना मारण्याकरिता, दहा हजार डॉलरचे बक्षीस त्यावेळी जाहीर केले होते. असे बक्षीस लावलेले, ते एकूलते एक सेनाधिकारी होते. यावरून त्यांची कामगिरी लक्षात यावी.

१९६७ मध्ये नाथुला येथे ३५० चिनी सैनिक मारले. १९६७ मध्ये सिंग सिक्कीममध्ये नाथुला येथे भारताच्या ’१७ माऊंटन डिव्हिजन’चे नेतृत्व करत होते. त्यावेळी चीनने भारताच्या सीमेच्या आत चोला येथे घुसखोरी केली. अतिशय आक्रमक कारवाई करून, जनरल सगत सिंग यांनी आपल्या सैनिकांना चिनी सैनिकांना तेथून हुसकावून द्यायचा आदेश दिला. पुढे झालेल्या युद्धामध्ये ३५० हून जास्त चिनी सैनिक मारले गेले. भारतीय सैन्याला आपल्या ७० सैनिकांचे प्राण देऊन, हे युद्ध जिंकता आले.

१९६२च्या भारत-चीन युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर, पहिल्यांदाच अशाप्रकारे चिनी सैनिकांचा आपण एका लढाईमध्ये पराभव केला आणि १९६२ मध्ये मिळालेले अपयश धुवून काढण्यात आले. याचे पूर्ण श्रेय जनरल सगत सिंग यांच्या आक्रमक नेतृत्वाला जाते. त्यांनी आपल्या कुठल्याही वरच्या अधिकार्‍यांची परवानगी व भारत सरकारचीदेखील परवानगी घेतलेली नव्हती. चीनला त्यांनी स्वतःहून निर्णय घेऊन, एक मोठा धडा शिकवला. परिणाम असा झाला की, त्यानंतर १९८८ पर्यंत म्हणजे २१ वर्षे चीनने पुन्हा भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करायचे धाडस केले नव्हते. त्यांची आक्रमक कारवाई पसंत न पडल्यामुळे, भारत सरकारने त्यांची तिथून त्यांची बदली केली.

मिझोराममधील बंडखोरी मोडून काढली

जनरल सॅम माणेकशॉ यांना सगत सिंग यांच्या सैनिकी कौशल्याची पूर्ण जाणीव होती. म्हणून त्यांनी सगत सिंग यांना ईशान्य भारतात दहशतवादविरोधी अभियानाकरिता मिझोराममध्ये पाठवले. जिथे पुन्हा त्यांनी एक अतिशय उत्तम कारवाई केली. यावेळी मिझोराममधील बंडखोरी अतिशय हिंसक बनली होती आणि नियंत्रणाच्या बाहेर जात होती. अशी बातमी होती की, मिझो बंडखोर मिझोरामला एक स्वतंत्र देश म्हणून काही दिवसांतच घोषणा करणार होते; परंतु सगत सिंग यांनी अत्यंत आक्रमक कारवाई करून, मिझोराममधील बंडखोरी मोडून काढली.

१९७१ची लढाई ज्यावेळी सुरू झाली, त्यावेळी जनरल सगत सिंग हे तेजपूरमधील ‘४’चे ‘कोर कमांडर’ होते. त्यांच्या हाताखाली तीन डिव्हिजन्स होत्या आणि लढाईमध्ये त्यांना आगरतळाच्या बाजूने बांगलादेशवर हल्ला करण्याचा आदेश देण्यात आला.

१९७१ युद्ध जिंकण्याकरिता नावीन्यपूर्ण डावपेच

युद्ध सुरू व्हायच्या आधी पूर्व पाकिस्तानमध्ये चार डिव्हिजन सैन्य आणि एक लाखांहून जास्त निमलष्करी दलाच्या फौजा तैनात होत्या. तुलनेने भारतीय सैन्याच्या केवळ आठ डिव्हिजन होत्या. म्हणजे आक्रमण करणार्‍या भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य यांचे प्रमाण २ः१ असे होते. हल्ला करायचा असेल, तर तिप्पट किंवा सहा पटीने सैन्याची गरज असते.

