नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग।

    19-Jul-2021
Total Views |

wari_1  H x W:
 
 
पावसाळा सुरू होताच भाविक-भक्तांना आषाढ महिन्यातील एकादशीचे वेध लागतात. भागवत धर्माचा पाया माऊलींनी घातला असे म्हणतात. वारी हा वैष्णवांचा प्राण. या वारीची परंपरा खूप जुनी, अगदी ज्ञानदेवादी भावंडांच्या आधीपासूनची. हजारो वर्षांचा इतिहास वारीला आहे. या वारीला शिस्तबद्ध चौकट जी मांडली गेली, ती ज्ञानदेवांच्या काळातच. तो काळ खर्‍या अर्थाने संतांच्या लोकशाहीचा होता. अठरापगड स्तरातील सारे संत एक दिलाने, एक मनाने एकाच विठ्ठल पांडुरंगाचे भक्त होते. शुद्ध भक्ती, शुद्ध ज्ञानाने फार मोठे समाजसंघटन यानिमित्ताने सुरू झाले आणि आजही ही परंपरा चालू आहे.
 
 
 
या वारीचे वैशिष्ट्य असे की, यात कुणालाही आमंत्रण नाही की, बोलावणे नाही, तरीही पाच-सात लाख लोक मनाने संकल्प करून स्वयंशिस्तीने यात सहभागी होतात. यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही की, काही मिळवण्याची आस नाही. विठ्ठलाच्या निरपेक्ष प्रेमाच्या ओढीने वारकरी अनेक गावांहून चालतच पंढरीक्षेत्री येतात. सर्वच वयोगटाचे लोक यात सहभागी असतात. महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर असतो. डोक्यावर विठ्ठलासाठी तुळशीचे वृंदावन, पाठी सामानाचे ओझे, मुखात नाम, अभंग गात पावले संथलयीत चालतात. त्यात वृत्तीही विठ्ठलाशी रत असते. त्यामुळे शारीरिक तप करतो वगैरे भावही नसतो. येथे सर्व नाती, भेदाभेद सहज पुसले जातात. एकच दृष्टी सर्वांची असते. ती म्हणजे प्रत्येक वारकरी हा विठ्ठलरूपच आहे. ‘तत्त्वदर्शन’ हा त्यांचा सहजभाव होतो. यास्तवच ते एकमेकांच्या चरणी माथा ठेवतात. अहंलयाची प्रक्रिया येथून सुरू होते. वारीच्या कालावधीत तो अहं पूर्ण लयाला जातो. सर्वांचा एकच भाव तो म्हणजे, माऊली किंवा विठाई आम्हाला चालवते, हे कर्तृत्वही ते ईश्वरालाच बहाल करतात.
 
 
सर्वच संतांच्या पालख्या त्यांच्या गावाहून निघतात. २० दिवसांचा साधारणत: हा कालावधी असतो. केवळ भक्तीने भारावलेल्या स्थितीत ही वारी जनसागरासह डोलत डोलत, खेळत, स्वानंदोत्सव साजरा करत प्रस्थान करते. ‘वारी’ शब्दसुद्धा किती गोड आणि अंत:करण आकर्षित करणारा आहे. पूूर्वी ‘वारी करी’ असा शब्द रूढ होता. पुढे पुढे त्याचा ‘वारकरी’ असा एकच शब्द तयार झाला. भक्तांचा मेळावा विठूमाऊलीच्या दर्शनास निघतो ती ‘वारी.’ वारी याचा एक अर्थ ‘निवारणे-निरसणे’ असा आहे. जन्ममरणाचा फेरा वारी. येथे संकटे-आपदा दूर करणे आणि मुक्तीच्या दिशेने प्रवास करणे, असा होतो वारीचा अर्थ. पाणी असाही एक अर्थ आहे. जल हे प्रवाही असते. प्रवाहित पाणी किंवा जल हे भक्तिमार्गाचे प्रतीक आहे. पाणी वाहत पुढे पुढे जाते आणि शेवटी नदीरूपाने सागरात विलीन होते. तसेच वारीतील भक्त भक्तीत रंगून जातात. भक्तीत ते देहभान विसरतात. पांडुरंगात आपले अस्तित्वच विलीन करतात. हे सारे इतके सहज घडते की, यात काही ‘आम्ही करतो’ हा भावसुद्धा नसतो.
 
 
सामाजिकतेचा, समतेचा, सर्वसमावेशकतेचा हा खरे तर वस्तुपाठ आहे. वारीत सारेच एकमेकांना साहाय्य, मदत करतात. कोण, कुठले काही ठाऊक नाही. पण, विठ्ठलाची निस्सीम श्रद्धा, प्रेम याच्या धाग्यात सारे घट्ट बांधलेले असतात. वारीतले रिंगण, खेळ, धावणारा अश्व हे सारेच विलोभनीय असते. त्या धावणार्‍या अश्वालासुद्धा त्याच्या पावलांच्या ठशांना वंदन करणारे वारकरी पाहिले की, सर्वाभूती परमेश्वर याचेच दर्शन घडते.
 
