राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा होऊन ६ वर्षे उलटली तरी गोहत्या थांबलेल्या नाहीत. बीफ माफिया आणि कसायांशी काही भ्रष्ट पोलिसांच्या असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे राज्यात या कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. बकरी ईदच्या निमित्ताने दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जाते हे सर्वश्रुत आहे. गोवंश हत्याबंदी कायदा अमलात आल्यापासून यामध्ये थोडीफार घट झाली असली, तरी या हत्या थांबलेल्या नाहीत.
गोहत्या हिंदूंच्या धर्मभावनेशी निगडित असल्यामुळे आणि राज्यासह देशभरात हिंदू बहुसंख्य असल्यामुळे राज्याच्या गृहखात्याने या बाबीकडे विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे. केवळ कायदा करून कोणताही प्रश्न सुटत नाही, त्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक असते. राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याचीही अवस्था दुर्दैवाने अन्य कायद्यांप्रमाणेच झाली आहे. माननीय मुख्यमंत्री एका हिंदुत्ववादी पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, असे असताना या कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी न होणे खरेतर लाजिरवाणेच आहे. किमान यावर्षी तरी सरकारने राज्यभरात चोख बंदोबस्त ठेऊन बकरी ईदच्या निमित्ताने कुठेही गोहत्या होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
- सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई