पुरुषसिंह

    26-Mar-2022
Total Views | 108

Tilakparv
 
 
 
अरविंद व्यं. गोखले लिखित ‘टिळकपर्व (१९१४-१९२०)’ या ‘राजहंस प्रकाशना’च्या आगामी पुस्तकाचे प्रकाशन गीतारहस्य जयंतीचे औचित्य साधून दि. ३० मार्च रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने पुस्तकाच्या संहितेतील संक्षिप्त भाग प्रसिद्ध करीत आहोत.
 
 
 
मंडालेच्या तुरुंगातून सुटका होऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यात गायकवाड वाड्याच्या दारासमोर उभे राहिले तो दिवस होता, दि. १७ जून, १९१४. टिळकांच्या डोळ्यांसमोरून १८९७ पासूनची १७ वर्षे झरझर सरकत गेली. राजद्रोहाचे दोन खटले आणि प्रदीर्घ कारावास. असंख्य यातनांना सामोरे जात त्यांनी ज्या धीरोदात्तपणे क्रूरकर्मा ब्रिटिशांशी संघर्ष केला, त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. दुसर्‍या राजद्रोहाच्या खटल्याच्या निकलापूर्वी जेव्हा न्यायमूर्ती दिनशा दावर यांनी, ’तुम्हाला काही सांगायचे आहे काय?’ असे टिळकांना विचारले, तेव्हा त्यांनी "ज्यूरींनी जरी मला गुन्हेगार ठरविले असले; तरी मी निर्दोष आहे, अशी माझी मनोदेवता मला ग्वाही देत आहे. मानवी शक्तीहून अधिक वरिष्ठ प्रतीच्या शक्ती जगत्सूत्रे चालवीत आहेत आणि मी ज्या कार्याकरता प्रयत्न केले, त्या कार्याला माझ्या दु:खाने व संकटानेच अधिक जोर यावा, असा ईश्वरी नेमानेम दिसतो!" असे बाणेदार उद्गार काढले होते. त्याने ते न्यायालयही थक्क झाले. त्यालाही आता सहा वर्षे झाली. मध्ये बरेच काही घडून गेले. तरी त्यांचा संघर्ष संपलेला नव्हता. टिळकांना राजद्रोहाची झालेली पहिली शिक्षा त्यांच्या स्फोटक लिखाणाबद्दल होती. दुसरी शिक्षाही त्याच कारणांसाठी होती. १८९७ मध्ये राजद्रोहाच्या पहिल्या खटल्यात चार्ल्स वॉल्टर रँड आणि लेफ्टनंट सी. ई. आयर्स्ट यांच्या खुनाच्या प्रकरणात टिळकांना अडकवायचे होते, ब्रिटिशांचा तो प्रयत्न फसला. रँड आणि आयर्स्ट यांचा खून गणेशखिंड रस्त्यावर चाफेकर बंधूंनी केला. पण, त्यात जर चाफेकरांना अपयश आले असते, तर लोकमान्यांचे एक निष्ठावान कार्यकर्ते आणि भाऊ रंगारी तालमीचे वस्ताद काशीनाथ ठकुजी जाधव यांनी रँडचा काटा काढला असता.
  
 
 
