दि. ८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी भारतीय वायुदलाच्या स्थापनेला ९० वर्षं पूर्ण होऊन ते ९१व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. म्हणजेच आता शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. दि. ८ ऑक्टोबरच्या या वाढदिवसापर्यंत थांबून न राहता पाच दिवस आधीच म्हणजे दि. ३ ऑक्टोबर रोजी भारतीय वायुदलाने एका नव्या जातीच्या हेलिकॅप्टरला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. ‘लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर’ किंवा ‘एलसीएच’ अशा आद्याक्षरांनी ओळखल्या जाणार्या या हेलिकॉप्टला वायुदलाने नाव ठेवलंय ‘प्रचंड’.
या ‘प्रचंड’चं मुख्य वैशिष्ट्य हे आहे की, ते अति उंचावरच्या विरळ हवामानातही सहज संचार करू शकतं. १९९९ साली भारत-पाकिस्तान यांच्यात कारगिल परिसरात एक छोटसं युद्ध झडलं. लडाखच्या कारगिल या गावाजवळ पाकिस्तानी सैन्याने मोर्चे बांधले. हा सगळा परिसर १६ हजार ते १८ हजार फूट उंचीवर आहे नि तिथे हिवाळ्यात तापमान उणे ४८ अंश सेंटिग्रेडपर्यंत खाली घसरलेलं असतं. अशा परिसरात नि हवामानात पाकिस्तानी मोर्च्यांवर बॉम्बफेक करायला गेलेल्या विमानांपैकी एक जेट बॉम्बर आणि एक हेलिकॉप्टर पाकिस्तानी विमानविरोधी तोफगोळ्यांनी पाडली, तर एक जेट बॉम्बर खराब हवामानामुळे कोसळलं.
१९८४ साली सियाचेन ग्लेशियर हा काराकोरम पर्वतराजीतला भूप्रदेश भारताने मोठ्या शर्थीने जिंकला. २ हजार, ५०० चौ.किमी क्षेत्रफळाच्या या प्रदेशातला भारतीय लष्कराच्या बेस कॅम्पच मुळी १२ हजार फूट उंचीवर आहे आणि सर्वोच्च उंचीवरची बाना ही चौकी तब्बल २२ हजार फूट उंचीवर आहे. तपमान उणे ५० अंश सेंटिग्रेड किंवा त्याच्याही खाली असतं. आता इतक्या उंच प्रदेशात लष्करी ठाणी स्थापनं करणं आणि ती माणसं, हत्यारं, दारूगोळा, अन्नधान्य यांनी सदैव सुसज्ज, सक्षम ठेवणं, हे अतिशय खर्चिक आहे. पण, ते केल्यावाचून तर पर्याय नाही. कारण, तो भूभाग आपल्या कबजात घेण्यासाठी पाकिस्तान आणि चीन टपूनच बसलेले आहेत.
अशा स्थितीत सियाचेन, कारगिल किंवा इतरही आणि उंचावरील लष्करी ठाण्यांना माणसं आणि साधनसामग्रीची रसद पुरवण्यासाठी एका हलक्या नि लढाऊ हेलिकॉप्टरची अत्यंत गरज होती. ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ उर्फ ‘एचएएल’ या भारत सरकारच्या मालकीच्या विमान उत्पादनकंपनीकडे हे काम सोपवण्यात आलं. ‘धु्रव’ नावाचं जे हेलिकॉप्टर यापूर्वीच कंपनीने बनवलं होतं, त्याच्याच आराखड्यात अधिक सुधारणा करीत ‘प्रचंड’ची निर्मिती करण्यात आली आहे. ५१ फूट दहा इंच लांबीचं २ हजार, २५० किलो वजनाचं हे हेलिकॉप्टर १ हजार, ७५० किलो वजनाचादारूगोळा वाहून नेऊ शकतं आणि उड्डाण केल्याबरोबर दर मिनिटाला २ हजार,४०० फूट उंचीवर, या वेगाने ते २१ हजार, ३०० फूट उंचीवर जाऊ शकतं. आज संपूर्ण जगात एवढी उंची गाठू शकणारं ते एकमेव हेलिकॉप्टर आहे. ते पूर्णपणे स्वदेशीबनावटीचं आहे. याचाच अर्थ त्याच्या सुट्या भागांसाठी भारतीय वायुदलाला इतर कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. तसेच, ‘एचएएल’ कंपनी ही हेलिकॉप्टर्स अन्य देशांना विकून चांगला नफा कमवू शकेल. थोडक्यात, नव्वदी पार करणार्या भारतीय वायुदलाच्या भात्यात ‘प्रचंड’च्या रूपाने एका अत्याधुनिक नव्या शस्त्राची भर पडली आहे.
