मणिपूर हिंसाचार! तपास यंत्रणांनी एकतर्फी कारवाईचे आरोप फेटाळले
02-Oct-2023
Total Views | 51
इंफाळ : मणिपूरमध्ये मे महिन्यापासून सुरु असलेला जातीय संघर्ष आता थांबला आहे. याप्रकरणी आता एनआयए आणि सीबीआय दंगेखोरांना अटक करत आहे. तपास यंत्रणांच्या या कारवाईचा काही गटांनी विरोध केला आहे. तपास यंत्रणा एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप तपास यंत्रणांवर करण्यात आला आहे.
या आरोपांवर तपास यंत्रणांनी प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणांनी सांगितले की, प्रत्येक आरोपीला तपास पथकांनी गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे अटक करण्यात आली आहे. दोन्ही तपास यंत्रणांनी कुकी समुदायाचे प्रतिनिधीत्व करण्याचा दावा करणाऱ्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फ्रंट (आयटीएलएफ) या संघटनेने केलेले आरोप फेटाळले आहेत.
मणिपूरमध्ये मे महिन्यापासून उच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे कुकी आणि मेथई समाजामध्ये जातीय हिंसाचार सुरु झाला होता. सध्या मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे. केंद्र सरकारने सैन्याची आणि केंद्रीय राखीव बलाची तैनाती राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील एका मोठ्या अधिकाऱ्याला मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी दिली आहे.