गोवर, रुबेला आणि गालगुंड

    31-May-2022
Total Views | 136
 
govar
 
 
 
तिन्ही विषाणुजन्य आजारांबद्दल एक गोष्ट चांगली आहे की, लहानपणी एकदा हा आजार झाला तर पुढे आयुष्यभर हा आजार पुन्हा होत नाही. तसेच याची लस ‘एमएमआर’ हीदेखील प्रभावी आहे. ही लस १५व्या महिन्यात दिल्यानंतर हे तिन्ही आजार आयुष्यभरात होण्याची शक्यता अत्यल्प असते. फ्लूच्या लसीप्रमाणे ही लस दरवर्षी घ्यावी लागत नाही. या लसीचे प्रभावी लसीकरण देशभर झाले तर गोवर, रुबेला आणि गालगुंड यांचे आपल्या देशातून निर्मूलन होणे शक्य आहे. त्यासाठी प्रभावी लसीकरणाचा कार्यक्रम व परिणामकारक लोकशिक्षणाची गरज आहे.
 
 
गोवर, गालगुंड आणि रुबेला हे विषाणुंमुळे होणारे साथीचे आजार आहेत. मुलांमध्ये यांचे प्रमाण जास्त आढळते. चार दशकांपूर्वी या तिन्ही आजारांवर लस नव्हती. त्यामुळे साथीच्या दिवसात लहान मुलांना याची मोठ्या प्रमाणात लागण होत असे. कुपोषित मुलांमध्ये या आजारांत गुंतागुंत निर्माण होऊन अनेक समस्या निर्माण होतात. गोवरची लस ८०च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात उपलब्ध झाली. काही वर्षांनी ‘एमएमआर’ (मिझल्स, मम्प्स आणि रुबेला) ही लस एकत्रितपणे उपलब्ध झाली. ही लस तिन्ही आजाराला प्रतिबंधासाठी प्रभावी आहे व ती सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे. गेल्या तीन दशकांतील प्रभावी लसीकरणामुळे या साथीचे प्रमाण पुष्कळ कमी झाले आहे. तरीदेखील प्रभावी आरोग्य लोकशिक्षण आणि प्रभावी लसीकरणाच्या कार्यक्रमाची आज नितांत गरज आहे. ‘एमएमआर’चे लसीकरण हे प्रत्येक मुलामध्ये झाले पाहिजे. शहरी मुलांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांना व चाळीतील मुलांनादेखील ही लस दिली गेली पाहिजे. सरकारी दवाखान्यात लस उपलब्ध असल्यामुळे खर्चाचादेखील प्रश्न येत नाही. ‘एमएमआर’ लसीचे प्रभावी लसीकरण झाले, तर या तिन्ही आजारांचे आपल्या देशातून निर्मूलन होऊ शकते. यासाठी आरोग्य लोकशिक्षणाची नितांत गरज आहे. वरील तिन्ही आजारांचा थोडक्यात आढावा घेऊया...
 
 
गोवर
 
 
तीन ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळतो. हा आजार झपाट्याने पसरतो. रुग्णांशी प्रत्यक्ष संबंधामुळे व ‘ड्रॉपलेट इन्फेक्शन’मुळे याचा प्रसार होतो. वर्गातील किंवा चाळीतील एका मुलास जरी याची लागण झाली, तर ती इतर मुलांमध्ये झपाट्याने पसरते.
 
 
लक्षणे : विषाणुचा शरीरात प्रवेश झाल्यावर आठ ते दहा दिवसांत रुग्णात लक्षणे दिसू लागतात.
 
 
सुरुवातीची लक्षणे : नाक गळणे, डोळे लाल होणे, डोळ्यांच्या खाली सूज येणे. त्यानंतर तापाला सुरुवात होते. पहिल्या दिवशी ताप कमी प्रमाणात असतो. तो पुढील दोन दिवस वाढत जातो. याच सुमारास रुग्णाला तोंडात गालाच्या आतल्या बाजूला पुरळ उठते. साबुदाण्याच्या आकाराचे हे पुरळ असते. त्याच्याभोवती लालसर किनार असते. याला ‘कॉप्लिक स्पॉट’ म्हणतात. रोगाचे निदान पक्के करण्यासाठी ‘कॉप्लिक स्पॉट’चा उपयोग होतो.
 