त्या खटल्यात टिळकांना १८ महिन्यांची शिक्षा झाली. पण, त्यापैकी सहा महिने मॅक्समुल्लर यांच्या प्रयत्नांनी कमी झाले. दि. ४ जुलै, १८९९ रोजी ‘केसरी’त टिळकांनी लिहिलेल्या ’पुनश्च हरि ॐ’ या अग्रलेखाने टिळकांनी संपादकपदाची सूत्रे आपल्या हाती पुन्हा घेतली. या अग्रलेखात त्यांनी १८९७-९८च्या परिस्थितीची उजळणीच केली. त्यांनी या सर्व खटलाक्रमात ’केसरीवर किंबहुना पुणे शहरावर जे एक काहूर उसळले होते त्यात केसरीकारच नव्हे, तर केसरीही लयाला जातो काय, अशी धास्ती पुष्कळांस पडलेली असल्याचे’ म्हटले होते. ते पुढे म्हणतात, “ ’राजद्रोह हा शब्द जरी लहान असला, तरी त्याचा महिमा मोठा आहे व गणेशचतुर्थीच्या चंद्रनिरीक्षणाने जरी या गुन्ह्याचा आरोप कोणावर आलेला असला, तरीदेखील त्याचे परिणाम पुष्कळ अनिष्टकारक होण्याचा संभव असतो. हे सर्व परिणाम जर ‘केसरी’स भोगावे लागले असते, तर ’हरेरद्य द्वारे शिव शिव शिवानां कलकल:’ अशी स्थिती केव्हाच येऊन ठेपली असती. ही स्थिती न येण्यास जे गृहस्थ कारणीभूत झाले, त्यात मुख्यत्वेकरून आमचे मित्र नरसिंह चिंतामण केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर व आमचे मुंबईचे बातमीदार ’अनंत’ हे होत. या गृहस्थांनी आमच्या गैरहजेरीत ‘केसरी’ची व तद्द्वारा महाराष्ट्राची जी सेवा केली, किंबहुना त्यास जीवितसंशयापासून बचावले, त्यांजबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.” ‘केसरी’च्या जबाबदार प्रकाशकांत खाडिलकर यांचे नाव जरी दाखल केले नसले, तरी ‘केसरी’तील बहुतेक ‘एडिटोरियल’ लेख त्यांच्याच हातचे होते, हे येथे सांगणे जरूर आहे, असे सांगून त्याबद्दल त्यांनी खाडिलकरांचे जास्त आभार मानले आहेत. आपली मुदतीपूर्व सुटका झाली, त्याला मुख्यत्वेकरून प्रो. मॅक्समुल्लरसारख्यांचे निरपेक्ष प्रयत्न कारणीभूत असल्याचे टिळकांनी त्यात स्पष्ट केले होते.
 
 
 
सुरतेत १९०७ मध्ये काँग्रेस मोडल्यापासून टिळक अस्वस्थच होते. त्यांना उत्तर हिंदुस्थानातून ‘केसरी’च्याच ताकदीचे एक वर्तमानपत्र प्रसिद्ध करायचे होते. सुरतेच्या धामधुमीत त्यांना भेटायला पेशावरहून अमीरचंद बॉम्बवाल नावाचा मिसरूडही न फुटलेला (जन्म दि. ८ ऑगस्ट, १८९३) एक तरुण भेटायला आला. त्याने टिळकांच्या पायांना हात लावून वंदन केले आणि आपल्याला आठवड्यातून ‘केसरी’ प्रसिद्ध करायचा असल्याचे सांगितले. अलाहाबादचे शांतिनारायण त्यांच्यासमवेत होते. अमीरचंद हा पेशावरचाच राहणारा आणि खान अब्दुल गफारखान यांचा चाहता. त्याने आपल्या वृत्तपत्राचे नाव ‘केसरी’च असेल, पण ते उर्दूतून निघेल, असे त्यांना म्हटले. अवघ्या १४व्या वर्षी अमीरचंद भेटायला येतो आणि ‘उर्दू केसरी’ काढायची कल्पना मांडतो, हे थक्क करणारे होते. त्यावेळी ‘केसरी’ हिंदीतून नागपूरमधून निघत असे. टिळकांनी ‘उर्दू केसरी’ची ती कल्पना उचलून धरली. बनारसमधून आपल्याला शि. म. परांजपे यांच्या ’काळ’चीही हिंदी आवृत्ती प्रकाशित करायची असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा टिळकांनी त्या तरुणाच्या उत्साहाला दाद दिली. त्याला प्रोत्साहन देऊन त्यांनी पुण्यास सविस्तर चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी त्यास आपला निव्वळ पाठिंबाच दिला असे नाही, तर आपण त्या वृत्तपत्राची सर्व आर्थिक जबाबदारी स्वीकारायला तयार आहोत, असे स्पष्ट केले. ते त्यास पुण्यात भेटलेही. पण, या वृत्तपत्रांसाठी त्यांना जेवढा वेळ द्यायला हवा होता, तेवढा मिळाला नाही, त्यानंतरच त्यांच्यावर राजद्रोहाचा दुसरा खटला झाला. शांतिनारायण यांनी ‘स्वराज्य’ नावाचे वृत्तपत्र अलाहाबादमधून नोव्हेंबर १९०७ मध्ये सुरू केले. त्या काळात ज्याला ‘संयुक्त प्रांत’ म्हणून किंवा इंग्रजीत ’युनायटेड प्रॉव्हिन्स’ म्हटले जात असे, तिथे ’स्वराज्य’ने क्रांतिकार्यात सिंहाचा वाटा उचलला.
 
