नाशिक: त्र्यंबकेश्वर जिल्ह्यातील शेंद्रीपाडायेथील आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नातून उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ये जा करण्याकरीता आता हा मार्ग बंद करण्यात आला आहे. शेंद्रीपाडा येथील महिलांचा लाकडी बल्ल्यावरील जीवघेणा प्रवास माध्यमांनी दाखवला. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी दखल घेऊन काही दिवसांतच हा लोखंडी पूल उभारण्यात आला होता. शिवाय, या पुलाच्या उदघाटनासाठी स्वतः आदित्य ठाकरे आले होते.
खरशेतच्या तास नदीवरील बल्ल्यांवरून जीव धोक्यात घालून शेंद्री पाड्यावरील महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागायचे. आदिवासी महिलांना ३० फूट खोल तास नदीवरील बल्ल्यांवरून रोज पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. स्थानिकांकडून पुलाचा उपयोग होणार नाही, अशी माहिती स्थानिकांनी त्याचवेळी प्रशासनाला आणि युवासेना पदाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
आधी पुल नाही म्हणून जीव धोक्यात घालत नदी ओलांडणाऱ्या या आदिवासी महिलांसमोर आता पुलावर पाणी आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. पुन्हा तीच परिस्थीती उद्भवू नये, यासाठी येथील आदिवासी बांधव प्रार्थना करत आहेत.