मूर्तिकलेतील अमरावतीचे ‘अतुल-विजय’ जिराफे

मूर्तिकलेतील अमरावतीचे ‘अतुल-विजय’ जिराफे

    03-Sep-2021
Total Views | 323
murti_1  H x W:
  
 
अमरावतीला मूर्तिकार बंधू आहेत. त्यांनी अंतर्गत गृहसजावटीमध्ये अतुलनीय काम तर सुरू ठेवले आहेच, पण त्यांच्या मूर्तिकामातील कसब-रंगलेपनातील कौशल्ये पाहता, समस्त मूर्तिकला प्रकारावर विजय प्राप्त केलेला आपल्या ध्यानी येते.अतुल आणि विजय जिराफे हे कलाकार बंधू जणू नाण्याच्या दोन बाजू. त्यांचं त्यांच्या व्यवसायातील नाणंच खणखणीत! मूर्तिकला आणि रंगलेपनातील अद्भुत कसब पाहता अल्पावधीत जवळपास जगभर त्यांची मूर्तिकला पोहोचली, यावरून त्यांच्या कामातील दर्जा-प्रामाणिकपणा आणि एकमेवत्व (युनिकनेस) ध्यानी येतो.
 
 
आपण अशा एका समृद्ध संस्कृतीत जन्माला आलो आहोत की, या चिरंतन, चिरंजीव आणि चिरकालापासून अव्याहतपणे सुरू असलेल्या संस्कारांवर काळाच्या कुठल्याही वादळात परिणाम झालेला दिसत नाही. याचं कारण हजारो वषार्र्ंची प्रदीर्घ-प्रगाढ आणि प्रगल्भ परंपरा आपल्या संस्कृतीला लाभलेली आहे. मग जागतिक संकट असो की नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती असो की, महामंदीचे सावट असो, आपला इतिहास सांगतो, आपण पार खंबीरपणे शह देऊन कुठल्याही प्रकारच्या संकटांना सामोरे गेलो आहोत. तसेच सामोरे जात आहोत. याचं गुह्य म्हणजे आपली संस्कृती!या संस्कृतीची महानता एवढी आहे की, सध्याच्या कोरोना काळातही धार्मिकस्थळे बंद असतानादेखील धार्मिक भाव-भावनांना कुठेही बाधा आलेली नाहीं. मागील वर्षीची दीपावली, दसरा, गुढीपाडवा, गणेशोत्सव, ईद, नाताळ असे सण-उत्सव घरातच आणि तणावातच साजरे करावे लागले. यावर्षीची परिस्थिती गतवर्षीच्या तुलनेत थोडी बरी आहे, असे दिसते. तरीही आर्थिक संकट, बेरोजगारी यांसारखे प्रश्न भेडसावत आहेतच. अनेक कंपन्या बंद पडल्या, अनंत उद्योग-धंदे ठप्प झाले. असंख्य लोकांच्या नोकर्‍या गेल्या. बेकारीमुळे आत्महत्या झाल्या. बरंच काही घडलं आणि अजूनही घडत आहे. दैनंदिन जीवनच सगळ्यांना बदलावं लागलं आहे. तरीही वाळवंटात एखादे हिरवे गार आंब्याचे डेरेदार वृक्ष दिसावे, असेही दिलासादायक काही आणि कुठे कुठे जेव्हा दिसते, तेव्हा ऊर भरून येतो...
 
 
 आपल्या संस्कृतीची महानता अनुभवून!
अमरावतीला मूर्तिकार बंधू आहेत. त्यांनी अंतर्गत गृहसजावटीमध्ये अतुलनीय काम तर सुरू ठेवले आहेच, पण त्यांच्या मूर्तिकामातील कसब-रंगलेपनातील कौशल्ये पाहता, समस्त मूर्तिकला प्रकारावर विजय प्राप्त केलेला आपल्या ध्यानी येते.अतुल आणि विजय जिराफे हे कलाकार बंधू जणू नाण्याच्या दोन बाजू. त्यांचं त्यांच्या व्यवसायातील नाणंच खणखणीत! मूर्तिकला आणि रंगलेपनातील अद्भुत कसब पाहता अल्पावधीत जवळपास जगभर त्यांची मूर्तिकला पोहोचली, यावरून त्यांच्या कामातील दर्जा-प्रामाणिकपणा आणि एकमेवत्व (युनिकनेस) ध्यानी येतो.त्यांनी गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती, गौरी आवाहनासाठी गौरींचे मुखवटे आणि शरीररचना, लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीमूर्ती साकारल्या आहेत. या सर्व मूर्तींमध्ये मूर्तिमंत दिव्यत्व असण्याचा भास होतो. या मूर्तीचे रंगकाम तर प्रचलित रंगवटीपेक्षा फार अद्भुत आहे. प्रचलित मूर्ती या भडक रंगांचा भडिमार करून करकरीत रेखांकन, डोळे, भुवया, हातावरील रेषा, अलंकार अशा बर्‍याच गोष्टी फारच बटबटीतपणे रंगवलेल्या असतात. फ्लोरोसंट कलर असतात. अंगावरील वस्त्रप्रावरणे तर फार भन्नाट रंगवलेली असतात.या सार्‍या बाबींचा, जिराफे बंधूंनी फारच संवेदनेने विचार केला असावा.त्यांनी रंगविलेली प्रत्येक मूर्ती, मग ती श्रीगणेशाची असो की, गौरीचे मुखवटे असो, श्रीलक्ष्मीची मूर्ती असो, या सार्‍या देवता आपल्याशी बोलतात, असेच आपल्याला वाटते. वेळ कसा निघतो, कळतदेखील नाही या मूर्तींकडे पाहताना...
 
 
  
जिराफे यांना मी एक संवेदनेचा प्रश्न विचारला त्यावर ते म्हणाले की, “आम्ही या ‘कोविड’च्या काळातही, सुमारे ५०-६० कलाकारांना, कुणालाही काम नाही म्हणून कमी केले नाही आणि रोजगार उपलब्ध करुन दिला. कारण, आमच्याकडे, आमच्या मूर्तींना जगभरातून इतकी मागणी आहे की, आम्ही ती पूर्ण करू शकत नाही.” म्हणालो, “असं का? का पूर्ण करू शकत नाहीत आपण?” यावर त्यांचं उत्तर फार महत्त्वाचं वाटलं. ते म्हणाले, “सर, आम्ही प्रत्येक मूर्ती ही स्वतंत्रपणे रंगवत असतो. मूर्तीचे बारकाईने म्हणजे, डोळे, भुवया, हातांवरील, कपड्यांवरील रंगकाम फार खास आणि विशेष पद्धतीने रंगवत असतो. काही अगदीच सूक्ष्म कौशल्याचे म्हणजे ‘मूर्तीचा आत्मा’ ज्याला आपण म्हणूया, त्या त्या मूर्तीचे डोळे मी स्वत: रंगवतो. म्हणून मशीनप्रमाणे वा कारखान्याप्रमाणे आमचं काम चालत नाही. आम्ही मूर्तीच्या ‘फिनिशिंग’मध्ये, मूर्तीच्या रंगकामामध्ये किंचितही तडजोड करत नाही.” अत्यंत महत्त्वाचे व्यावसायिक तत्त्व मूर्तिकार जिराफे यांनी मला सांगितले होते. हे खरंतर इतरही समव्यावसायिकांनी अंमलात आणले, तर मंदीच्या काळातही ‘जिराफे मूर्ती प्रकल्प’ बाराही महिने दिवस-रात्र पाळीत जसा सुरू आहे, तद्वतच इतरांनाही हा व्यावसायिक आनंद अनुभवता येईल.जागतिक स्तरावर उद्योग-धंद्यांच्या वाटचालीस आलेल्या अडचणी, कदाचित जिराफे यांना आल्याही असतील. मात्र, कलेशी-संस्कृतीशी आणि पत्करलेल्या व्यावसायिक संस्कारांशी एकनिष्ठ राहिल्यामुळे, त्यांनी या कोरोना काळातही कारागिरांना अमरावतीतील कला महाविद्यालयातील कला विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि सुरू ठेवला.
 
 
 
जिराफे यांच्या मूर्तीच्या नकला, ज्याला ‘पायरसी’ म्हणतात, अशाही करण्याचा फाजील प्रयत्न झाला. एकवेळ उल्हासनगरला अशा हुबेहूब मूर्ती झाल्या/ बनवल्या असल्या, तर एकवेळ मनाने स्वीकारले असते. परंतु, चक्क पुण्यात जिराफेंच्या मूर्तिकलेची नक्कल पाहायला मिळाली. परंतु, अस्सल सोनं आणि पितळ यात जो फरक असतो, तो चाणाक्ष ग्राहकांनी ओळखला. काही भाबडे मात्र फसतात. वास्तविक जिराफे यांच्या मूर्तींची जी एक वाजवी किंमत वा मूल्य ठरविलेले असते, त्यांच्या कित्येक पट अधिक मूल्य आकारून सदर मूर्ती जिराफेंच्या नावाने खपवून विकल्या जातात, ही खंत स्वत: जिराफे बंधूंनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी त्यांची वेबसाईट लिंक, फेसबुक वगैरे सोशल माध्यमांद्वारे संपर्क क्रमांकासह संवाद साधून इच्छुकांनी मूर्ती मागवून आनंद मिळवावा, असे आवाहन केेलेले आहे.ही झाली जिराफे बंधूंची व्यावसायिक स्थिरतेची माहिती. त्यांच्या या कलेतील पार्श्वभूमीदेखील जाणून घेणे औचित्याचे ठरेल. अतुल आणि विजय या दोनही मूर्तिकार बंधूंचे प.पू. पिताजी हे अंबानगरीतील नावाजलेले मूर्तिकार. वडिलांच्या अंगी असलेल्या दैवी कलागुणांमुळे त्यांच्या मूर्तींना स्थानिक पातळीवर मागणी असायची. समकालीन मूर्तिकार कृष्णराव सोनसळे यांच्याकडे वडील नंदकुमार जिराफे काम पाहायचे. त्यातूनच त्यांना मूर्तिकलेचे धडे मिळाले. वडिलांनी आत्मानंदासाठी मूर्तिकाम केले.
 
 
 
 वडिलांच्या या कलेला अधिक समृद्ध करण्यासाठी जिराफे बंधूंनी कलेचे आवश्यक शिक्षण पूर्ण केले. आज ते या व्यवसायाला कलानिर्मितीच्या नजरेतून पाहतात. त्यांच्याविषयी स्थानिक एका ग्रंथात नमूद केलेले आहे की, मूर्तिकला हा व्यवसाय असूच शकत नाही. अर्थार्जन होते हे जरी खरे असले, तरी महत्त्वाचे ते निर्मितीचे समाधान. आपलीच एखादी निर्मिती निरखून बघितल्यानंतर भरून पावल्यासारखे वाटले की, तृप्ती मिळते. यशाचा ध्वज कायम उंचच उंच होत असतानाही एवढे सरळ धोपट तत्त्वज्ञान असलेल्या अतुल-विजय जिराफेंना पर्यावरणपूरक मूर्तींची निर्मिती केल्याचा आनंद हा काही वेगळाच राष्ट्रीय आणि नैसर्गिक कार्य केल्याचे समाधन देतो.आज आपण पाहतो संगीत वा चित्रपट क्षेत्रात ‘नदीम-श्रमण’, ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’, ‘अजय-अतुल’ अशा जोड्या सर्वश्रुत आहेत. दृश्यकलेत मात्र विशेषतः मूर्तिकलेत ‘अतुल-विजय’ हे नाव जगाच्या कला इतिहासात स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ठरले आहे. विशेष म्हणजे, हे ‘अतुल-विजय’ हे सख्खे बंधू आहेत. यांच्यात प्रचलित भाऊबंदकी नाही. यांचं नातं रक्ताने जसं निश्चित केलं आहे, त्याहून अधिक रंगाच्या ईश्वरीय किरणांनी जोडलेले आहे. कोण मोठा, कोण लहान हे त्यांनी सांगितल्याशिवाय कळणार नाही, ही बाब मला त्यांनी मिळविलेल्या अतुलनीय विजयाप्रमाणे वाटते.खास गणेशभक्तांसाठी आणि ज्यांच्या घरी दहा दिवस सात दिवस गौरी गणपतींचे आगमन असते त्यांच्यासाठी ९८५०९९८८६६ हा संपर्क क्रमांक आहे. त्यांच्या या मूर्ती निर्माण प्रकल्पाला वैश्विक स्थिरता मिळेल, यात संदेह नाहीच; तरीही त्यांना शुभेच्छा...!
८१०८०४०२१३
 
-डॅा. प्रा. गजानन शेपाळ
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121