 
 
टिळकांनी ’स्वराज्य’साठी पाठवलेल्या आपल्या संदेशात म्हटले होते की, “संयुक्त प्रांतात स्वराज्याच्या चळवळीचे बीज आपल्या या ’स्वराज्य’मुळे चांगले रोवलेे जावो, हीच सदिच्छा.” पंजाब वृत्तपत्रात शांतिनारायण आधी उपसंपादकपदावर काम करत होते आणि त्यांनी लाला लजपतराय तसेच अजितसिंग यांच्या सुटकेची मागणी लावून धरली. तत्पूर्वी या दोघांना तेव्हा पंजाबमधून हद्दपार करण्यात आले होते. मुझफ्फरपूरच्या बॉम्बस्फोटांविषयी शांतिनारायण यांनी सरकारला कडक शब्दात धारेवर धरले. त्या वृत्तपत्राच्या आठ संपादकांपैकी सात जण पंजाबी होते आणि त्यापैकी तिघांना शिक्षा सुनावण्यात आली. शांतिनारायण यांच्याविरोधात ‘१२४ अ’ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला, त्यात ’स्वराज्य’मध्ये टिळकांच्या मराठी लेखनाचे हिंदीत भाषांतर करून ते प्रसिद्ध केल्याचाही एक गुन्हा होता. शांतिनारायण यांना साडेतीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. सरकारची सुडाची भावना इतकी तीव्र होती की, पंजाबमध्ये हे वृत्तपत्र वाचणाराही शिक्षेस पात्र ठरवला गेला. काही जणांची शिक्षा सात ते दहा वर्षांपर्यंत वाढवली गेली. शांतिनारायण भटनागर, रामदास सुरेलिया (स्वामी प्रकाशानंद सरस्वती), होतीलाल वर्मा, नंदगोपाळ चोप्रा, शामदास वर्मा, लढाराम कपूर आणि अमीरचंद बाँबवाल यांना तुरुंगात पाठवण्यात आले. नंतरच्या काळात त्या वृत्तपत्राच्या धोरणात काहीही बदल न झाल्याने १९१०च्या ‘प्रेस अ‍ॅक्ट’नुसार त्याचा गळा घोटण्यात आला. ’स्वराज्य’वर अलाहाबादमध्ये कारवाई होताच तो पेशावरमधून प्रसिद्ध होऊ लागला. पंजाबमध्ये त्याचवेळी ’पंजाबी’ नावाचे वृत्तपत्र चालवले जात होते आणि त्याचे संपादक होते के. के. आठवले. त्यांच्या वृत्तपत्रात टिळकांच्या अग्रलेखांची स्वतंत्र भाषांतरे प्रसिद्ध होऊ लागताच त्यावर कारवाई झाली. त्याच सुमारास दिल्लीमध्ये ’आफताब’ नावाचे वृत्तपत्र होते. त्याचे संपादक होते रामचंद्र पेशावरी. त्यांचा शोध घेऊन पोलीस थकले.
 
