मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात येत्या वर्षी जानेवारी महिन्यात पहिल्या सागरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारीच्या मध्यावर म्हणजेच दि. १३, १४ आणि दि. २१ आणि २२ जानेवारी हे चार दिवस हा सागरी मोहोत्सव आयोजित केला आहे. सागरी परीसंस्थांचे मानवी जीवनातील महत्व आणि त्या जतन करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीच्या सागरी किनाऱ्याचे वरदान लाभले आहे. या सागरी किनाऱ्यांवर एक मोठी परिसंस्था अवलंबून असते. ही परिसंस्था जपणं आणि जतन करणं किती महत्वाचं आहे याविषयी जनजागृती करणे हा या सागरी महोत्सवाचा हेतू आहे.आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समुद्राचे योगदान काय?, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या महोत्सवात निसर्ग प्रेमींना मिळणार आहेत. समुद्र आणि सागरी किनाऱ्यावरील परिसंस्थेची गुपिते उलगडून सांगणारी तज्ञ मंडळी या महोत्सवात भेटीला येणार आहेत.
काय आहे वेळापत्रक ?
या महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये म्हणजेच दि.१३ आणि १४ जानेवारी रोजी काही जागतिक किर्तीच्या लघुपटांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच काही तज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन ही करण्यात आले आहे. या व्याख्यानांमध्ये कासव, खारफुटीची वृक्षे , स्थानिक पक्षी , शाश्वत मासेमारी या आणि अशा विषयांवर तज्ञांची व्याख्याने होणार आहेत. तर, महोत्सवाचे पुढील दोन दिवस म्हणजेच २१ आणि २२ तारखेला वाळू शिल्प प्रदर्शन आणि अभ्यास फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. भाट्ये येथील वालुकामय समुद्र किनाऱ्यावर प्रदीप पाटाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासफेरीचे आयोजन केले आहे. तसेच, मांडवी येथील खडकाळ किनाऱ्याची ओळखसफर हेमंत कारखानीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली आहे.
कोण आहेत आयोजक ?
आसमंत बेनेवोलेंस फौंडेशन हे या सागरी महोत्सवाचे मुख्य आयोजक आहेत तर किर्लोस्कर वसुंधरा , विवांत अनटेमड अर्थ फौंडेशन, इकॉलोजीकल सोसायटी आणि कोस्टल कॉन्सरवेशन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जात आहे. आसमंत बेनेवोलेंस फौंडेशन आणि सागर महोत्सवाचे संयोजक नंदकुमार पटवर्धन , विवांत फौंडेशनचे डॉ. संजीव शेवडे , कोस्टल कॉन्सरवेशन फाऊंडेशनचे प्रदीप पाटाडे आणि इकॉलोजीकल सोसायटीचे डॉ. गुरुदास नूलकर आणि किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संयोजक विरेंद्र चित्राव यांच्यासह इतर अनेक तज्ञ मंडळी यात समाविष्ट आहेत. तसेच , सागरी परीसंस्थेची ओळख , महत्व आणि जतन करण्याची गरज अशा उद्दात हेतुमधून आयोजित केलेला हा मोहोत्सव येणाऱ्या निसर्ग प्रेमींसाठी विनामूल्य आयोजित केला आहे.
कसा कराल सहभागासाठी संपर्क ?
या सागर महोत्सवात सहभाग घेण्यासाठी www.aasmant.org या वेबसाईट वर जाऊ शकता. तसेच आसमंत फौंडेशनच्या फेसबुक पेजवर अधिक माहिती मिळवू शकता आणि मोहोत्सवाचे संयोजक नंदकुमार पटवर्धन यांच्याशी थेट संपर्क ही साधू शकता.
“सुट्टीचा कालावधी असल्यामुळे या पहिल्याच सागर महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळेल. मुळातच रत्नागिरी समुद्राने वेढलेले आहे पण सामान्यांना या समुद्राची पुरेशी ओळख नसते , दैनंदिन जीवनातील सागराचे महत्व माहित नसते. या निमित्ताने समुद्रातील परीसंस्थेकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळू शकेल. आणि रत्नागीरीकरांसाठी तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी हि एक नवीन संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. यात विशेष म्हणजे रत्नागिरीतील आसमंत फाऊंडेशनसह पुण्यातील दोन आणि मुंबईतील दोन असे चार एनजीओ. एकत्र आल्यामुळे या अनोख्या उपक्रमाला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे”, असे सागरी अभ्यासक प्रदीप पाटाडे म्हणाले.”