 
 
आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा काळ ‘चातुर्मास’ म्हणूनच ओळखला जातो. ‘सणांचा राजा’ म्हणूनच हा काळ ओळखला जातो. या कालावधीत कितीतरी सण येतात, प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे. यानिमित्ताने आपण निसर्गाकडे जातो. त्याच्याशी संवेदनशील नाते हे सर्वच सणांत पाहायला मिळते. ‘देवशयनी एकादशी’ असेही आषाढी एकादशीला म्हणतात. ‘देव झोपला’ ही कल्पनाच गमतीची आहे. देव जो दिव्य ज्ञानस्वरूप असणारा तो नित्य प्रकाशमानच आहे, तो झोपतो हे कसे, ते समजून घ्यावे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती कुठे बाहेरगावी गेल्या की, लहान मुलांवर सहज जबाबदारी येते. ते ती उत्तम पार पाडतात. सामंजस्य या निमित्ताने वृद्धिंगत होते. हाच यामागचा विचार आहे. कार्तिक एकादशीला देव उठतात, असा समज आहे. सगुण भक्तांना परमात्मा सगुणात आला की, त्याच्याही भक्तीचा व्यवहार करणे आनंददायी असते. निर्गुण निराकारात व्यवहार काय घडणार? म्हणून ज्ञानाने वारकरी विठ्ठलाचे स्वरूप जाणतात. पण, त्याच्याशी प्रेमाचा व्यवहारही करतात. अहो, इतकेच काय तर ते एकमेकांनासुद्धा प्रेमाने ‘माऊली’ म्हणतात.
 
 
‘विठ्ठल’ किंवा ‘विठोबा’ हा शब्दसुद्धा फार गोड आहे. विठ्ठल याची व्युत्पत्ती सुरेख आहे. वि + स्थल. स्थल म्हणजे पृथ्वीमाता. तिचे दोन अर्थ आहेत. १) विस्तार करणे. २) गोळा करणे. ज्या तत्त्वातून सृष्टीचा विस्तार केला जातो, अंती त्याच तत्त्वाचा पुन्हा तो आवरून गोळा केला जातो, ते तत्त्व म्हणजेच ‘विठ्ठल’ होय. वि + ठोबा - ज्ञानाचा साकार पुतळा म्हणजे ‘विठोबा.’ आपल्या प्रत्येक मूर्तीदेवता या प्रतिकात्मक आहेत. विठ्ठल ज्या विटेवर उभा आहे, ती आयताकृती असते. आयताकृती आकार हा पृथ्वीतत्त्व दर्शवतो. म्हणजेच विश्वातील परमात्मा म्हणजेच विठ्ठल होय. हे विष्णूचेच रूप समजले जाते. ‘व्याप्नोति इति विष्णु:।’ जो विश्व अंतर्बाह्य व्याप्त आहे, तोच विष्णू, तोच विठ्ठल आहे.
 
 
विठ्ठल, पंढरी, चंद्रभागा, एकादशी, नाम हे वारकरींचे पंचप्राणच आहेत. यांची भक्ती निरपेक्ष असते. याचे महत्त्वाचे सूूत्र म्हणजे, वारीला जाणार्‍याला दर्शनाचा अट्टहाससुद्धा नसतो. कळस दर्शनाने सुखावलेले-लक्षावधी वारकर्‍यांच्या अंतरी असणारे चैतन्यरूप विठ्ठलाचे दर्शन होऊनच ते तृप्त होतात. याची पाळेमुळे आपल्याला माऊलींच्या काळातून विशेषत्वाने जाणवतात.
 
 
‘या पंढरीचे सुख’, ‘माझे माहेर पंढरी’ हा सर्वच संतांचा भाव आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानकाका, नामदेव, गोरोबाकाका, सावतामाळी, चोखोबा या सर्वांसह मुक्ताईसुद्धा या वारीत सहभागी झाल्याचा उल्लेख पाहावयास मिळतो. जनाबाईंनी तर मातेच्या उदरातून वारीला प्रारंभ केला.
 
 
संत सखू, कान्होपात्रा यांनीही वारीत आपल्या भक्तीची परीक्षा दिली आहे. आजही हजारो महिला वारीत सहभागी होताना दिसतात. वैशिष्ट्य असे की, या संत महिलांची संख्या त्या मानाने कमी आहे. तरीही विठ्ठलप्रेमाने त्यांची प्रतिभा जागृत झालेली आहे. त्यांच्या भक्तीची उत्कटता त्यांच्या रचनेतून पाहावयास मिळते.
 
 
वारीत शारीरिक तपासह मानसिक तपही आहे. देहभानाचा विसर पडण्याची प्रक्रिया सहज घडणारी आहे. जेथे देहभाव नाही, तेथे देवभाव सहजच उदयास येतो. खरंतर प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. वारकरी एकादशीला पंढरीला विठ्ठल दर्शनाला जातात. एकादशीचे विशेष महत्त्व आहेच. पण, ‘वारी’ शब्दच मुळी आषाढी एकादशीशी संलग्न आहे. एकादशी व्रत हे वारकर्‍यांचा वसाच मानला जातो. एकादशी म्हटली की, घरी उपवासाची चर्चा सुरू होते. बटाटे, रताळी, साबुदाणा, शिंगाडे वगैरे.
 