 
 
रँडच्या खुनाच्या प्रकरणानंतर बरोबर दहा वर्षांनी पुन्हा जवळपास तशीच स्थिती निर्माण झाली. तेव्हाच्या बंगालमध्ये मुझफ्फरपूर येथे खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चक्रवर्ती यांनी दि. ३० एप्रिल, १९०८ रोजी सत्र न्यायाधीश डग्लस किंग्जफोर्ड यांच्या घोडागाडीवर बॉम्ब फेकतो आहोत, असे समजून बॉम्ब फेकला, पण, त्या गाडीत बसलेल्या इंग्रज बॅरिस्टर प्रिंजल केनेडी यांची पत्नी आणि मुलगी या दोघी ठार झाल्या. बॉम्ब कसे बनवावेत, हे विनायक दामोदर सावरकर यांचे शिष्य पांडुरंग महादेव बापट यांनी कलकत्त्यास जाऊन बंगाली तरुणांना शिकवलेले होते. इंग्लंडहून आलेल्या बापटांनी या बॉम्बचे पहिले प्रात्यक्षिक पुण्यात गायकवाड वाड्याच्या विहिरीतच केलेले होते. २२ मे रोजी टिळक आणि महाराष्ट्रातील काही जहाल पुढारी यांच्या सह्यांचे एक पत्रक प्रसिद्ध झाले. त्यात मुझफ्फरपूरच्या घटनेने आपल्याला अतीव खेद वाटत असल्याचे म्हटले होते. बॉम्बहल्ल्याची दखल ‘केसरी’कडून घेतली जाणे स्वाभाविक आणि टिळकांच्या स्वभावानुसार होते. टिळकांच्या ‘केसरी’त तेव्हा प्रसिद्ध झालेल्या एकूण आठ लेखांना इंग्रज सरकारचा आक्षेप होता. ’देशाचे दुर्दैव’ (दि. १२ मे, १९०८) हा अग्रलेख आणि त्याच अंकातील दोन स्फुट सूचना असे एकूण तीन लेख टिळकांच्या लेखणीतून उतरलेलेे होते. अन्य पाच लेख काकासाहेब खाडिलकर यांचे होते. ‘केसरी’त प्रसिद्ध झालेले हे लेखन आपले नाही, असे टिळकांनी न्यायालयास सांगितले असते, तर इतिहास वेगळा झाला असता. पण, त्यांनी तसे म्हटले नाही. इंग्रजांच्या मते, प्रत्यक्ष बॉम्बस्फोटापेक्षाही अतिस्फोटक असलेल्या त्या लेखनाबद्दल टिळकांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली. दि. २२ जुलै, १९०८ रोजी शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर रातोरात त्यांना खास रेल्वेने साबरमतीच्या तुरुंगात हलविण्यात आले. साबरमतीच्या तुरुंगात त्यांचा मुक्काम दि. १३ सप्टेंबर, १९०८ पर्यंत होता. तिथून त्यांना रंगूनमार्गे मंडालेला नेण्यात आले. त्यांचा सहा वर्षांचा काळ तुरुंगात गेला, पण त्या काळात बर्‍याच घटना घडून गेल्या होत्या. त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचे दि. ७ जून, १९१२ रोजी निधन झाले.
 
 
 