दि. ८ ऑक्टोबर रोजी ९१व्या वर्षांत पदार्पण करणार्या भारतीय वायुदलाचा इतिहासही मोठा मनोरंजक आहे. प्राचीन भारतीय राजे चतुरंग दलाच्या साहाय्याने युद्ध करीत असत. ‘पदाति’ म्हणजेच पायदळ, अश्वदळ, रथदळ आणि गजदळ असे ते चार सेनाविभाग असत. कुरुक्षेत्रावरच्या महाभारतीय युद्धात दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांनी या चतुरंग दलासमवेत युद्ध केलं होतं. नौदलाचा कसलाही उल्लेख महाभारतात नाही. राम-रावण युद्घात फक्त रावण आणि इंद्रजित यांच्याकडे रथ होते. अन्य सर्व योद्धे हे ‘पदाति’ होते, असं दिसतं. शेवटच्या रावणाबरोबरच्या निर्णायक लढाईत देवराज इंद्राने मातली या कुशल सारथ्याबरोबर रथ पाठवला नि प्रभू रामचंद्र त्यावर आरुढ झाले, असा उल्लेख येतो. परंतु, रामाला वनवासासाठी गंगेच्या पार नेऊन सोडणार्या निष्पादराज गुहक याच्या ५०० नावा या युद्धसाहित्याने सज्ज होत्या, असाही उल्लेख आढळतो.
गंमत म्हणजे, ऋग्वेद या सर्वांत प्राचीन साहित्यात नौदल युद्धाचाही उल्लेख आहे नि शतघ्नी म्हणजे शत्रूवर यंत्राच्या साहाय्याने दगडांचा मारा करणार्या यांत्रिक नळीचाही उल्लेख आहे. आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रातही शतघ्नीचा उल्लेख आहे. मात्र, ही यांत्रिक नळी नेमकं कसं काम करायची, हे कळत नाही. आधुनिक युगात युरोपीय देशांनी जग जिंकलं, तेच मुळी लांब पल्ल्याच्या तोफा-बंंदुका आणि अद्ययावत नौदलाच्या जोरावर. त्यातही इंग्लंडने याच दोन तंत्रांमध्ये अत्युच्च कौशल्य दाखवून, इतर सर्व युरोपीय देशांवर मात करीतजगात सर्वाधिक भूभाग आपल्या ताब्यात आणला. साहाजिकच इंग्रजांनी म्हणजे ‘ईस्ट इंडिया’ कंपनीने आपल्या भारतीय सैनिकांना तोफखाना आणि नौकानयन या आधुनिक विद्यांपासून कटाक्षाने दूर ठेवलं. प्रभावी नौकानयन शास्त्राच्या जोरावर इंग्लंडने स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड, फ्रान्स यांचा पराभव करीत आपला व्यापार अतोनात वाढवला, तर प्रभावी, बिनतोड तोफांच्या जोरावर मुघल, राजपूत, जाट, मराठे नि अखेर शीख यांचा पराभव करीत भारत जिंकला.
आता विज्ञानाचा यापुढचा टप्पा म्हणजे विमान. या वस्तूचा शोध ऑर्विल आणि विल्वर या राईट बंधूंनी १९०३ साली अमेरिकेत लावला. १९०९ साली अमेरिकन सेनादलाने राईट बंधूंच्या कंपनीकडून एक विमान विकत घेतलं. पण, आकाशात उडणार्या या कृत्रिम पक्ष्याच्या अंंगामधून शत्रूच्या डोक्यावर घिरट्या घालत गोळ्या झाडता येतील किंवा बॉम्ब टाकता येतील, हे कुणाच्या डोक्यातच आलं नाही. मग अमेरिकन सेनापतींनी या विमानाचं केलं तरी काय? तर आपल्या किंवा शत्रूच्या प्रदेशाची टेहळणी केली. अमेरिकेपाठोपाठ फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन या देशांनीही विमाने बनवली. पण, विमानातून शत्रूवर प्रभावी मारा करता येईल, हे कोणत्याही देशाच्या सेनापतीच्या डोक्यातच आलं नाही. जर्मनी हा देश अभियांत्रिकी क्षेत्रात पहिल्यापासूनच पुढारलेला. पण, जर्मन सेनापती जनरल लुडेंडॉर्फ याला विमानाकडे बघायलासुद्दा आवडत नसे. कापडाने गुंडाळलेले पंख आणि शेकडो वायर्सचा गुंताडा असणारं हे यंत्र त्याला फारसं कामाचं वाटत नसे.
पण, १९४४ साली महायुद्ध सुरू झालं आणि उभय पक्षांच्या सेनापतींची मतं बघता-बघता पालटली. पायदळाच्या मशीनगन आणि रणगाडा या अगदी नव्या आयुधांप्रमाणेच विमान हे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे, असा अनुभव सर्वच देशांच्या सेनापतींना आला. त्यातही पुन्हा विमानदल संघटितपणे उभं करण्यात ब्रिटननेच पुढाकार घेतला. १९१२ सालपासून पायदळाच्या हुकमतीत हवाई टेहळणीचं कार्य करणार्या ‘रॉयल फ्लाईंग कोअर’ या पथकाला १९१८ साली ‘रॉयल एअर फोर्स’ असा स्वतंत्र सैन्यदलाचा दर्जा बहाल करण्यात आला. ‘मार्शल ह्यू माँटेग्यू ट्रेंचार्ड’ हा या दलाचा पहिला प्रमुख नेमला गेला. त्याच वर्षी महायुद्ध संपलं. पण, हवाई दलाचं महत्त्व लक्षात घेऊन ब्रिटिश संरक्षण खात्याने हवाई दलाचा विस्तार सुरू केला.
