राघवाच्या पंथाची तयारी...

    19-Jan-2022
Total Views | 130

manace shlok.jpg



‘राघवाचा पंथ’ आत्मसात करून पुढे जायचे म्हणजे त्यासाठी ‘भक्ती’ आणि ‘सदाचार’ यांना आचारणात महत्त्वाचे स्थान द्यावे लागते. सर्वप्रथम भक्तिमार्गानेच जाण्याचे मनाने ठरवले पाहिजे. भक्तिमार्गात शरणागताच्या भूमिकेतून भगवंताच्या गुणांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा लागतो. भगवंत हा सर्व सद्गुणांचा राजा आहे. त्याला प्रसन्न करुन घेण्याचे अनेक मार्ग शास्त्रात सांगितले आहेत.

पूर्वापार परंपरेला अनुसरून मनाच्या श्लोकातील पहिला श्लोक हा मंगलाचरणाचा आहे. निर्गुण परमात्म्याचे दृश्य स्वरुप, असा जो श्री गणेश आणि ‘वैखरी’, ‘मध्यमा’, ‘पश्यंती’, ‘परा’ या चारही वाणींच्या रुपात प्रगट होणारी शक्तिशाली शारदा यांना या श्लोकात वंदन केले आहे.श्री गजानन म्हणजे ज्ञानरूप जाणीव, तर शारदा ही सामर्थ्यरूप शक्तिदात्री, असे मानले जाते. बुद्धिदात्या गणपतीच्या अधिष्ठानामुळे आपल्याला अर्थाची जाणीव होते. या अर्थाला, जाणिवेला शब्दरूप, भाषारूप शक्ती, शारदेच्या अधिष्ठानाने मिळते. समर्थांनी दासबोधात शारदेचे वर्णन करताना म्हटले आहे की, भगवंताचे स्तवन करणे असो अथवा त्याची भक्ती असो नाहीतर भजन करणे असो, शारदेच्या मदतीशिवाय ते करता येत नाही. गणपती आणि शारदा यांचे असे माहात्म्य असल्याने त्यांचे स्तवन केल्याशिवाय ग्रंथनिर्मितीच्या कार्यात पुढे जाता येत नाही. मनाच्या श्लोकांच्या पहिल्या श्लोकात स्वामींनी श्री गणेश आणि शारदा यांना आदरपूर्वक नमन केले आहे आणि समर्थांना जो ‘राघवाचा पंथ’ स्पष्ट करायचा आहे, तो सांगायला सुरुवात केली आहे.

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।
नमू शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूू पंथ आनंत या राघवाचा ॥१॥


 
निर्गुण परब्रह्माची कल्पना करता येत नाही. कल्पनेने त्याला जाणता येत नाही. म्हणून श्रीगणेशाचे दृश्य स्वरुप पाहून निर्गुणापर्यंत पोहोचता येते. शारदेचे सामर्थ्य चारही वाणींद्वारा प्रगट होते. हे जाणून ‘राघवाचा पंथ’ समजून घ्यायचा आहे. या ‘राघवाच्या पंथा’च्या आचरणाने व्यक्तिगत, सामाजिक, व्यावहारिक वगैरे सर्व क्षेत्रांत मानवी जीवनाची प्रगती होऊन लोकांना सुख-समाधान अनुभवता येते. आता ‘राघवाच्या पंथ’ स्वीकारून पुढे निघायचे, तर त्यासाठी काही पूर्वतयारी केली पाहिजे. ही पूर्वतयारी करायची म्हणजे काय करायला हवे, हे स्वामी मनाच्या श्लोकांच्या दुसर्‍या व तिसर्‍या श्लोकांत सांगतात.

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे।
जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे।
जनी वंद्य तें सर्व भावे करावे ॥२॥


 
‘राघवाचा पंथ’ आत्मसात करून पुढे जायचे म्हणजे त्यासाठी ‘भक्ती’ आणि ‘सदाचार’ यांना आचारणात महत्त्वाचे स्थान द्यावे लागते. सर्वप्रथम भक्तिमार्गानेच जाण्याचे मनाने ठरवले पाहिजे. भक्तिमार्गात शरणागताच्या भूमिकेतून भगवंताच्या गुणांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा लागतो. भगवंत हा सर्व सद्गुणांचा राजा आहे. त्याला प्रसन्न करुन घेण्याचे अनेक मार्ग शास्त्रात सांगितले आहेत. तथापि तो सहजगत्या प्रसन्न व्हावा, असे वाटत असेल, तर भक्तिमार्गाने जाऊन त्याचे थोडेतरी गुण मिळवण्याचा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समर्थांनी दासबोधात हाच विचार, प्रामुख्याने मांडला आहे.

