मनाची शक्ती इतकी जबरदस्त असते की, मनाच्या विचारांमुळे शरीर, अवयवांवर व पेशींवर त्याचा सतत परिणाम होत असतो. आपले विचार व आपल्या भावना या सतत आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात, कसे ते आपण पाहूया...
जसे आपल्याला आता माहितीच आहे की, माणूस हा नुसत्या पेशींनी बनलेला नसतो, तर तो शरीराबरोबरच मन व चैतन्यशक्ती यांनीदेखील बनलेला असतो. शरीरातील सर्वच संस्था (सिस्टीम) जसे चेतासंस्था, हृदय अणि रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, यकृत, प्लीहा, पित्ताशय आणि पित्त संस्था, पचन संस्था, मलमूत्र विसर्जन संस्था इ. संस्था या एकमेकांशी संलग्नतेने कार्य करत असतात. कुठल्याही एका संस्थेमध्ये जर बिघाड झाला, तर त्याचा परिणाम इतर संस्थांवरही होत असतो. त्याचप्रमाणे मन हीसुद्धा एक सर्वात शक्तिशाली संस्था आहे, जी आपल्याला दिसत नाही. परंतु, ती संपूर्ण शरीराला ताब्यात ठेवून असते. आपल्या काही अवयवांची हालचाल करायची की नाही, हेसुद्धा मनच ठरवते. मन हे भावनांनी बनलेले असते. तसेच, ते इच्छाशक्ती, विवेकबुद्धी व अंतर्मनानेही बनलेले असते. त्याला ‘सुप्त’ किंवा ‘अवचेतन मन’सुद्धा म्हटले जाते.
प्रत्येक माणसाच्या भावना, इच्छाशक्ती व विवेकबुद्धीही तो कुठल्या वातावरणात वाढतो, राहतो, तसेच तो काय आहार घेतो, यावरही अवलंबून असते. कारण, मनाचा एक भाग हा आपण काय अन्न खातो, त्यापासूनही बनलेला असतो. मन अन्नमय असे म्हटले जाते. म्हणजेच काय तर माणसाची विचार करण्याची शक्ती ही त्याच्या आहार, विहार व आचार या तिघांवर अवलंबून असते आणि आपली रोगप्रतिकारकशक्ती ही आहार, विहार, आचार आणि आपले विचार यांवर अवलंबून असते आणि आपल्याला ठाऊकच आहे की, रोगप्रतिकारकशक्ती जेव्हा कमकुवत होते त्याचवेळी माणसाला आजार होत असतो व ही रोगप्रतिकारकशक्ती चैतन्यशक्तीच्या म्हणजेच ऊर्जेच्या समप्रमाणात असते. चैतन्यशक्ती जर चांगली, तरच रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते आणि या चैतन्यशक्तीला कमकुवत करण्याची ताकद ही मनातील विचारांमध्ये असते. असे पाहा की, माणसाचे विचार हे सुरुवातीला कधीच नकारात्मक नसतात. परिस्थिती व वागण्यानुसार ते नकारात्मक होत असतात.
माणूस ज्या परिस्थितीला तोंड देतो किंवा ज्या अनुभवातून जात असतो, त्या अनुभवांमुळे किंवा घटनांमुळे प्रत्येक माणसाची विचार करण्याची एक पद्धत झालेली असते. त्याची विचारांची जडणघडण त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर तर असतेच. परंतु, त्यांच्या स्वत:च्या मूळ स्वभावावर पण अवलंबून असते. टीका घडणार्या विविध घटनांचा आपल्या मनावर सतत परिणाम होऊन त्या घटनांच्या आधारे आपण आपली एक संवेदना (फीलिंग) बनवत असतो. या संवेदना एकत्र येऊन एक ‘स्टेट’ बनते, एक स्थिती बनते. या स्थितीलाच आपण ‘स्टेट ऑफ डीस्पोझिशन’ असेही म्हणतो आणि जेव्हा या ‘स्टेट ऑफ डीस्पोझिशन’ च्या मध्ये काही बदल होतो, जो नकारात्मक असतो, अशा वेळी माणसाची सहजता निघून जाते व त्याचा आजार होतो. ही माणसाची स्थिती कशी तयार होते, ते आता यापुढे आपण पाहूया. (क्रमश:)
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)