‘मुश्किल वक्त कमांडो सख्त!’

    22-Jul-2022
Total Views | 159

war
 
 
 
सैनिकांचे आयुष्य हे दंतकथेपेक्षा कमी नाही. आपण एखादी कथा आ वासून ऐकू, ती ते प्रत्यक्ष जगत असतात आणि ते सीमेवर लढतात, त्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित राहतो, अशाच एका शूर जवान कमांडो मधुसूदन सुर्वे यांच्याविषयी...
 
 
 
 
काही माणसांचे आयुष्य हे एखाद्या दंतकथेप्रमाणे असते. कितीही सत्य असले तरी विश्वास बसणार नाही इतके नाट्यमय. त्यात सीमेवर लढणार्‍या सैनिकाचे जीवन ऐकताना, आपण एखाद्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटाची कथा ऐकतोय की काय, असे वाटते. असेच काहीसे- निवृत्त कमांडो मधुसूदन सुर्वे यांची जीवनकथा ऐकताना वाटते.
 
 
 
 
मधुसूदन सुर्वे यांचा जन्मच अशा गावात झाला, जिथे प्रत्येक घरात सैनिक जन्माला येतो. त्यामुळे सुर्वे असे जवान आहेत, ज्यांच्या अनेक पिढ्या भारतमातेच्या संरक्षणासाठी आयुष्यभर लढत आल्या. त्यांच्या पणजोबा-आजोबांपासून सुरू असलेला हा वारसा आज मधुसूदन सुर्वे यांचा मुलगादेखील पुढे घेऊन जात आहे. अतिशय खडतर समजले जाणारे सैन्य प्रशिक्षण बघूनच काही जणांच्या मनात भीती घर करते. परंतु, मधुसूदन सुर्वे यांच्या घरातच त्यांना लहानपणापासून भारतमातेच्या रक्षणाचे धडे मिळाल्यामुळे कधी घाबरून मागे फिरायचे कारणच नव्हते. किंबहुना, ते कच खाणार्‍यातले नव्हतेच मुळी. जिद्दीने त्यांनी सैनिकी शिक्षण पूर्ण केले. एवढेच नाही, तर आणखी पुढे जाऊन ‘पॅरा कमांडो ट्रेनिंग’देखील त्यांनी घेतले व संपूर्णतः सज्ज झाल्यानंतर आसाममधल्या पहिल्या मोहिमेपासून प्रत्येक मोहीम त्यांनी फत्ते केली. उल्लेखनीय म्हणजे ‘ऑपरेशन रायनो’नंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेले ‘ऑपरेशन रक्षक’ आणि १९९९ सालचे कारगीलमधील ‘ऑपरेशन विजय.’ ‘ऑपरेशन विजय’मधील तोलोलिंग टेकडीवर त्यांच्या युनिटने ‘२१-पॅरा स्पेशल फोर्स’ने तिरंगा झेंडा फडकवला. त्यानंतरही जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेले ‘ऑपरेशन पराक्रम’, मणिपूर येथील ‘ऑपरेशन हिफाजत’ एक अशा कित्येक मोहिमांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी यशाचे ध्वज फडकावले आहेत.
 
 
 
 
war
 
 
 
 
१९९२ साली सेनेत रूजू झाल्यानंतर २०११ साली ते सेवानिवृत्त झाले. या १९-२० वर्षांच्या दीर्घकाळात मधुसूदन सुर्वे यांनी अनेक पदके मिळवलीत. एवढेच नाही, तर दि. २६ जानेवारी, २००६ रोजी महामहिम राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मधुसूदन सुर्वे यांना ‘शौर्यचक्र’ देऊन सन्मानित केले गेले. परंतु, हे ‘शौर्यचक्र’ मिळण्याआधीचा प्रवास काही सहज नव्हता. एवढ्या मोहिमा यशस्वी केल्या, हे ऐकून जेवढे अभिमानस्पद वाटते, त्याहूनही मोठे ते जोखमीचे काम होते. राजस्थानच्या रणरणत्या उन्हात तसेच उणे २५ अंश तापमान असलेल्या प्रदेशात गस्त घालणे, रात्रंदिवस पाठीवर अनेक किलोंचे ओझे घेऊन डोंगर-दर्‍या पार करत, ऊन-पावसाचा सामना करत, कधी उपाशी पोटी झोपून तर कधी हजार-हजार सैनिकांची राहायची योग्य सोय नसल्यामुळे एवढ्या कमी तापमानात उघड्यावर राहूनही त्यांनी या मोहिमा यशस्वी केल्या होत्या. परंतु, या सर्वात धैर्य आणि धाडसाचा कळस ठरली ती मोहीम म्हणजे मणिपूर येथे झालेले ‘ऑपरेशन हिफाजत २’. या ऑपरेशनमध्ये मधुसूदन सुर्वे यांची नियुक्ती झाली आणि या मोहिमेची जबाबदारी थेट त्यांच्यावरच आली.
 
 
 
 
 
अतिशय प्रतिकूल अशा वातावरणातून सलग पाच दिवस चालल्यानंतर सुर्वे आणि त्यांच्या टीमने ’मुश्किल वक्त कमांडो सख्त!’ असे म्हणत त्यांचा नियोजित पल्ला गाठला. ते ज्या ठिकाणी पोहोचले तेथे सुर्वे यांना एका घरावर तीन झेंडे असल्याचे निदर्शनास आले. या घरात दहशतवादी आहेत याची त्यांना खात्री झाल्यानंतर आपल्या साथीदारांना सावध करत त्या घरावर ग्रेनेड मोठा स्फोट घडवून आणला आणि या हल्ल्यात त्या घरात असलेल्या जवळपास आठ-नऊ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. परंतु,तेवढ्यात एक गोळी त्यांच्या एका साथीदारास लागली आणि त्याची मदत करायला जात असताना दुसरीकडून एका दहशतवाद्याने मधुसूदन सुर्वे यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांच्या एका पायात सात गोळ्या झाडल्या. सुर्वे खाली कोसळले. त्यांच्या खांद्यावर असलेला त्यांचा साथीदार खाली पडून गडगडत थेट नाल्यात गेला. एवढ्यात दुसर्‍या एका दहशतवाद्याने सुर्वेंच्या दुसर्‍या पायावर दोन आणि पोटात दोन अशा एकूण ११ गोळ्यांचा वर्षाव केला. परंतु, अशाही परिस्थितीत जवळ येणार्‍या त्या दहशतवाद्याला सुर्वेंनी कंठस्नान घातले आणि या भीषण युद्धात सुर्वेंसह त्यांच्या साथीदारांनी ३७ दहशतवाद्यांना संपवले. परंतु, या सर्वात त्यांना त्यांचा डावा पाय गमवावा लागला, पोटात कृत्रिम आतड्या बसवण्यात आल्या आणि उजव्या पायात रॉड बसवला गेला आणि म्हणूनच त्यांच्या कार्यासाठी आणि शौर्यासाठी त्यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ’शौर्यचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
 
war
 
 
 
आपल्याला साधे खरचटले तरी आपण हळहळतो. परंतु, एवढ्या मोठ्या प्रसंगानंतर आजही मधुसूदन सुर्वे तेवढ्याच प्रसन्नतेने आणि आनंदाने आपले जीवन जगत आहेत. सेनेतून सेवानिवृत्त होऊनही आज ते नोकरी करत आहेत. आज मधुसूदन सुर्वे यांच्यासारख्या कितीतरी सैनिकांनी देशाच्या रक्षणाचा विडा हाती घेतला आहे. त्यांचे शौर्य एवढे असमान्य आहे की, आपण सामान्य माणूस फक्त त्यांच्या ऋणात राहूनच त्याची परतफेड करू शकतो.
 
 
                                                                                                               
                                                                                                                           - वेदश्री दवणे
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी मोहीम” राबविण्यात येणार आहे. अनेकदा प्रथम श्रेणी डब्यात सामान्य तिकीट घेऊन अथवा तिकीट ना काढता प्रवास करणाऱ्यांमुळे गर्दी होते. त्यातून अनेकदा वाद निर्माण होतात. हेच लक्षात घेता प्रथम श्रेणी तिकीट अथवा पास घेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121