मुंबई : “आगामी काळात घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष करावा लागणार असून मुंबई महानगरपालिकेतील घराणेशाहीचा पराभव होईल. येणार्या काळात मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करण्याकरिता आणि ‘प्रायव्हेट लिमिटेड’ पक्षाला हटविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. दबावाला बिलकुल बळी पडू नका. महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू,” असा निर्धार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भाजप पक्ष स्थापनादिनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केला.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी दादर येथील ‘वसंतस्मृती’ कार्यालयातील सभागृहात भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजप प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, आ. अॅड. आशिष शेलार, आ. कालिदास कोळंबकर, कॅप्टन आर. तमिळ सेल्वन, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष पवन त्रिपाठी, सचिव प्रतीक कर्पे, भाजप दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना दृक्श्राव्य माध्यमाद्वारे संबोधित केले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष लोकांची सेवा करत विस्तारत जाणारा पक्ष आहे. मुळातच पक्षाची निर्मिती राष्ट्रवादातून झाली आहे. भाजप संघर्ष करत जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. अनेकवेळा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला, पण विचार संपला नाही. पक्षाकडे दोन जागा असताना घाबरलो नाही. आता तर 302 जागा आहेत,” असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
ते पुढे म्हणाले की, “राज्यातील सध्याची परिस्थिती भयानक आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास तुरुंगामध्ये डांबले जाते. घरे तोडली जातात. संस्कृती पायदळी तुडवली जाते. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे. यापुढे महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मुंबईतील परिस्थिती विदारक असून मुंबई महापालिकेने कोविड काळात प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला. खर्या अर्थाने प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे काय ते महापालिकेच्या सत्ताधार्यांनी दाखवून दिले आहे. अधिवेशनात मुंबई महापालिकेतील घोटाळे उघड केले. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावर चकार शब्द उच्चारला नाही. आगामी काळात घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष करावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील घराणेशाहीचा पराभव होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष समतेचा संदेश देत गरिबाच्या कल्याणासाठी काम करणारा पक्ष असल्याचे सांगून फडणवीस पुढे म्हणाले की, “शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे हे आमचे लक्ष्य आहे. केवळ ‘सेक्युलर’च्या नावाखाली विशिष्ट धर्माचे लांगूलचालन करण्यापेक्षा देशातील गरिबांना सेवा देण्याचे काम भाजप करत आहे. येणार्या काळात शोषित आणि वंचितांसाठी विकासकामांच्या योजना आणून तळागाळातल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.