मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्ताव दाखल करत राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि इतर प्रश्नांचा उल्लेख करत राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याचा आरोप केला. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराकडून सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केली जाते, नागपुरात पोलीस अधिकाऱ्याकडूनच मुलीवर अत्याचार केला जातो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ डान्सबार सुरु आहेत. यासर्व घटनांमधून राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित नाही हे स्पष्ट होते, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, 'राज्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटींविषयी अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. माझी मुलगी असलेल्या रोहिणी खडसेंवर प्राणघातक हल्ला झाला, पण हल्लेखोर अद्याप मोकाट आहेत. राज्यातील युती सरकार अजून स्थिरस्थावर झाले नसून ते अद्यापही अस्थिरच आहे,' असेही खडसेंनी म्हटले.
काचेच्या घरात राहणारांनी इतरांवर दगड मारू नयेत
विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर आसूड ओढले. 'विरोधकांची स्थिती म्हणजे सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली अशी आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची दुरावस्था झाल्याचे आभासी चित्रण निर्माण केले जात आहे. आज जरी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असले तरी त्यांचा धाक विरोधी पक्षनेते असतनाही देखील होता. महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन गृहमंत्री हे डान्सबार वरील कारवाईबाबत बोलताना दुसरीकडे मात्र त्यांच्याकडूनच हफ्ते घेत होते. त्यामुळे विरोधी पक्षाने गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करू नये. काचेच्या घरात राहणारांनी इतरांवर दगड मारू नयेत,' असा इशारा दरेकरांनी यावेळी दिला.