आक्रमक सैन्यसुद्धा चिनी सीमेवरून आणि दहशतवादविरोधी अभियानामधून आणले होते. म्हणून युद्ध जिंकण्याकरिता जनरल सगत सिंग यांनी नावीन्यपूर्ण डावपेच आणि युद्धाच्या पद्धती वापरल्या. केवळ संख्याबळाच्या शक्तीवर युद्ध जिंकणे शक्य नव्हते.
नैऋत्य भागात ‘२ कोअर’ने (नेतृत्व जनरल रैना) प्रथम जेस्सोर काबीज केले, नंतर खुलना बंदरापर्यंत आघाडी मारली. झेनिदावर विजय मिळवल्यानंतर, पद्मा नदीवरील महत्त्वाच्या हार्डिंग ब्रिजवर ताबा केला. वायव्य विभागात ३३ कोअरने(नेतृत्व जनरल थापर) बोग्रा आणि रंगपूरमधील शत्रू सैन्याला पराजित केले. सर्वात जास्त यश जनरल सगत सिंगच्या ’४ कोअर’ला आले. मात्र, सर्वात जास्त यश हे पूर्व विभागात ‘४ कोअर’च्या (जनरल सगत सिंग) ‘८, ५७ आणि २३ माऊंटन डिव्हिजन्स’नी मौलवीबजार, सिल्हेट, दाउदखंडी आणि मैनामनी ही शहरे जिंकले.

जनरल सगत सिंग यांच्या कोरने अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली. शत्रूचे कच्चे दुवे हेरत व मोठ्या प्रतिकार शक्य असलेल्या ठिकाणी वळसा (by passing) घालून पुढे वाटचाल केली.

जनरल सगत सिंग यांची युद्ध पद्धती अत्यंत आक्रमणशील होती, वेळेला महत्त्व होते आणि त्यादृष्टीने जनरल सगत सिंग डावपेच आखले होते, तिन्ही दिशांकडून बांगलादेशात आगेकूच करण्याचे मार्ग ताब्यात घेणे, सरहद्दीवरील पाकिस्तानी सैन्याला पिछेहाट करण्याची व ढाका येथे एकत्रित होण्याची संधी मिळू न देणे, असे डावपेच वापरले गेले.

ढाक्याच्या पूर्वेला मेघना, पश्चिमेला व दक्षिणेला जमुना पद्मा आणि उत्तरेला नद्यांचे अडथळे असल्याने ढाका ‘बेट दुर्ग’ बनतो. या दुर्गाचा आश्रय घेऊन, पाकिस्तानी सैन्याला अखेरची लढाई देणे अशक्य करणे, हे जनरल सगत सिंग यांचे उद्दिष्ट होते.

म्हणून जनरल सगत सिंग यांनी युद्धात अनेक अभिनव डावपेच वापरले. टांगेलमध्ये झालेला भारतीय सैन्याचा एअर ड्रॉप, हेलिकॉप्टरच्या मदतीने बंगलादेशातील नद्या पार करणे, मोठ्या शहराजवळ असलेल्या किल्ल्यांवरती हल्ला न करता, त्यांच्या मागे जाऊन त्यांचा परत जायचा रस्ता अडवणे, सैन्याची हरकत करण्याकरता घोडे, रिक्षा, बैलगाड्या अशा अनेक वाहनांचा वापर इत्यादी डावपेच वापरले गेले.

चारही दिशांनी हल्ला करून, पूर्वेमधील पाकिस्तानी सैन्याची कोंडी झाल्यानंतर पूर्व पाकिस्तानातील सेनापती लेफ्टनंट जनरल निआझी याने शरणागती पत्करली.

१९७१च्या लढाईमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर, त्यांना पदोन्नती मिळाली नाही. ’बीबीसी’चे पत्रकार १९७१च्या लढाईमध्ये भारतीय सैन्याने बांगलादेशमध्ये अत्याचार केले, असा दूषप्रचार करत होते. जनरल सगत यांनी ’बीबीसी’ला धडा शिकवला. ‘बीबीसी’ची भारत सैन्याच्या विरुद्ध लिहिण्याची कारवाई पूर्णपणे थांबली. मात्र, सरकारला जनरल सगत यांचे वर्तन आवडले नाही आणि सगत सिंगांना पदोन्नतीपासून वंचित करण्यात आले.

जनरल सगत सिंग हे भारतीय सैन्याचे कुठलीही लढाई न हरलेले, एकमेव जनरल होते. परंतु, त्यांच्या लष्करी योग्यतेला पूर्ण सन्मान देण्यात आला नाही. आशा करुया की, आता तरी भारतीय सरकार आणि भारतीय सैन्य या अत्यंत आक्रमक व्यक्तिमत्त्वाचे योगदान ओळखेल आणि त्यांना योग्य सन्मानाने पुरस्कृत करेल.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121