मंडालेहून दि. १७ जून, १९१४ रोजी परतल्यावर टिळकांचे ‘लोकमान्यत्व’ अधिक ठसठशीत आणि अर्थातच अतिशय प्रखरतेने तळपू लागले. काळ्या पाण्याच्या त्या शिक्षेपूर्वी भर न्यायालयात त्यांनी ’आकाश कोसळले, तरी त्यावर मी पाय देऊन उभा राहीन!’ अशी सिंहगर्जना केली होती. त्यानुरूप ते उभे होते. न्यायमूर्ती दिनशा दावर यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली, तो दिवस होता त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्रीचा - म्हणजेच दि. २२ जुलै, १९०८चा. विशेष हे की, टिळकांवर मुंबई उच्च न्यायालयात खटला चालू असतानाच त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त ठरवून १८ जुलै रोजीच देशभर सरकारविरोधी निदर्शने आयोजित करण्यात आली, त्यामागे सरकारवर दडपण आणायचा हेतू होता, असे सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या राजद्रोहाच्या अहवालात म्हटले (सीडिशन कमिटी रिपोर्ट, १९१८). या अहवालात म्हटले होते की, नागपूर, कलकत्ता, मुंबई, पुणे, मद्रास, लखनौ, लाहोर आणि अमृतसर ही शहरे अतिशय संवेदनक्षम आहेत आणि त्यांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नागपूरची जी जहालमतवादी वृत्तपत्रे आहेत, त्यात आघाडीवर असलेल्या ’देशसेवक’ने मुझफ्फरपूरच्या बॉम्बस्फोटप्रकरणानंतर दि. ११ मे, १९०८ रोजी लिहिलेेल्या अग्रलेखात ‘बॉम्ब बनवायचा प्रत्येकाचा अधिकारच असल्या’चे प्रतिपादन केले होते. त्यात असेही म्हटलेे होते की, ’खुदिराम बोसने किंग्जफोर्डची हत्या करण्याचा केलेला प्रयत्न हा योग्य नाही, त्याचे कुणीही अनुकरण करू नये, म्हणूनच आम्ही त्याचा अतिशय जोरदार निषेध करीत आहोत, असे असले तरी प्रत्येकाने बॉम्बचे ज्ञान हे प्राप्त केलेेच पाहिजे आणि ते सहज प्राप्त व्हावे, यासाठी सरकारकडे पाठपुरावाही केला पाहिजे. खुदिराम बोसच्या हल्ल्यातून वाचल्याबद्दल आपण किंग्जफोर्डचे अभिनंदनही करूया. पण, किंग्जफोर्डने कलकत्त्याचे पे्रसिडेन्सी मॅजिस्ट्रेट या नात्याने जे काही निर्णय घेतले, ते भयावह आणि सैतानी पद्धतीचे होते, यात शंकाच नाही.’
 
 
 
इतक्या उघड पद्धतीने टिळकांनीही बॉम्बचे किंवा तो वापरणार्‍याचे समर्थन केले नव्हते. अलीपूरच्या बॉम्बस्फोट प्रकरणात पकडलेल्यांमध्ये नागपूरचा एक तरुण होता. हे लिखाण स्फोटक होते, यात शंका नाही. त्याचवेळी माधवराव सप्रे यांचा ‘हिंदी केसरी’, तसेच, ‘युगांतर’ या वृत्तपत्रांवर सरकारने कारवाई केली होती आणि ’युगांतर’च्या संपादकांवर खटला भरला, मात्र माणिकतोळा बॉम्बस्फोट प्रकरणानंतरही ‘युगांतर’चे प्रकाशन चालू राहिले, असे हा राजद्रोहविषयक सरकारी अहवाल सांगतो. ’युगांतर’ने देश स्वतंत्र होण्यासाठी हा बॉम्बस्फोट असल्याचे सांगून या घटनेचे स्वागत केले, असे या अहवालात म्हटले आहे. दरोडेखोर, चोरटे आणि बदमाश यांच्याविरोधी युद्ध पुकारणे म्हणजे काही कटकारस्थान नव्हे, असे ’युगांतर’चे म्हणणे होते. सप्रे यांच्यावरही राजद्रोहाचे आरोप होते, पण ते आजारी पडल्याने त्यांनी माफी मागितली आणि स्वत:ची सुटका करवून घेतली. तरीही ‘केसरी’कडे जसे सरकारचे लक्ष गेले, तसे ते या वृत्तपत्रांकडे गेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘केसरी’चेच हिंदी रुपांतर म्हणून ’देशसेवक’ सुरू करण्यात आले. त्यात नागपूरमधल्या जहाल काँग्रेसजनांचा पुढाकार होता. ’देशसेवक’ मराठीतूनही प्रकाशित होऊ लागले. १८९१ मध्ये हरि माधव पंडित आणि चिंतामणी रामचंद्र केळकर यांनी ‘देशसेवक’ हे साप्ताहिक पत्र सुरू केले. पुढे महादेव कृष्ण तथा माधवराव पाध्ये यांच्याकडे त्या पत्राची मालकी तसेच त्याचे संपादकपद आले. पंडित वा पाध्ये हे गोखलेवादी म्हणजेच नेमस्त पंथाचे असल्याने त्यातून टिळकांचे विचार पुढे येईनात. कलकत्ता काँग्रेस १९०६ मध्ये पार पडल्यावर पुढले अधिवेशन नागपूरात होण्याचे ठरले. अशावेळी पाध्ये यांना मदत व्हावी, या उद्देशाने टिळकांनी गोपाळराव ओगलेे यांना नागपूरात पाठवून दिले. ओगले हे महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच चळवळींकडे वळले.
 