 
अंगावर पुरळ उठणे: तापाच्या साधारणत: पाचव्या दिवशी अंगावर पुरळ दिसू लागते. याची सुरुवात कानाच्या मागून होते व पुढील दोन दिवसांत हे पुरळ सर्व शरीरभर पसरते. लालसर व जाडसर असे हे पुरळ असते. हेच पुरळ घशात व तोंडातदेखील येते. त्यामुळे जेवताना रुग्णास त्रास होतो. पुरळ चार ते पाच दिवस राहतात व मग ते काळे पडू लागतात. याच सुमारास गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. काही मुलांना या काळात कोरडा खोकला येतो.
 
 
गुंतागुंत : गोवर हा आजार प्राणघातकदेखील ठरू शकतो. खासकरुन कुपोषित मुलांमध्ये गुंतागुतीचे प्रमाण अधिक असते. ‘ब्रॉन्कोन्यूमोनिया’, मेंदूज्वर, कानातून पू येणे, जास्त प्रमाणात तोंड येणे, प्रतिकारशक्ती कमी होऊन इतर रोगांची लागण होणे इत्यादी गुंतागुंत या आजारात होऊ शकते. अशा रुग्णांना काही वेळा रुग्णालयात भरती करावे लागते.
 
 
चाचण्या : गोवरच्या रुग्णाचा वैद्यकीय इतिहास आणि तपासणी यावरुनच याचे निदान होते. कोरोनासारख्या महागड्या चाचणीची यात गरज नसते. गुंतागुंत निर्माण झाली तरच चाचण्या केल्या जातात.
 
 
उपचार : रोगाचे लवकर निदान होणे महत्त्वाचे आहे. त्याने आजाराचा प्रसार कमी करता येतो. गोवरचे निदान झालेल्या मुलांना आठ ते दहा दिवस शाळेत पाठवू नये. यामुळे वर्गामध्ये होणारा प्रसार टाळता येतो. मुलांनी घरीच आराम करणे आवश्यक आहे. तोंड आलेले असल्यामुळे तिखट, मसालेदार जेवण टाळावे. खिचडी, कांजी, सूप, फळांचा रस, वरण-भात, कमी तिखट भाजी यांचा आहारात समावेश करावा. तोंडाच्या आत ‘ग्लिसरीन बोरॅक्स’ लावावे म्हणजे तोंड आलेले कमी होईल. रुग्णास अंघोळ घालणे शक्यतो टाळावे, पण ‘स्पंजिंग’ नियमित करावे. ताप आल्यास ‘पॅरासिटॅमॉल’ची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावी. खोकला जास्त प्रमाणात असल्यास एक्स-रे काढून पुढील उपचार करावे. डोळे जास्त लाल झालेले असल्यास डॉक्टरांचा सल्ल्याने डोळ्यांचे ड्रॉप्स उपयोगात आणावे.
 
 
प्रतिबंधात्मक उपाय: गोवरवर प्रभावी लस उपलब्ध आहे. नवव्या महिन्यात ती लस दिली जाते. ‘एमएमआर’ची लस १५व्या महिन्यात दिली जाते. या दोन लसी घेतल्यावर गोवर होण्याची शक्यता अगदी कमी असते. या लसीने जवळजवळ आयुष्यभर संरक्षण मिळते.
 
