मुंबई: भाजप आमदार सुनील राणे यांनी वरळीतील ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी राणे यांनी अधिकार्यांकडून प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. “नवीन आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांत अपेक्षित असणारे काम आपण अडीच वर्षांत पूर्ण करू हा संकल्प घेण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत,” अशी माहिती आ. सुनील राणे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.
पोलिसांच्या घरांची किंमत २५ लाख; ही केवळ घोषणाच
सुनील राणे म्हणाले की, “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प अस्तित्वात आला. दि. २२ एप्रिल, २०१७ ला या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. २०१७-१९ या दोन वर्षांत येथील नागरिकांच्या पात्रता, आराखडे, निश्चिती यासाठी समितीची स्थापना झाली. त्यात कार्याध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे होती. पाचच महिन्यांत आम्ही या प्रकल्पांना गती देण्याचे काम सुरू केले. मात्र, महाविकास आघाडी (मविआ) सरकारने अडीच वर्षांच्या कार्यकाळात प्रकल्प आराखडे बदलून काम सुरू केले. मविआ सरकारकडे वारंवार पोलिसांच्या घराची मागणी झाली. पोलिसांनी या घरांसाठी ५० लाख भरावे, असेही सरकारने सांगितले. याच जागेवरून आम्ही त्यांना विरोध केला. परंतु, सरकारने जाता जाता आम्ही घरांची किंमत २५ लाख करण्याची केवळ घोषणा केली,” अशी टीका राणे यांनी माविआ सरकारवर केली.
२०२४च्या निवडणुकांपूर्वी प्रकल्पाचे काम जिद्दीने पूर्ण करणार
“आमच्या सरकारच्या काळात तीन वर्षांत साडेचार हजार घरांची निर्मिती एकाचवेळी झाली असती. वरळीतील १२१ इमारती पकडल्या, तर ९ हजार, ६८० घरांची निर्मिती करायची आहे. ज्यापद्धतीने गेल्यावर्षी हे काम सुरू झाले, तीन वर्षांत घरे पूर्ण करून द्यायची आहेत. पण आत्ताची परिस्थिती पहिली, तर २०२५ पर्यंत हा पहिलाच प्रकल्पाचा टप्पा पूर्ण होणार नाही. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून या प्रकल्पाला गती देण्याचे काम, पोलिसांच्या घरांबाबतची निश्चिती आणि इथे उभ्या राहत असणार्या सहा विंगबाबत काळ, काम, वेगाचे गणित जुळवले पाहिजे. अनेक स्थानिकांशी मी चर्चा केली. हे काम जिद्दीने पूर्ण करावे लागेल,” असा मानसही राणे यांनी बोलून दाखवला.
प्रकल्पाचे काम अडीच वर्षांत पूर्ण करू
“या प्रकल्पाची सुरुवात भाजपचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झाली होती. त्यामुळे हे आमचे दायित्व आहे. लोकांना अभिप्रेत काम आम्हाला पूर्ण करायचे आहे, ते या सरकारच्या काळात भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नक्की पूर्ण होईल. नवीन आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांत अपेक्षित असणारे काम अडीच वर्षांत पूर्ण करू, हा संकल्प घेण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत,” असेही सुनील राणे म्हणाले.
नागरिकांसोबत चर्चा करणे गरजेचे
या नागरिकांमध्ये असणारे संभ्रम आणि लोकांमध्ये असणारे प्रश्न त्यांच्यामध्ये जाऊन जातीने लक्ष घालून सोडवले जातील. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार आणि मी स्वतः जातीने प्रयत्न करणार आहोत. मागील सरकारने या चाळींचे नामांतर न करता थेट नावेच देऊन टाकली. यात नागरिकांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या सूचना व तक्रारी जाणून घेतल्या पाहिजे होत्या. याबाबत आम्ही पुन्हा एकदा नागरिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून आढावा घेणार आहोत.