भाजपबरोबर एकट्याने लढा देण्याची ताकद कोणत्याही विरोधी पक्षात नाही आणि ‘इंडिया’ आघाडी बनण्यामागचे खरे कारणही हेच आहे की, भाजपला शह देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागले आहे. फोटोसाठी हे परस्परविरोधी पक्ष एकत्र आले असले, तरी त्यांच्यात एकमेकांबद्दल अविश्वास कायमच आहे. दुसर्याच्या जागांवर डल्ला मारण्याची संधी कोणताच पक्ष सोडेल, असे दिसत नाही.
मध्य प्रदेशात भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांनी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढविली पाहिजे, असे मत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकतेच व्यक्त केले. त्यांच्या या मतप्रदर्शनामुळे काँग्रेस पक्षात खळबळ माजली असून, त्यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. अखिलेश यांच्या वक्तव्यामुळे मध्य प्रदेशात भाजपला स्वबळावर हरविण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही, अशी अखिलेश यांची समजूत झाली असावी असे दिसते. तसेच आपल्या पक्षाची मदत घेतल्यास भाजपला हरविणे शक्य होईल, असेही ते सूचवित असावेत, असे दिसते. काँग्रेसला अर्थातच हा युक्तिवाद मान्य होणारा नाही. ज्या राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस हेच दोन प्रमुख पक्ष आहेत, त्या राज्यांमध्ये काँग्रेस जागावाटपात अन्य कोणत्याही पक्षाला वाटा देण्याची शक्यता जवळपास नाही.
अर्थात, ही गोष्ट अन्य राज्यांमध्ये काँग्रेसलाही लागू होते. पश्चिम बंगाल असो की उत्तर प्रदेश किंवा बिहार, तेथे काँग्रेसला आपले उमेदवार उभे करण्यासाठी अन्य पक्षांच्या मेहेरबानीवर अवलंबून राहावे लागणार आहे. प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस अन्य कोणत्याही पक्षासाठी आपल्या जागा कमी करण्याची शक्यता कमीच. तेथे काँग्रेस आणि डाव्या पक्षांना तृणमूलविरोधातही आपले उमेदवार उभे करावेच लागतील, अशीच शक्यता आहे. तसे न केल्यास आधीच अर्धमेली झालेली काँग्रेस आणि डावी आघाडी पूर्णपणे नष्ट होईल, अशी भीती. त्याचा थेट लाभ भाजपला होईल, हेही उघडच आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तिथे तब्बल १८ जागा जिंकल्या होत्या. येत्या निवडणुकीतही किमान तितक्या जागा भाजप जिंकेल, हे अपेक्षित आहे. त्यामुळे या आघाडीतील पक्षांनी कितीही आव आणला, तरी जागावाटपाबाबत या आघाडीत मतैक्य होणे अशक्य आहे.
तीच गोष्ट उत्तर प्रदेशची. आपला पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ८० जागा जिंकेल, असे वक्तव्य अखिलेश यादव यांनी गेल्याच महिन्यात केले होते. म्हणजे त्या राज्यात सप इतर कोणत्याही पक्षांसाठी जागा सोडणार नाही, असेच त्यांना सूचित करायचे होते का? गेल्या लोकसभा निवडणुकीत सपने उत्तर प्रदेशात जेमतेम दोन जागी विजय मिळविला होता. या स्थितीत येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा दावा अखिलेश यादव कशाच्या जोरावर करीत आहेत? काँग्रेसला तर केवळ सोनिया गांधी यांची जागा कशीबशी टिकविता आली. स्वतः राहुल गांधी यांना तर केरळमधील वायनाड येथे पळ काढावा लागला होता. त्यामुळे तेथे समाजवादी पक्षावर दबाव टाकून आपल्या पदरात एखादी जागा मिळविण्यात काँग्रेसला यश येण्याची शक्यता दिसत नाही.
मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाचा प्रभाव नगण्य असून, तो मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील एक-दोन जागांपुरता आहे. २००३ मधील विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या सात जागा हाच सपचा आजवरचा विक्रम. पण, २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत सपला केवळ एका जागी विजय मिळविता आला होता. मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेस हेच दोन प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे सपबरोबर विधानसभा निवडणूक लढविण्याचे कोणतेच कारण काँग्रेसला दिसत नाही. पण, ही मागणी करण्यामागे त्या राज्यात आपल्या पक्षाचा चंचुप्रवेश करून घेणे हा आहे, असे दिसते. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या संख्येनुसार, लोकसभेसाठी एखाद्या जागी आपला उमेदवार उभा करण्याचा त्या पक्षाचा हेतू असावा, असेही प्रथमदर्शनी दिसते.
मुळात भाजपला हरविणे, या एकमेव आणि नकारात्मक मुद्द्यावर निवडणूक लढविली जात असून, हा विचार मतदाराला पटणारा नाही. या विरोधी पक्षांनी भाजपला हरविण्याची कारणे काय किंवा भाजपला सत्तेवरून दूर का केले पाहिजे, याचे मतदारांना पटणारे कोणतेही कारण आजपर्यंत दिलेले नाही. भाजपविरोधात केवळ आरोप करण्यात येत असून, त्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ कसलाही ठोस पुरावा विरोधी पक्षांना देता आलेला नाही. जगात सर्वाधिक वेगाने विकास पावणार्या या भारताच्या अर्थव्यवस्थेमुळे महागाई, बेरोजगारी यांसारखे संदिग्ध आरोप मतदारांच्या गळी उतरविता येत नाहीत, तरी कसेही करून सत्ता मिळवायची, इतकाच या आघाडीतील प्रत्येक पक्षाचा हेतू आहे.
एकदा सत्ता हाती आली की, जनतेच्या पैशाची लूट करून आपले खिसे भरण्याचा मार्ग मोकळा होतो, याची त्यांना खात्री आहे. सुरुवातीला आशादायक वाटणार्या आम आदमी पक्षाची झालेली अवनती पाहता मतदारांचा आता (कथित) सुशिक्षित नेत्यांवरील विश्वास उडाला आहे. काँग्रेसला लाजवेल इतका प्रचंड भ्रष्टाचार आम आदमी पक्ष केवळ दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशात (तेही केवळ दहा वर्षांत) करू शकतो, तर देशभरात तो किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करील, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. त्या पक्षाची सत्ता असलेल्या पंजाबमधील कर्जबाजारी आणि दिवाळखोर अर्थकारणाचे नवनवे किस्से रोज उघड होत आहेत. दिल्लीतील लोकसभेच्या सर्व सातही जागा लढण्याचे आम आदमी पक्षाने यापूर्वीच जाहीर करून टाकले आहे. आम आदमी पक्षासारखा पक्षही काँग्रेसला जुमानत नाही, इतकी काँग्रेसची केविलवाणी अवस्था झाली आहे.
भारताच्या विकासाचा कोणताही पर्यायी मार्ग मतदारांपुढे ठेवलेला नाही. किंबहुना इतके सारे पक्ष एकत्र येऊन ते भारताला कसे पुढे नेणार, त्याची पुसटशीही रूपरेषा अजूनपर्यंत मतदारांपुढे आलेली नाही. उलट आपल्या आघाडीतील दुसर्या पक्षाबद्दल अविश्वास आणि आपल्या राज्यातील आपले राखीव कुरण सुरक्षित राखण्याची धडपड, यातून या आघाडीचा पोकळ वासा सतत लोकांपुढे येत आहे. पण, भाजपविरोधात एकट्याने लढण्याची हिंमत नसल्याने ‘तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय गमेना’ अशी या आघाडीची अवस्था झाली आहे.