श्रावणी पौर्णिमा
श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा येते. त्याच दिवशी रक्षाबंधनही असते. बहीण भावाला तिचे रक्षण करण्याच्या हेतूने एक बंधन बांधून रक्षाबंधनोत्सव साजरा करते. दीपावलीत बहीण भावाला अक्षय आयुष्य लाभावे म्हणून ‘अक्षवान’ करते, बहिणीला भावाला ओवाळण्याचा आणि भावाने बहिणीच्या रक्षणाकरिता बहिणीकडून जे बंधन बांधायचे याचा उत्सव केवळ वैदिक परंपरेतच आहे.
नागपंचमी आणि कुंडलिनी जागृतीचे विज्ञान
पंचतत्त्वाचे साधन करण्याकरिता प्रथम कुंडलिनी जागृत होणे जे आवश्यक असते, त्याचे स्मरण म्हणजे नागपंचमी होय. मूलाधारातील कुंडलिनी एखाद्या सर्पाप्रमाणे साडेतीन वेटोळी घालून बसलेली असते. कुंडलिनीचा अर्थच मुळी सर्प असा आहे. शक्ती ज्यावेळेस मोकळी होते, त्यावेळेस ती एखाद्या सापाप्रमाणेच पळताना दिसणार! एखादा चपळ नाग जसा सळसळत जातो तद्वत मूलाधारातून कुंडलिनी जेव्हा जागृत होते, तेव्हा ती एखाद्या नागिणीप्रमाणेच सळसळत जाताना साधकाच्या दृष्टोत्पत्तीस येते. कुंडलिनी म्हणजे साप नव्हे, पण साधकाचे मन त्या शक्तीचे रूपांतर सर्पाकारात करते आणि अशा साधकाला प्रत्यक्षात सर्पदर्शन किंवा नागदर्शन घडते. त्या अद्भुत दर्शनाचे स्मरण म्हणजे आजची नागपंचमी होय. कुंडलिनी जागृतीमुळे साधक दिव्य जगतात प्रवेश करतो. हे जरी खरे असले, तरी ती सुरुवातीची किंवा सर्वात उच्च अवस्था नसून मध्यम अवस्था नक्कीच आहे.
भारतात या विषयावर आता बुवाबाजी सुरू झाली आहे. सामान्यांना याचे ज्ञान नसल्यामुळे काही तथाकथित महाराज व माताजी स्वतःची कुंडलिनी जागृत नसली तरी दुसर्यांची कुंडलिनी जागृत करण्यास धजावतात व स्वतःचे व सामान्य नागरिकांच्या शरीराचे पानिपत करून घेतात. कुंडलिनी फक्त स्वप्रयत्नानेच जागृत होत असते. डोक्यावर हात ठेवून नव्हे. हा विषय कठीण आहे, पण सोपा होण्यासाठी थोडे विस्ताराने लिहिणे आवश्यक आहे. सुखाचा शोध अनादी काळापासून मानव घेत आलेला आहे. योगसाधनेबद्दल उत्पन्न झालेले आकर्षण हा स्थायी सुखाच्या शोधाचाच एक भाग आहे.
आधुनिक वैज्ञानिक सुखसाधनांमुळे सुख व मनाची शांती प्राप्त होईल, असे प्रत्येकाला वाटते. इच्छित वस्तू प्राप्त झाली अथवा दुरावली असता ज्याला आपण सुख वा दु:ख समजतो, तो हर्ष व खेद हे दोन्ही मनाचे विकारच आहेत. उपभोग घेणार्या प्रत्येकास क्षणभर विरंगुळा वाटतो खरा, पण सुखसाधनांची सवय लागल्यामुळे मानवाचे मन पूर्वीपेक्षा अधिकच व्यसनी, दुर्बल व समाज विघातक बनते. वास्तविक आत्म्याचे खरे स्वरूप आनंदमयच आहे. अनेक शतकांपूर्वी होऊन गेलेल्या भगवान पतंजलींनी याची व्याख्या सांगितली आहे. ‘योगः चित्तवृत्ती: निरोधः’ विचाररहित, अहंकाररहित समाधी अवस्थेमध्ये संस्कार शांत झाल्यावर व साधक विश्वाच्या मूळ अवस्थेशी एकरूप झाल्यानंतरच खर्या शांतीचा अनुभव घेतो. यात ‘निरोध’ शब्दाचा आशय वृत्तींचा विरोध वा नष्ट करणे नसून त्यांना कुशलतेने आपल्या ताब्यात घेऊन त्यांचा उत्तम कार्याकरिता विकास करणे असा आहे. स्वतःच आपल्या चित्तवृत्तीवर संयम साधून चित्तावर आणखी बाह्य संस्कारांचा पगडा न बसू देणे असल्या अभ्यासाला ‘योगाभ्यास’ म्हणतात. चित्त वा अंत:करण म्हणजे संपूर्ण सुखाचे शांत स्वरूप अथवा समाधानी अवस्था होय. स्वामी विवेकानंद म्हणतात, त्याप्रमाणेही अवस्था आरशासारखी वा एखाद्या शुद्ध व शांत तळ्याच्या पाण्याप्रमाणे असते. मनाद्वारे बाहेरून प्राप्त झालेले संस्कार नसण्याइतके शांत झाल्यास त्या मूळ अवस्थेला ‘चित्त’ असे म्हणतात. एखादी ‘स्प्रिंग’ ताणून धरल्यास व नंतर सोडल्यास जशी ती मूळ अवस्थेत परत येते, तद्वत चित्ताला त्याच्या मूळ अवस्थेत राहू दिल्यास ते आपणहून उत्क्रांतीच्या उच्च अवस्था प्राप्त करीत असते.
