मुंबई : "आजवर देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असे घडले की, राज्यपालांनी तातडीने बहुमत चाचणी घ्या, असा निर्णय घेतला आणि सुप्रीम कोर्टानेदेखील अप्रत्यक्षपणे समर्थन केले. ही घटना म्हणजे लोकशाही धोक्यात येण्याचे संकेत आहेत, हे सर्व लोकशाहीला खूप मारक आहे. लोकशाहीचे संवर्धन करायचे असेल तर देशातील जनतेने खूप विचार करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते, आमदार भास्कर जाधव यांनी दिली.
उद्धव ठाकरेंनी ज्या संयमाने आणि धीरोदात्तपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, यातून संपूर्ण महाराष्ट्र हेलावलेला आहे आणि विरोधी पक्ष ज्या प्रकारे पेढे वाटून आनंद व्यक्त करीत आहे. ते लोकशाहीला शोभणारे नाही. कुठलाही पक्ष फोडून माझा पक्ष येणार असेल, तर हाताने नाहीच चिमट्यानेदेखील मी अशा सत्तेला स्पर्श करणार नाही, असे अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितले होते. त्यांच्या या तत्वाला पेढे वाटून तिलांजली देण्याचे काम भाजपने केल्याचेही आ. जाधव म्हणाले.