 
 
खरंच तुकोबाराय माऊली या सर्वांनी एकादशी व्रत पाळले. त्यांनी खरा उपवास केला. ‘उप’ म्हणजे जवळ. ‘वास’ करणे म्हणजे राहणे. या संतांचा नित्यवास ईश्वररूपी विठ्ठलापाशीच होता. त्यांची एकादशी ही समजून घेऊया. आपण एकादशी तिथीच केवळ पाहतो. वारकरी एकदेशीय इंद्रिये म्हणजे ११ इंद्रिये विठ्ठलात रत ठेवतात. विठ्ठलात त्या सर्वांना रमवून लीन करणे ही खरी एकादशी, असा उपवास. मुखात नित्य नाम जप हाच खरा त्यांचा यज्ञसुद्धा होय. यासाठी माऊली म्हणते-
 
 
 
नामजप यज्ञ तो परम। बाधु न कसके स्नानदि कर्म।
नामे पावन धर्माधर्म। नाम परब्रह्म वेदार्थ।
किंवा तुकोबाराय म्हणतात-
नाम म्हणे ग्रासो ग्रासी। तोचि जेविला उपवासी।
नाम म्हणे वाट चाली। यज्ञ पावलो पावली।
 
 
या सर्वच संतांनी विठ्ठलाशी सर्वच नाती जोडली आहेत. त्याच्यावरच्या भक्तीसाठीच त्यांची वाणी रंगली. केवळ ईश्वराच्या स्तुतीत वाणी रमल्याने त्याला सहजच माधुर्य प्राप्त झाले. अद्वैतानुभूती घेतलेले सारेच सगुणात रंगतात. त्याच्या भक्तीचीच आस धरतात-
 
 
माऊली, तुझी गुण कीर्ती ऐकोनी आर्ते मन
उचंबळले। आलिंगना धाविनले उतावीळ॥
 
 
किंवा
 
 
तुझीया गुणांसाठी लागलो भजन पाठी।
तुझी सगुण गोडी हृदयी वसे।
मी म्हणे ते जीवन की निर्गुण चैतन्य घन।
व्याप व्यापक स्थान दुजे नाही॥
 
 
सावतामाळी म्हणतात-
 
 
बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे।
विठ्ठलवाणी मोट कालगि ती भी विठ्ठल गे॥
चंद्र सूर्य हे सर्व चराचर गमते विठ्ठल गे।
विठ्ठलाचा दास सावत्या तो भी विठ्ठल गे॥
 
 
जनाबाईंचे तर सर्वच भाव-नाती विठ्ठलाशी निगडित आहेत.
 
 
जनाबाई म्हणते-
 
 
जनी उकलीते वेणी। तुळशीचे वनी॥
माझे जनीला नाही कोणी। म्हणूनी देव घाली पाणी॥
 
 
नामदेवांचा संवाद तर विठ्ठलाशी नित्यच आहे.
 
 
नामदेव म्हणतात-
 
 
आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी॥
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर॥
चंद्रभागेच्या तटी। धन्य पंढरी गोमटी॥
नामा म्हणे बा श्रीहरी। आम्ही नाचु पंढरपुरी॥
 
 
तुकोबांचे सर्व नातलग एकच विठ्ठल हे सांगताना म्हणाले आहेत-
 
 
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा।
जाईन त्याच्या गावा भेटावया॥
माझिये माहेरी सुखा काय उणे।
नालगे येणे जाणे तुका म्हणे॥
 
 
चोखाबा- ‘आम्हां न कळे ते ज्ञान’ असे म्हणत वारीच्या वेळचे वर्णन करताना म्हणतात-
 
 
अबीर गुलाल उधळीत रंग।
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥
आषाढी कार्तिकी भक्त जन येती।
पंढरीचे वाळवंटी भक्त गोळा होती।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग॥
 
 
याच वारीत अनेक संतांचे दर्शनही घडते. संत म्हणजे ईश्वराची सगुण रूपडीच असतात. त्यांच्या सहवासासाठी तर वारकरी वारीला जातात. याचे वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात-
 
 
 
आजी उत्तम सुदिन। झाले दर्शन संतांचे।
पाप ताप दैन्य गेले। संत पाउलें पहातां॥
आवघा यत्न फळा आला। अवघा झाला आनंद।
एका जनार्दनी बरा। संत समागम खरा॥
 
 
या भूमीवर जोवर चंद्रसूर्य आहेत, तोवर पंढरी, पंढरीचे महत्त्व, वारी, विठ्ठलाचे नाम, एकादशी हे सारे शाश्वत असणारच आहे. या संतांना विठ्ठलाची कृपासावली आहे. त्याच सावलीचा आश्रय तुम्हा-आम्हाला प्राप्त व्हावा, याच प्रार्थनेने या शब्दांना विराम देते.
 
- अलका मुतालिक