भक्तिचेन योगें देव। निश्चयें पावती मानव।
ऐसा आहे अभिप्राव। इथे ग्रंथी॥ (१.१.४)



मनाच्या श्लोकांतून स्वामी सांगतात की, भक्तिमार्गाने जायचे म्हणजे आपले विचार आणि आचरण शुद्ध असले पाहिजे. भक्तिमार्गाने जाणार्‍या साधकाने याची काळजी घ्यावी लागते की, त्याचा व्यवहार चोख आणि स्वच्छ असला पाहिजे. निष्कलंक व्यवहाराशिवाय कुणालाही भगवंताचा भक्त होता येत नाही. भक्ती करणे हा भाग नंतरचा. भगवंताजवळ ढोंगीपणा चालत नाही. भोंदू माणसाच्या भक्तीचा अभिनय पाहून जग फसेल, पण भगवंत फसणार नाही. यासाठी लोक ज्या वागण्याची निंदा करतात, असले वर्तन भक्ताने आपण होऊन पूर्णपणे सोडून दिले पाहिजे. कोणाच्या दबावामुळे नव्हे, तर निंद्य आचरणातील दोष मनोमन पटल्याने त्याचा त्याग केला पाहिजे. अर्थात, याउलट जे लोकांना मान्य आहे असे चरित्र्यसंपन्न व नैतिक आचरण ठेवल्याने समाजात मान्यता प्राप्त होते. असा नैतिकतेवर आधारलेल्या आचरणाचा मनापासून स्वीकार करावा. समर्थांनी दासबोधातही हा विचार आवर्जून सांगितला आहे. तो त्यांच्या तत्त्वज्ञानाचा भाग आहे. समर्थ म्हणतात-

तैसे निंद्य सोडून द्यावें। वंद्य ते हृदयीं धरावें।
सत्कीर्तीने भरावें। भूमंडळ॥ (दा.१३.१०.२०)



समर्थ वाङ्मयात सगळीकडे वैयक्तिक आणि सामाजिक चारित्र्यावर, नैतिकतेवर समर्थांनी भर दिलेला दिसून येतो. समर्थांनी सर्व काळी सर्व ठिकाणी शुद्ध आचरण श्रेष्ठ मानले आहे. भ्रष्ट आचरणाने माणूस स्वतःतर अधोगतीला जातोच, पण अशा भ्रष्टाचारी माणसांचा समूह तयार होऊन सर्व समाज अधोगतीला जातो. ‘जनी वंद्य ते सर्वभावे करावे’ असे स्वामी सांगतात. तेव्हा त्यांच्या दृष्टीसमोर सज्जनांचा जनसमूह असतो. त्या सत्त्वशील समूहाला जे मान्य, जे वंद्य ते समाजोपयोागी आहे, नैतिकतेला धरुन आहे, त्याचा आग्रहपूर्वक स्वीकार करावा, असे समर्थ सांगतात. तथापि, समाजमान्य रुढी-परंपरा, प्रथा अज्ञानी कर्मठपणा या किंवा भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार्‍या असल्या तरी स्वीकारण्याची आवश्यकता नाही. ‘जनी वंद्य ते सर्वभावे करावे’ यातील आशय विवेकाचा वापर करून समजून घ्यावा लागतो. या प्रत्येक ठिकाणी शुद्ध आचरणाला महत्त्व आहे. आचरण शुद्ध, चारित्र्यसंपन्न असलेला मनुष्य लोकात व जगात वंदनीय असतो. यासाठी सदाचरणाचा आदर्श जो श्रीराम, त्याचे प्रत्येकाने सकाळी उठल्याबरोबर स्मरण करावे. स्वामी पुढील श्लोकात हेच सांगतात-

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा।
सदाचार हा थोर सांडू नये तो।
जनी तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥



श्रीरामांचे अलौकिक चरित्र व गुणविशेष अनुकरणीय आहेत. अशा श्रीरामाचे गुण आठवत सुप्रभाती त्याच्या गुणांचे चिंतन करावे. श्रीरामाच्या श्रेष्ठ गुणांचे मनन-चिंतन सुप्रभाती केल्याने मन प्रसन्न होते. प्रभू रामचंद्राचे गुण दिवसाची कर्मे सुरुवात करण्यापूर्वी आठवावी. मग ‘वैखरी’ वाणीद्वारा दिवसाच्या व्यवहारांची सुरुवात करावी. प्रभाती रामाच्या गुणांच्या चिंतनाने पुढे दिवसभर आपले व्यवहार प्रामाणिकपणे चोख व स्वच्छ मनाने करण्याची प्रेरणा माणसाला मिळते. शुद्ध आणि स्वच्छ आचरण व्यवहारात ठेवले, तर मनाची स्थिरता साधता येते. याउलट भ्रष्ट आचरण, स्वार्थी बुद्धी, हाव अनैतिक कृत्ये माणसाच्या मनात अपराधीपणाची जाणीव निर्माण करतात. त्याची टोचणी दिवसभर मनाला त्रास देत राहते. रात्री झोपही शांतपणे घेता येत नाही. तथापि, शुद्धाचरणाने मन प्रसन्न होते. प्रसन्न मनाला अनेक गोष्टी वश होतात. प्रसन्न मन अनेक गोष्टी साध्य करून देते. ती एक प्रकारची सिद्धी म्हणायला हरकत नाही. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की, ‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण।’ सुप्रभाती रामाच्या चिंतनाने विकारांवर ताबा कसा मिळतो, हे पुढील लेखात पाहू. (क्रमश:)


 - सुरेश जाखडी



 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121