मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात श्रीवर्धन आणि म्हासाळा तालुक्यातून टॅग लावून सोडलेली गिधाडे (vulture) पुन्हा एकदा पिंजराबंद झाली आहेत. राज्याचे वनबल प्रमुख आणि वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत चार गिधाडांच्या पायांना आणि पंखाना टॅग लावून त्यांना सोडण्यात आले होेते. मात्र, खाण्यासाठी माणसावर अवलंबलेली यामधील तीन गिधाडे गावकऱ्यांना शेतात सापडली असून त्यांना वन विभागाकडे सूपूर्द करण्यात आले आहे.
सद्यपरिस्थितीत कोकणामध्ये गिधाडांची (vulture) मोठी संख्या रायगड जिल्ह्यात दिसून येते. जिल्ह्यातील म्हासाळा (mahasala) आणि श्रीवर्धन (shrivardhan) तालुक्यात गिधाडांचा अधिवास आहे. याठिकाणी प्रामुख्याने पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांचा (vulture) कायमस्वरूपी अधिवास आहे. या तालुक्यामध्ये घरट्यामधून पडून जखमी झालेली किंवा अशक्त असलेली गिधांडाची (vulture) पिल्ले स्थानिकांना सापडतात. अशाच अशक्त आणि जखमी पिल्लांवर 'सिस्केप' संस्था आणि वन विभागाकडून उपचार करण्यात येतात. गेल्यावर्षी मार्च महिन्यामध्ये वन विभागाला श्रीवर्धनमध्ये (shrivardhan) गिधाडांची (vulture) चार पिल्ले मिळाली होती. या पिल्लांवर 'सिस्केप' संस्थेच्या सदस्यांनी आठ महिने उपाचार करण्यात आले. त्यांचे वजन तीन किलोपेक्षा अधिक झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या 'ईला फाऊंडेशन'कडून त्यांचे पाय आणि पंखांना टॅग लावून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले. यामधील एक गिधाड म्हसाळ्यात, तर तीन गिधाडे श्रीवर्धन तालुक्यात सोडण्यात आली.
ही गिधाडे सोडताना राज्याचे वनबल प्रमुख पी.साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, रोह्याचे उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत आणि 'सिस्केप'चे प्रमुख व रायगडचे मानद वन्यजीव रक्षक प्रेमसागर मेस्त्री हे उपस्थित होते. मात्र, यामधील तीन गिधाडे श्रीवर्धन वनपरिक्षेत्र कार्यालयात असल्याची माहिती रोहा वन विभागातील एक अधिकाऱ्याने दिली. त्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन वनपरिक्षेत्र कार्यालयात असलेली तीन गिधाडे ही गावकऱ्यांना शेतात सापडली. भुकेच्या व्याकूळतेने ती शेतातील मजूरांच्या अंगावर धावून येते होती. सरतेशेवटी ही गिधाडे वन विभागाकडे पाठवण्यात आली. आता या गिधाडांच्या संगोपनाची जबाबदारी पुन्हा वन विभागाकडे आली आहे. याविषयी प्रेमसागर मेस्त्री यांनी माहिती दिली की, "ही तीन पिल्ले नैसर्गिक अधिवासात तग धरु न शकल्याने त्यांना श्रीवर्धनमध्ये आणण्यात आले आहे. त्यांना लवकरच रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात येईल. रायगडमध्ये गिधाडांसाठी सुसज्ज असे खाद्य केंद्र उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."