 
 
ओगले हे नागपूरात गेले, त्याआधी अच्युत बळवंत कोल्हटकर हेही नागपूरात पोहोचले. अच्युतरावांचे वडील वामनराव कोल्हटकर हे नागपूरच्या न्याय खात्यात अधिकारी आणि सुधारणावादी होते. वामनरावांनी अच्युतरावांना ’देशसेवक’मध्ये लिहायला सांगितले. (अच्युतरावांचे पालनपोषण त्यांचे चुलते बळवंतराव यांनी केल्याने ते त्यांचेच नाव लावत.) आपल्या वडिलांप्रमाणे अच्युतरावही मवाळ असतील, असे वाटल्याने पाध्ये यांनी ‘देशसेवक’ पाहायला त्यांना परवानगी दिली; पण त्यांनी नेमस्त पक्षाचे धोरण पुढे न रेटता टिळकांच्या जहाल पक्षाचे धोरण आक्रमकरीत्या राबवले. गोपाळराव ओगले हे टिळकांच्याच सांगण्यावरून ’देशसेवक’मध्ये लिहू लागले. त्यांना शंभुराव गाडगीळ येऊन मिळाले. नागपूर काँग्रेसचे अध्यक्षपद हे टिळकांना देण्यात यावे, असा आग्रह नागपूरचेच एक तरुण कार्यकर्ते बा. शि. मुंजे यांनी धरला आणि त्यास ’देशसेवक’ने पाठिंबा दिला. त्यातूनच ’देशसेवक’मध्ये अतिजहाल लिखाण प्रसिद्ध होऊ लाागले. त्यावेळी मध्य प्रांतात सर रेजिनॉल्ड कॅडॉक याच्यासारखा कडवा नोकरशहा होता, त्याने नागपूरातल्या सर्व जहालांना संपवायचा विडा उचलला. नागपूरात काँग्रेस अधिवेशन भरविण्यात यावे, आणि त्याचे अध्यक्षपद टिळकांना देण्यात यावे, यासाठी अरविंद घोष यांचे जे भाषण झाले, ते ’देशसेवक’ने सविस्तर छापले. हे भाषण प्रसिद्ध केल्याबद्दल संपादक असलेल्या अच्युतरावांना अडीच वर्षांची शिक्षा झाली. आपले नाव संपादकपदी चुकून छापले गेल्याची भूमिका अच्युतरावांनी न्यायालयात घेतली, पण ती मान्य झाली नाही.
 
 
 
बचाव अधिक राजद्रोही
अच्युतरावांना शिक्षा झाल्याने वृत्तपत्राचे संपादकपद हे गोपाळराव ओगले यांना देण्यात आले, तेही टिळक पक्षाचेच असल्याने पत्राच्या धोरणात काहीही फरक पडला नाही. त्यांच्याही लेखनाविषयी आक्षेप घेण्यात आले. ’ज्या लेखावरून हा राजद्रोहाचा खटला भरण्यात आला, तो लेख राजद्रोहाचाच आहे, असा मला हुकूम असल्याने मी तो तसा आहे, असे न्यायालयात सांगत आहे,’ असे लेखाचा भाषांतरकार अब्दुल अझिझ याने सांगितल्याने ब्रिटिश सरकारचा हेतू स्पष्ट झाला होता. गोपाळराव ओगले यांनी स्वत:च स्वत:चा बचाव केला, तेव्हा ’त्यांचा बचाव हा त्यांच्या लेखांपेक्षा अधिक राजद्रोही आहे’, असे मत न्यायमूर्तींनी व्यक्त केले आणि ओगलेे यांना शिक्षा सुनावली. सांगायचा मुद्दा हा की, टिळक पक्षाच्या सर्वांना संपवून टाकायचा हा सरकारी खटाटोप होता.
 
 
 - अरविंद व्यं. गोखले
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121