मध्यपूर्वेपासून आग्नेय आशियापर्यंतच्या ब्रिटिश साम्राज्याचा मध्यबिंदू भारत आहे, हे लक्षात घेऊन दि. ८ ऑक्टोबर, १९३२ या दिवशी भारताच्या पश्चिम किनार्यावरच्या कराची या शहरात ‘इंडियन एअर फोर्स’ या दलाची अधिकृत स्थापना झाली. ‘वेस्टलँड वामिती’ या नावाची चार बारकी विमानं ‘रॉयल एअर फोर्स’च्यिा क्रॉनवेल इथल्या केंद्रातून प्रशिक्षित होऊन आलेले सहा अधिकारी आणि १९ तांत्रिक साहाय्यक एवढ्या सामग्रीनिशी भारतीय हवाई दलाचाजन्म झाला. मात्र, तोफखाना आणि नौकानयन यांच्याप्रमाणेच विमानचालन विद्येपासून इंग्रजांनी भारतीयांना अगदी कटाक्षाने दूर ठेवलं.
पण, झपाट्याने बदलणार्या परिस्थितीने सगळी समीकरणं वेगाने बदलत गेली. १९३९ साली हिटलरने युरोपात प्रचंड महायुद्धाचा आगडोंब उसळवून दिला. १९४२ सालापासून जर्मनीचा दोस्त जपान आशिया खंड पादाक्रांत करीत भारताच्या दिशेने येऊ लागला. ब्रह्मदेशाच्या अरण्यांमध्ये जपानी आणि इंग्रजांचे भारतीय सैन्य यांच्यात घनघोर लढाया जुंपल्या. तेव्हा, भारतीय सैन्याला हवाई सुरक्षा देण्याचं काम भारतीय हवाई दलाने अतिशय उत्तम पारं पाडलं. त्याकरिता इंग्रजांना भारतीय तरुणांना विमानविद्या शिकवावी लागली. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण सर्वच सैनिकी दलांच्या शक्तींवर गंभीर आघात झाला. कारण, निम्मी माणसं, निम्मी साधनसामग्री पाकिस्तानला द्यावी लागली. हवाई दलाची तर कराची या मुख्यालयासह आणखी पाच मोठी केंद्र पाकिस्तानात गेली.
पण, भारत हो अखेर भारत आहे. दीडशे वर्षांची गुलामी आणि फाळणी अशा प्रतिकूलतेवर मात करीत भारताने सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यास सुरुवात केली. काँग्रेससारखा अस्मिताविहीन पक्ष सत्ताधारी असल्यामुळे ही प्रगती मंदगतीने झाली, पण झाली. भारतीय हवाई दल हे इंग्रजांच्या अखत्यारित असतानाच त्याचं बोधवाक्य होतं- ‘प्रतिकूलतेतून तार्यांकडे.’ म्हणजे, सर्व प्रकारच्या संकट-अडचणींवर मात करून आम्ही अस्मानातल्या तार्यांपर्यंत झेप घेऊ. स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय वायुदलाचं बोधवाक्य आहे- ‘नभः स्पृशं दीप्तम्’ म्हणजे नभाला-आकाशाला स्पर्श करणारं दीतिमान तेजस्वी कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर भगवंताने अर्जुनाला विराट स्वरुप दाखवलं. त्याचं वर्णन करताना संजय धृतराष्ट्राला सांगतो - ‘नभः स्पृशं दीप्तम्’ अनेक वर्णम्!’ भारतीय वायुदलाला आपल्या संस्कृतीतलं आणि चपखल असं हे बोधवाक्य देण्याची कामगिरी चक्रवर्ती राजगोपालाचारी उर्फ राजाजी यांची.
आज भारतीय वायुदलात सैनिक, अधिकारी, तंत्रज्ञ असे सर्व मिळून सुमारे पावणेदोन लाख कर्मचारी काम करतात; तर सुमारे दीड लाख लोक गरज पडल्यास उभे राहू शकतात. तसेच विविध जातींची सुमारे दोन हजार विमानं सुसज्ज आहेत. हे सगळे आकडे अंदाजित असतात. कारण, जगातला कोणताही देश आपल्या सैनिकी बळाचे निश्चित आकडे कधीचं जाहीर करीत नाही आणि ते स्वाभाविकच आहे. एअर चिफ मार्शल विवेक राम चौधरी हे आपले वायुदल प्रमुख आहेत. ‘मिग-२१’, ‘मिग-२३’, ‘मिग-२९’, ‘सुखोई-३०’ अशी अत्याधुनिक झुंजी विमानं हाताळणार्या विवेक राम चौधरींना ३ हजार, ८०० तास एवढा उड्डाण अनुभव आहे.