
मुंबई : तुम्हाला लस मिळाली नाही म्हणून कदाचित लसीकरण केंद्रातून कदाचित माघारी यावे लागत असेल. कोरोनापासून बचावासाठी दिल्या जाणाऱ्या लसीचा तुटवडा असल्याचे चित्र सध्या मुंबईतील केंद्राबाहेर उभे केले जात आहे. लसीकरणासाठी लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. मात्र, या लसी केवळ कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहिममध्ये या प्रकरणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या प्रांत प्रचारक प्रशांत पळ आणि जिल्हा सहमंत्री शरद गुप्ता यांनी लसीकरण केंद्रांवर सुरू असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात शिवाजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपासून जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि आरोग्य विभागाचे वीरेंद्र मोहिते यांच्या नियोजनामुळे माहीमच्या मेंटरर्निटी रुग्णालयात लसीकरणाचे काम सुरू असून अनेक लोक प्रतिदिन तेथे लस घेण्यासाठी येत असतात.
केंद्रावरील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी देखील सहकार्य करत आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उच्छाद मांडल्याचे दिसून येत आहेत. भरउन्हात ज्येष्ठ नागरिक उभे असताना राजकीय दादा पुढारी व नेते आतमध्ये स्वतःची माणसे थेट घुसवतात आणि लस देऊन आणत आहेत. कोरोनाच्या गंभीर काळात अशाप्रकारे सुरू असलेल्या दादागिरीची तक्रार पळ यांनी केली आहे.
शनिवारी लस संपली असे सांगून डॉक्टरांनी जेवढ्या लोकांकडे टोकन आहे तेवढ्या लोकांनाच लस मिळणार असे सांगून बऱ्याच लोकांना परत पाठवल्यावर त्या लोकांनी नाराजगी व्यक्त केली. मात्र सायंकाळी लसीकरण केंद्रावर डॉक्टरांच्या नकळत आत सेवेच्या नावाखाली असणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी VIP टोकन असे लिहून कित्येक ओळखीच्या कार्यकर्त्यांना लस दिली. तिथे असणाऱ्या विहिपच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचे चित्रिकरण केले आहे. हा प्रकार तातडीने थांबवावा सर्वाना समान न्यायाने लसीकरण केले जावे, यासाठी विहिपतर्फे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन त्यांच्या न कळत सुरू असलेल्या सदर विषयात त्वरित लक्ष घालण्याची विनंती केली आहे.