शरीर आणि मन
आपल्या जड शरीराबद्दल आपण जाणतोच. आपण त्याशिवाय कोणतेच कर्म करू शकत नाही. म्हणूनच ‘शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनं’ असे म्हटले आहे. पण, ते पराधीन असते. त्याला चालविणारे त्यामागील मन अतिशय सूक्ष्म म्हणजेच संस्कारांची मूस असते. मन संकल्प-विकल्प करीत असते. म्हणजे विचार येत जात असतात. बुद्धी म्हणजे मनाचीच निश्चयात्मक अवस्था जी पूर्वानुभवावर आधारित असते. त्यापलीकडील संस्काररहित अवस्था म्हणजे चित्त. ती खरी बुद्धी होय, जी पूर्वग्रह दूषित न राहता सत्य परिस्थितीचे दर्शन घडविते. त्यापलीकडे परमात्मा विराजमान असतो.
मनाचा व शरीराचा घनिष्ट संबंध असून एकमेकांवर ते परस्पर परिणाम करीत असतात. ध्यानधारणा करणार्या योग्याच्या मनात अत्यंत वेगाने उत्तम संस्कार ग्रहण होत असतात. ते पेशीपेशीत साठवले गेल्यामुळे त्याप्रमाणे शरीरही बदलते. पेशीत गुणसूत्रे, त्यात ‘जीन्स’ व त्यातही गोल-गोल ‘कॉईल’प्रमाणे कुंडलरचना असते. त्यात व्यक्तीचा स्वभाव साठवलेला असतो. त्याला विज्ञानात ‘डीएनए’ असे म्हणतात. तीच ‘कुंडलिनी’ होय. त्याचे मुख्य संयमकेंद्र मूलाधाराकडे असते व तिथेच प्रथम जाणीव होते. शरीरात रक्तप्रवाह अधिक वाढल्यामुळे मुंग्या अंगावर चढत आहेत असे वाटते. कालांतराने विद्युत चुंबकीय बदलामुळे शरीराला झटके बसतात व अंगाचा दाह सुरू होतो. हेच भगवान शंकराचे विषप्राशन होय. जे देव व दानव (चांगल्या-वाईट वृतींचे युद्ध) समुद्र मंथनाने सर्वप्रथम प्राप्त होते. सर्वात शेवटी आत्मज्ञानाचे अमृत प्राप्त होते. हा दाह जुन्या पेशींची जागा नव्या पेशी घेत असल्यामुळे होतो. नवीन पेशी स्थिर झाल्यावर साधक अपार शांतीच्या राज्यात प्रवेश करतो. नवीन तेज:पुंज शरीर व अष्टसिद्धी प्राप्त करतो. कुंडलिनी जागृत झालेला साधक आता सर्वगुणसंपन्न, सर्वांग सुंदर, प्रमाणबद्ध शरीराचा बनतो. जसे सर्व खरे संत असतात. उदा. ज्ञानेश्वर माऊली, स्वामी विवेकानंद, संत मीराबाई.
समाधी अवस्थेतील योगी
समाधी अवस्थेत असणार्या योग्याच्या शरीरातील श्वासोच्छवास, रुधिराभिसरण, अन्नपचन आणि पेशीवृद्धी यासारख्या जीवनावश्यक सर्व प्रक्रिया बंद असतात. समाधी अवस्थेत अनेक दिवस असणार्या योग्याच्या शरीरावरील असलेल्या केसांचे अथवा नखांचेही वर्धन होत नसते. त्या योग्याचे समाधी अवस्थास्थित कल्प शरीरात कोणतीच प्रक्रिया चालू नसल्याने ते प्रक्रियाबंद शरीर कुजत नाही की ते सडून त्यातून कुजलेला वायूसुद्धा निघत नाही. जोपर्यंत त्या शरीरातील विश्वात्मक झालेला जीवात्मा, त्याच्या शरीरभावावर येत नाही, तोपर्यंत ते समाधिस्त शरीर तसेच राहते. असल्या जड शरीराला ‘कल्पशरीर’ म्हणतात आणि हे कल्पशरीर तो योगी कितीही काळ त्या शरीराबाहेर असला तरी सडत किंवा नष्ट होत नाही, जी अवस्था इतर सामान्य माणसाच्या मृत शरीराची असते.
(क्रमशः)
शब्दांकन : राजेश कोल्हापुरे
९७०२९३७३५७/९५९४७३७३५७