स्वरोद्यशास्त्र’ हे योगशास्त्राचे उपांग असून, त्याला ‘स्वरज्ञान’ किंवा ‘काकुज्ञान’सुद्धा म्हणतात. म्हणून भगवान रामांना काकुत्स्थ वंशाचे मानलेले आहे. जो काकुज्ञान जाणतो, तो काकुत्स्थवंशी आहे. आकाशतत्वाचे साधक काकुत्स्थ वंशाचे आहेत.
श्रीविष्णू, श्रीराम आणि श्रीकृष्ण या जरी एकाच आकाश तत्वाच्या देवता असल्या तरीसुद्धा साधकाच्या पिंडधर्मानुसार अनुभवामध्ये थोडी भिन्नता येते. म्हणून श्रीविष्णू, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रुपाने आकाश तत्वाचे भिन्न अनुभव येतात. श्रीरामांना विष्णूचा अवतार मानण्यात येते. श्रीविष्णू सुदर्शन आणि गदाधारी तर राम धनुष्यधारी दाखविलेले आहेत. भगवान श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण यांचे जीवनचरित्र व्यासांनी रेखाटले आहे. म्हणून त्यांनी श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म दिलेले आहे. श्रीरामाचे चरित्र वाल्मिकींनी लिहिले आहे. उपनिषदात श्रेष्ठ साधकाचे रूपकात्मक वर्णन आहे, ‘प्रणवो धनुः शरोह्यात्मा ब्रह्मतल्लक्षमुच्यते’ जो साधक ब्रह्म अवस्थेचे शरसंधान करेल, तो रामच होय, म्हणून वाल्मिकींनी केलेले श्रीरामांचे अध्यात्मिक चित्रण कोदंडधारी राम असे आहे.
गीतेमध्ये भगवंताने म्हटले आहे, ‘योगः कर्मसु कौशलम्’, जो साधक कौशल्याने साधना करेल, त्याची माता कौसल्याच राहील. जो साधक आपल्या काया (शरीर) भावांपासून मुक्त असतो, त्याची दुसरी माता कैकाया म्हणजे कैकयी राहील आणि जो साधक आपली दशेंद्रिये काबूत ठेवील, त्याचा पिता दशरथच राहील. दशरथ का? तर उपनिषदे म्हणतात, ‘आत्मानं रथिनं विद्धि, शरीरं रथमेव तु श्र बुद्धि तु सारथिं विद्धि, मनः प्रग्रह मेव च॥’ शरीर हे रथ आहे. आत्मा त्या रथाचा मालक असून बुद्धी सारथी आहे. मन हे लगाम आहे. दशेंद्रियावर पूर्ण संयम ठेवणारा श्रेष्ठ साधक म्हणजे दाशरथी राम होय. आकाशतत्वीय साधक रामाचा हा प्रत्यक्ष दर्शनसाक्षात्कार आहे. म्हणून या अर्थाने प्रभू श्रीरामचंद्र सर्व जगाचे आदर्श होते व राहतील.
सुदर्शन चक्रधारी श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण
विश्वाची रचना आणि घटनाक्रमाची चक्रगती यांच्या आधाराने भगवान वेदव्यासांनी भगवान श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म देऊन कथा सजविल्या आहेत. श्रीविष्णू आणि श्रीकृष्णसाधकाच्या अत्युच्च अवस्था आणि अनुभव यांचे वर्णन आहे, हे ध्यानसाधना केल्यावर प्रत्येकाला पटू शकेल. भगवंत दूर नाहीत. ते प्रत्येकाच्या हृदयात विराजमान आहेत. आकाश तत्वामध्ये साधक नेहमी शंखध्वनी ऐकतो, अशा प्रकारच्या शंखध्वनीचा नाद साधक आपतत्वामध्येसुद्धा ऐकतो, म्हणून भगवान शिवाच्या हातात शंख दिलेला आहे. आप तत्वाच्या साधकाला ध्यानावस्थेत प्रथम मस्तकात चंद्रदर्शन होते, म्हणून शिवाच्या डोक्यावर चंद्रमा दाखविलेला आहे. चंद्राचे दर्शन डोक्यावर होते, त्याच्या बाहेरून होत नाही.
