मुंबई: महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत शनिवार, दि. १८ डिसेंबर रोजी ‘बदलता जम्मू-काश्मीर, नये कदम नयी तस्वीर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. मनोज कोटक, खा. गोपाळ शेट्टी, खा. पूनम महाजन, आ. कालिदास कोलंबकर आणि आ. तमील सेल्वम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या प्रगतीवर भाष्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता असणार्या सरस्वतीचे पूजन करून प्रार्थना करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी यावेळी आपले विचार प्रकट केले. ते म्हणाले की, “जो निर्णय कधी घेतला जाईल असे वाटले नव्हते तो निर्णय आत्ताच्या सरकारने घेतला. ज्या पुलवामाची ओळख दहशतवाद म्हणून होती तिथे दहा हजार तरुणांनी तिरंगा फेरीत भाग घेत ‘भारत माता की जय’ असे नारे दिले.”
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “सरदार पटेल यांनी काश्मीरला जोडण्याचे जे काम सुरू केले होते ते आता पूर्ण करण्यात मनोज सिन्हा यांचा वाटा आहे. शिक्षण, हॉटेल, अशा अनेक क्षेत्रातील कंपन्या आज मनोज सिन्हा यांच्यामुळे काश्मीरमध्ये जात आहेत. आज जी प्रगती जम्मू-काश्मीरमध्ये होत आहे ती मनोज सिन्हा यांच्यामुळे होत आहे, काश्मीर त्यांना कधीच विसरणार नाही.”भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे म्हणाले की, “ ‘कलम ३७०’, ‘३५ अ’ यांसारख्या कलमांमध्ये परिवर्तन झाले ते म्हणजे मोदी सरकारमुळे. जम्मू आणि काश्मीरमध्ये होणार्या प्रगतीमध्ये मनोज सिन्हा यांचा हात आहे, हे आपण कधीच विसरू शकणार नाही.”
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पाच-सहा कुटुंबांना गाव सोडावे लागले. त्यातल्या एका कुटुंबाने माझी भेट घेतली आणि सांगितले की, आमची मुलगी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार होती, पण आता ते शक्य नाही. पण, मग त्या मुलीचे अॅडमिशन पुण्यातील विद्यापीठात करून देण्यात आले. मात्र, अगदी सहजतेने तेथील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जे काम तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते ते आता जर कोणी करत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. मनोज सिन्हा हे बनारसच्या विद्यापीठातील ‘एमटेक’चे विद्यार्थी राहिले आहेत. कोणतेही काम सुंदरतेने कसे करावे हे जर कोणाला शिकायचे असेल, तर ते मनोज सिन्हा यांच्याकडून शिकावे. मुंबईची सर्व टीम जम्मू-काश्मीर बघण्यासाठी येणार आहोत. जम्मू-काश्मीरमधून जे बाहेर गेले आहेत त्यांचीदेखील पुन्हा आपल्या प्रदेशात जाऊन काम करण्याची इच्छा आहे. मनोज सिन्हा यांनी पुढेही असच काम करत राहावे.”