माणसांनी निसर्गाशी नातं जपणं गरजेचं; 'मी धामापूर तलाव बोलतोय' माहितीपटाचा संदेश
09-Aug-2022
Total Views | 114
12
मुंबई(प्रतिनिधी): माणसाने निसर्गाशी आपले नाते जपणे आवश्यक आहे असा संदेश, मी धामापूर तलाव बोलतोय या माहितीपटाचा माध्यमातून देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर तलावाची कथा सांगणाऱ्या माहितीपटाचे प्रदर्शन मंगळवारी दि. ९ ऑगस्ट रोजी पार पडले. 'स्यामंतक' निर्मित या माहितीपटाचे प्रदर्शन बांद्रा येथील आयईएस कॉलेज ऑफ आर्कीटेक्चरमध्ये मध्ये आयोजित करण्यात आले होते. या चित्रपटाला सुनील सुखटणकर यांनी आवाज दिला आहे.
माहितीपट प्रदर्शना आधी एक चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चा सत्रात पाणथळ प्रदेशांची महती, आणि त्यावर काम केलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अनुभव लोकांना सांगितले. तसेच सामान्य नागरिकांकडून पाण्याच्या वापराचे नियोजन व्हायला हवे, असे या वेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच कोणतेही बांधकाम करताना, त्याच्या पर्यावरण पुरकतेवर भर द्यायला हवा असे ही या वेळी नमूद करण्यात आले. या चर्चा सत्रात, स्यामंतकचे मोहमद शेख, वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद, पक्षी निरीक्षक अविनाश भगत, मौखिक परंपरा या वर अभ्यास असलेल्या विद्या कामत आणि 'सॅकोन'चे वरिष्ठ अभ्यासक गोल्डिन क्वात्रोस यांनी सहभाग घेतला.
हा माहितीपट संपूर्णतः लोकसहभागातून साकार करण्यात आला आहे. तब्बल ५०० वर्ष जुने मानव निर्मित धामापूर तलाव हा १५३० मध्ये गावकरी आणि विजयनगर राजघराण्याचे मंडलिक असलेले नागेश देसाई यांनी बांधलेले होता. हा तलाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तलावांपैकी एक आहे. तलावात वर्षभर पाणी भरलेले असते. तलावाच्या आजूबाजूला सदाहरित जंगल आहे. आणि तलावाच्या एका कोपऱ्याशी वसले आहे भगवती मंदिर. तलाव परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. अनेक प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, उदमांजरे, पाणमांजरे आणि अगणित सरपटणाऱ्या प्राण्यांचे आश्रयस्थान असलेल्या धामपूर तलावाची कथा या माहितीपट द्वारे सांगण्यात आली.
या तलावाद्वारे धामापूर आणि काळसे गावाला, शेती आणि अन्य वापरासाठी पाणी तलावातून येणाऱ्या कालव्याद्वारे प्राप्त होते. दर वर्षी, पावसाळ्यानंतर तलावाचा बांध तोडला जातो, आणि नियमित पाणी बाहेर पडण्यासाठी वाट मोकळी करून दिली जाते. ५०० वर्षाचा इतिहास असलेल्या या तलावा बाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. हा तलाव ही या गावाची संपत्ती आहे, आणि ती पिढीजात पुढे नेण्यात येत आहे. निसर्गाबाबत संवेदनशील राहूनच मानवाला पुढे जाता येईल असे या माहितीपटाद्वारे सांगण्यात आले.