दिव्यांग व विशेष विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र’ ६७ वर्षांपासून कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्यसमवेत व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आणि शिक्षणोत्तर उपक्रमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी संस्थेची वाटचाल सुरु आहे. या संस्थेविषयी संस्थेचे अॅड. मुरलीधर कचरे यांच्याशी साधलेला संवाद.
दिव्यांगांनी इतरांपेक्षा आपण वेगळे असल्याची भावना विसरायला हवी, त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांनीही आयुष्य भरभरून जगावे, या दूरदृष्टीनेडॉ. रघुनाथ गोविंद काकडे यांनी दि. ६ नोव्हेंबर १९५६ साली ‘दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्रा’ची मुहूर्तमेढ रोवली. या संशोधन केंद्राबद्दल बोलताना अॅड. मुरलीधर म्हणाले की, ”सुरुवातीला कोथरुडच्या भालेराव बंगल्यात संस्थेचा प्रारंभ झाला. इवल्याशा रोपट्याचे वटवृक्ष झाले असून त्याच्या सावलीने दिव्यांगांना सकारात्मक जगण्याची दिशा दाखवली. दिव्यांगासाठी पुण्यातील उत्तम कार्य करणारी ‘दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र’ अशी केंद्राची ओळख सांगण्यात अभिमान वाटतो. आजपर्यंत हजारो विद्यार्थी या संस्थेतून माठ्या हुद्द्यावर पोहचले असल्याने संस्थेचे सार्थक झाले आहे. शिक्षण, आरोग्य तर हवेच पण, त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्था नेहमीच प्रोत्साहन देते असते” संस्थेविषयी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा संस्थेच्या अतिशय मोलाच्या कार्याची माहिती मिळाली.
पुण्यातील वानवडी येथे १९५९ पासून सुरु असलेल्या संस्थेत काम सुरु तर आहेच, ते उत्तरोत्तर वाढत गेले. यंदा संस्थेतील दहावीतील विद्यार्थ्यांचा निकाल ९३ टक्के लागला असून, अनेक तरुणांनी चांगले गुण मिळवले आहेत. तर, विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रावीण्यही मिळवले आहे. संस्थेच्या सुरूवातीला संस्थेत केवळ सहा मुले होती. ही संख्या कालांतराने वाढत गेली अन् वसतिगृह झाले. २००० साली येथे मुलांसाठी शाळा बांधण्यात आली. तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते संस्थेच्या प्राथमिक शाळेचे उद्घाटन झाले. मुला-मुलींचे वसतिगृह, सांस्कृतिक सभागृह, सुसज्ज ग्रंथालय, मैदान अशा विविध सुविधा विद्यार्थ्यांसांठी उपलब्ध आहेत. शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच, त्यांच्यातील सुप्त गुण ओळखण्यासाठी इथे वेगळे वर्गही चालवले जातात. एवढेच नव्हे, स्पर्धाही घेतल्या जातात. उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रोत्साहन म्हणून बक्षिस देऊन सन्मानही केला जातो. एवढ्यावरच न थांबता पुढे जिल्हास्तरीय व राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी त्या खेळाडुंना संस्था सहकार्य करते.
२०१६चा दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा केंद्र शासनाने लागू केला आहे. त्या अंतर्गत दिव्यागांना चांगल्या सुविधा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार दिव्यांग म्हणून २१ श्रेणी वर्गिकृत केल्या आहेत. त्या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे न्याय देण्याचे काम या कायद्यानुसार होणार आहे. यात दिव्यांग आणि सर्वसाधारण मुले यांची एकात्मिक शाळा चालविण्यात यावी अशीही तरतूद आहे. दिव्यांगांसाठी या प्रकाराची शाळा बांधण्याचा विचार आहे. त्यात १२ वीपर्यंत शिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन वसतिगृह उभारुन त्यात आणखी विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात येणार आह, तर संस्थेची बहुउद्देशीय इमारत उभे करुन संस्थेला एक कायमस्वरुपी मदत मिळण्याचा हेतू आहे.
दिव्यांगांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे. विशेष विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून ताठ मानाने वावरतात यावे, यासाठी केंद्रातून दहा अधिक वेगवेगळ्या प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात प्रामुख्याने ई-लर्निंग, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन, शिवणकला, मोबाईल रिपेअरिंग, संगीत वर्ग, संगणक प्रशिक्षण, हस्तकला अशा विविध कोर्सेसचा समावेश आहे. संस्थेच्या या बहुमोल कार्यासाठी दिव्यांग व्यक्तीच्या सशक्तीकरणाबरोबरच संस्थेला राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असे दोन नामांकित पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांतून आणखी काम करण्याची उर्जा मिळाली असल्याचेही अॅड. कचरे आवर्जून सांगतात. संस्थेची संपूर्ण मदार ठेवीदारांवर आहे. समाजील अनेक दानशुर आर्थिक मदतीची देणगी देतात. त्या मानाने अनुदान तुटपुंजे आहे. विशेष सांगायचे झाल्यास विश्वस्त मंडळातील एकही व्यक्ती पगार अथवा मानधन घेत नाहीत. सर्वजण समाजसेवा म्हणून हे काम करतात.
अॅड मुरलीधर हे स्वतः शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे अख्खे कुटुंब या कामासाठी त्यांना साथ देतेे. अॅड मुरलीधर म्हणतात ”११ वी, १२ वीचे वर्ग सुरु करायचे आणि नवीन वसतिगृह इमारत बांधायची हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठी अविरत व अथक काम करण्याची मनोमन इच्छा आहे.” बहुउद्देशीय इमारत, वसतिगृह यासह विविध उपक्रमासाठी अंदाजे ४० कोटींचा खर्च आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढे यावे. संस्थेला आपले मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्षअॅड. मुरलीधर कचरे यांनी केले आहे. संस्थेत अनेकांचे सहकार्य कायम मिळत असते. त्यापैकी मार्गदर्शन मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, व्यवस्थापकीय उपाध्यक्ष डॉ. सतीश जैन, उपाध्यक्ष डॉ. स्मिता जोग, सचिव अविनाश नाईक, सहसचिव शंकर जाधव, खजिनदार प्रकाश टिळेकर, सह खजिनदार मारुती राऊत, सभासद राजेंद्र कदम, हिमांद्री कुंडू, प्रतिक लोणकर, निलेश करपे, राहुल बनकर, किशोर रासकर, सुषमा सारोळकर, रवींद्र हिरवे यांची कायमच साथ मिळत असते.