बाहेरच्या चंद्राचे दर्शन भ्रामक असते. भगवान श्रीरामाच्या दर्शनसाक्षात्काराच्या वेळी साधकाला जर चंद्रदर्शन झाले, तर रामदर्शन साधकाकरिता फार सुखावह असते, नाही तर चंद्राशिवाय रामदर्शन शरीरात दाह उत्पन्न करेल. म्हणूनच भगवान रामाला ‘श्रीरामचंद्र’ असे म्हणण्यात येते. साधनानुभवांचे हे दिव्य रहस्य आहे.भगवंताच्या हातात पद्म किंवा कमळ का दाखविले आहे? साधकाला तेजस तत्वात कमळाचे दर्शन होते ते आपण पाहिलेलेच आहे. हेच कमळ आडवे केल्यास ‘ओमकार’ चिन्ह बनते. म्हणून ओमकार चिन्ह जे कमळ, ते भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या करकमलात दाखविलेले आहे. आता गदेचे प्रयोजन काय? ‘गद’ म्हणजे प्रहार करणे. साधनामार्गात येणार्या अडचणी व अडथळे जो साधक हसत खेळत दूर सारतो, त्याच्या हातात गदा का नसावी? एकेकाळी साधारण मानवाच्या हातात शस्त्र म्हणून गदा असेल. परंतु, साधकाची गदा म्हणजे त्याचा दृढ निश्चय आणि कर्मपरायणता होय.
आता भगवंताच्या बोटात सुदर्शन चक्र का म्हणून? सुदर्शन चक्र घटनेला एक दिव्य इतिहास आहे. मंदिरात आपण आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून दक्षिण म्हणजे उजव्या बाजूने देवाभोवती फिरतो.आपण सामान्यजनांना घटनाच प्रिय असतात. वाम म्हणजे डाव्या बाजूने. एखाद्याच्या मृत्यूनंतर जड शरीराचे जीवात्म्यासोबत विघटन झाल्यावर आपण डाव्या बाजूने सर्व विधी करतो. सूक्ष्म शरीराने आपल्या शरीरातून बाहेर पडताना एक चक्र दिसते, ते डाव्या बाजूने फिरत असते व बाहेर पडून पुन्हा शरीरप्रवेश करणार्या परमयोग्याला चक्र दिसते, ते उजव्या बाजूने फिरत असते. असा अनुभव येतो की, विश्वातील सार्या वस्तुमात्रांच्या घटनेची घडण प्रदक्षिणाकार गतीने म्हणजे उजव्या बाजूने होते, म्हणजे कोणत्याही घटनेकरिता प्रदक्षिणा गती आवश्यक आहे. अशाप्रकारे सुघटना प्रदान करणारी गती सुदर्शन असली पाहिजे. विश्वाची ही सुदर्शन गती दाखविणारी रहस्य अवस्था म्हणजे श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या हातात दाखविलेले सुदर्शन चक्र होय. याच सुदर्शनाभोवती वेदव्यासांनी कितीतरी कथा रचलेल्या आहेत. आबालवृद्ध वाचकांना त्यांत अवीट गोडी आणि रूची वाटते.
आपण हे पाहिलेच आहे की, व्यक्तिमात्रांच्या पिंडधर्मानुसार जर साधना केली, तर साधनेत यश मिळते आणि कष्टसुद्धा कमी पडतात. प्रत्येक पिंडधर्मानुसार त्याची बुद्धी आणि साधना भिन्न राहील. ’पिंडे पिंडे मतिर्भिन्नाः’, प्रकृतीमध्येच विभिन्नता आहे, म्हणून साधकाच्या भिन्नतेनुसार साधनाही भिन्न राहील. अशाप्रकारे सुयोग्य साधकाला कमी कष्ट पडतात, गीतेत म्हटले आहे, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु। युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख हा॥ १७, अ, ६ ॥वैदिक परंपरेत आपल्या पिंडानुसार साधना करण्यावर फार जोर दिलेला आहे. हिंदू परंपरेत साकार, निराकार, आस्तिक, नास्तिक, देवी, देवता, गुरु, कोणावरही श्रद्धा ठेवून सर्वांनाच येथे आपल्या मताप्रमाणे उपासना करण्याची मुभा आहे. अन्य धर्मपंथात साधनेत एकता आणि सरुपता र्(ीपळषेीाळीं) ठेवलेली आहे. याच कारणाने इतर धर्मपंथात वैदिक परंपरेप्रमाणे मोठ्या प्रमाणात श्रेष्ठ साधक आणि परमध्यानावस्था प्राप्त करणारे संत झालेले नाहीत. आपल्या पिंडधर्माप्रमाणे केलेली साधना खालच्या अवस्थेची का असेना, पण साधकाने तीच करावी. कारण, त्यातच त्याचा अध्यात्मिक लाभ आहे. गीतेत हेच सत्य सांगितलेले आहे:
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परमधर्मात् स्वनुष्ठितात् । स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥३५, अ ४॥
अलीकडे याची आपल्याला विस्मृती झालेली आहे. काही भक्तिमार्गी, काही कर्ममार्गी, तर दुसरे योगमार्गी राहू शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या पिंडधर्मानुसारच त्याने साधना केली पाहिजे. (क्रमशः)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)