 
रुबेला
 
 
रुबेलाची लक्षणे ही साधारणत: गोवरसारखीच असतात. फक्त यामध्ये ताप कमी प्रमाणात येतो व पुरळही कमी प्रमाणात येते. विशेष गुंतागुंत न होता, हा आजार बरा होतो. असे असले तरी रुबेला जर गरोदरपणाच्या सुरुवातीला झाला, तर त्याचा परिणाम वाढणार्‍या गर्भावर होऊ शकतो. जन्मलेल्या मुलांमध्ये अनेक व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते. उदा. फाटलेला ओठ, फाटलेला टाळू, हृदयरोग, मोतीबिंदू इत्यादी व्यंगासहित मूल जन्माला येते. रुबेलाची लक्षणे गोवरसारखीच पण सौम्य असल्यामुळे काही मुलांमध्ये हा आजार होऊन गेला, तरी त्याचे निदान होत नाही. नकळत ते बरेही होतात. ही मुले रुबेलाच्या प्रसारात कारणीभूत ठरतात. ताप येऊन अंगावर पुरळ आल्यास त्याचा उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.रुबेलाचा संशय आल्यास अशा मुलांना शाळेत पाठवू नये. आराम व आहार याकडे लक्ष द्यावे. ताप जास्त असल्यास तापासाठी ‘पॅरासिटॅमॉल’ची गोळी द्यावी. गरोदर स्त्रीस अंगावर पुरळ येऊन ताप आल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.
प्रतिबंधात्मक उपाय : ‘एमएमआर’ लसीमध्ये रुबेलाचा समावेश आहे. ही लस १५व्या महिन्यात देतात. नऊ वर्षांच्या वरच्या मुलींना एक ‘बूस्टर डोस’ देतात. मध्यंतरी रुबेला लसीकरणाची व्यापक मोहीम सरकारतर्फे राबविण्यात आली होती.
 
 
गालगुंड
 
 
हादेखील झपाट्याने पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. विषाणुचा शरीरात प्रवेश झाल्यावर साधारणत: दोन आठवड्यांनी त्याची लक्षणे दिसू लागतात.
 
 
लक्षणे : अंग दुखणे, बारीक ताप येणे, अन्न गिळताना त्रास होणे, कानाच्या खाली दुखणे इत्यादी प्राथमिक लक्षणे दिसतात. यानंतर कानाच्या खाली असलेल्या लाळग्रंथीला सूज येते. सूज दुसर्‍या कानाच्या लाळ ग्रंथीत पसरते. हनुवटीच्या खाली असलेल्या लाळ ग्रंथीला सूज येऊन चेहरा चंद्रासारखा गोल होतो. ही सूज तीन ते पाच दिवस राहते व नंतर हळूहळू कमी होते. या काळात ताप येणे, उलट्या होणे, वृषणावर (टेस्टिजवर) सूज येणे इत्यादी लक्षणेदेखील आढळतात.
 
 
उपचार : लाळग्रंथींना सूज आल्यामुळे जेवताना त्रास होतो, म्हणून साधे जेवण घ्यावे. आहारात आंबट पदार्थ वर्ज्य करावे. जीभेवर पांढरा थर चढला असेल, तर ‘ग्लिसरिन बोरॅक्स’ लावावे. तापासाठी, उलटीसाठी, वृषणाच्या सुजेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी.
 
 
लाळग्रंथींवर सूज इतर अनेक कारणाने येऊ शकते. खासकरून प्रौढांमध्ये ही सूज लाळग्रंथींचा मार्ग बंद झाल्यामुळे किंवा ‘पॅरॉटिड ट्युमर’मुळेदेखील असण्याची शक्यता असते.
 
 
या तिन्ही विषाणुजन्य आजारांबद्दल एक गोष्ट चांगली आहे की, लहानपणी एकदा हा आजार झाला तर पुढे आयुष्यभर हा आजार पुन्हा होत नाही. तसेच याची लस ‘एमएमआर’ हीदेखील प्रभावी आहे. ही लस १५व्या महिन्यात दिल्यानंतर हे तिन्ही आजार आयुष्यभरात होण्याची शक्यता अत्यल्प असते. फ्लूच्या लसीप्रमाणे ही लस दरवर्षी घ्यावी लागत नाही. या लसीचे प्रभावी लसीकरण देशभर झाले तर गोवर, रुबेला आणि गालगुंड यांचे आपल्या देशातून निर्मूलन होणे शक्य आहे. त्यासाठी प्रभावी लसीकरणाचा कार्यक्रम व परिणामकारक लोकशिक्षणाची गरज आहे.
 
 
- डॉ. मिलिंद शेजवळ
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121