मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिना निमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी साधेपणाने अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे. जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार शासन स्तरावरही साजरी करण्यात येईल. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन सर्वजण करूयात." अशी अपेक्षाही मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणून व्यक्त केली.
जयंती समन्वय समितीच्या वतीने १४ एप्रिल या जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. शिवाय चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी न करता अभिवादन केले जावे व राज्यभरातील अनुयायांनाही जयंती साजरी करण्याच्या शासन परिपत्रकातील नियमावलींचे पालन करूनच केली जावी असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमी येथील स्मारक स्थळावरून अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, यावर्षी सर्व आंबेडकरी अनुयायांनी याद्वारे घरातून अभिवादन करावे, बीआयटी चाळ, इंदूमिल तसेच डॉ. बाबासाहेबांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणीही अभिवादन कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे.