‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हा घातपात असण्याची शक्यता आहे,
अशी आराओरड केली जात आहे. त्याचा ऊहापोह करणारा हा लेख!
८ डिसेंबर रोजी भारताचे ‘सीडीएस’(चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत प्रवास करणार्या त्यांच्या पत्नी, अन्य सैनिक, क्रू सदस्य असे मिळून या दुर्घटनेत एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून ‘ग्रुप कॅप्टन’ वरुण सिंह बचावले आहेत. शुक्रवारी त्यांना पुढील उपचारासाठी बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल केले.त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
भारताच्या तीनही दलांचे प्रमुख आणि महत्त्वाच्या व्यक्तीचे असे अपघातात दुर्दैवी निधन होणे हे चिंताजनकच! यावरून हा अपघात आहे की घातपात, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर सखोल चौकशी केली जाणार असल्याचे घोषित केले आहे. परंतु, तरीही जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर भारताच्या हेलिकॉप्टर सुरक्षिततेविषयी बोलणे फार निकडीचे आहे. त्याचसोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक ब्रह्मा चेल्लानी यांनी या प्रकरणावरून चीनवर उठवलेले बोट आणि त्यावर ‘ग्लोबल टाईम्स’ वर्तमानपत्राने केलेला विरोध आणि भारतीय सैनिकांची बदनामी करण्याचा झालेला प्रयत्न याविषयीही बोलणे गरजेचे आहे.
‘एमआय-१७ व्ही ५’ अद्ययावत की धोकादायक?
बिपीन रावत ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, त्या हेलिकॉप्टरचे नाव ‘एमआय-१७ व्ही ५’ असे आहे. हे हेलिकॉप्टरच्या ‘एमआय-८-१७’ कुटुंबातील लष्करी वाहतूक करणारे हेलिकॉप्टर आहे. त्याची निर्मिती रशियन हेलिकॉप्टरची उपकंपनी असलेल्या ‘कझान हेलिकॉप्टर’ने केली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने डिसेंबर २00८ मध्ये रशियन हेलिकॉप्टरला ८0 ‘एमआय’ हेलिकॉप्टरसाठी १.३ अब्जचे कंत्राट दिले होते. या हेलिकॉप्टरची ‘डिलिव्हरी’ भारतीय वायुदलाला २0११ मध्ये सुरू झाली. २0१३ च्या सुरुवातीला ३६ हेलिकॉप्टर्स वितरित करण्यात आली. २0१३ मध्ये २00८ सालच्या कराराच्या आधारावर ‘एमआय- १७ व्ही ५’ चीही ऑर्डर देण्यात आली होती. जुलै २0१८ मध्ये या हेलिकॉप्टरचा उपयोग भारतीय सैन्यात केला जाऊ लागला.
वायुसेनेचे ‘एमआय-१७ व्ही ५’ हे एक ‘मीडियम लिफ्ट हेलिकॉप्टर’ आहे. लष्कराचे जवान, ‘आर्म ट्रान्सपोर्ट’, ‘फासर सपोर्ट’ तसेच बचाव आणि शोध मोहिमांसाठी हे हेलिकॉप्टर तयार करण्यात आले आहे. वायुदलातील एक सामर्थ्यशाली हेलिकॉप्टर अशी ओळख ‘एमआय-१७ व्ही ५’ ची आहे. दोन इंजिन्स असलेले हे हेलिकॉप्टर ‘व्हीव्हीआयपी’ व्यक्तींसाठी वापरले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त या हेलिकॉप्टरचा वायुसेनेच्या महत्त्वपूर्ण अभियानामध्ये वापर केला जातो. मुख्यत्वे लष्कराच्या परिवहनासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. जगातील सर्वात आधुनिक हेलिकॉप्टरच्या क्रमवारीत रशियन बनावटीच्या या ‘एमआय-१७ व्ही ५’ चा क्रमांक लागतो. कमाल २५0 किलोमीटर ताशी वेगाने सहा हजार मीटर उंचीपर्यंत हे हेलिकॉप्टर उडू शकते. एकदा इंधन भरल्यानंतर हेलिकॉप्टर ५८0 किलोमीटरचे अंतर कापू शकते.
कमाल १३ हजार किलो वजनासोबत उड्डाण घेण्याची हेलिकॉप्टरची क्षमता आहे. शस्त्रांनीयुक्त जवळपास ३६ जवान एकाचवेळी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करू शकतात. विविध हत्यारांनीयुक्त या हेलिकॉप्टरमध्ये ‘शतर्म-पाच’, ‘मिसाईल्स’, ‘एस-आठ रॉकेट’, ‘एके-२३ एमए मशीन गन्स’, ‘पीकेटी मशीन गन्स’सह आठ ‘फायरिंग पोस्ट’देखील असतात. रात्रीच्या वेळी कारवाई करण्यात हेलिकॉप्टर सुसज्ज आहे. ‘२६/११’ च्या हल्ल्यादरम्यान ‘कमांडो ऑपरेशन’मध्ये या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. पाकिस्तानी ‘लॉन्च पॅड’ला उद्ध्वस्त करण्यासह ‘सर्जिकल स्ट्राईक’सारख्या मोठ्या अभियानात या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता.जगातले एकूण ६0 देश या हेलिकॉप्टरचा वापर करतात. रशिया, अमेरिका, चीन आणि अन्य महत्त्वपूर्ण देश या हेलिकॉप्टरचा वापर सैन्याशी निगडित कामांसाठी करतात. त्यामुळे असे अद्ययावत हेलिकॉप्टर भारतात विशेष महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या ये-जा करण्यासाठी सर्रास वापरले जाते.
हेलिकॉप्टर अद्ययावत, तरी अपघात झाला म्हणजे हा घातपात होता?
हेलिकॉप्टर अथवा विमान प्रवासादरम्यान अनेक गोष्टींचा खूप बारकाव्याने विचार केला जातो. हेलिकॉप्टरच्या स्थितीचा अभ्यास तंत्रज्ञानाच्या आधारावर करणे शक्य आहे. परंतु, हवामान अथवा अन्य नैसर्गिक गोष्टी अनेक वेळा तंत्रज्ञानाला चकवा देऊन जाऊ शकतात. जगात अनेक ठिकाणी या हेलिकॉप्टरचा वापर अत्यंत महत्त्वपूर्ण कामासाठी केला जातो. परंतु, याच हेलिकॉप्टरचे अपघातही जगभरात घडले आहेत. याचवर्षी जून २0२१ मध्ये केनिया येथे ‘एमआय-१७ व्ही ५’चा अपघात झाला होता. ऑगस्ट २0२१ मध्ये मेक्सिकन नाविक दलाचे ‘एमआय-१७ व्ही ५’ हेलिकॉप्टर ‘क्रॅश’ झाले होते.
अझरबैजान येथे याच हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तेथीलही अनेक उच्च पदस्थ अधिकार्यांचा मृत्यू झाला होता. चीनमध्येही २0२0 मध्ये याच हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. भारतातही यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. त्यात सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. भारतात मागील दोन वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि रशियन हेलिकॉप्टर किंवा विमानांचा ‘क्रॅश’ होण्याचा आकडा दुर्दैवाने अधिक आहे. यावर भारत सरकारने दहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प जाहीर केला आहे. भारताने स्वदेशी, अद्ययावत, मजबूत आणि सैन्याच्या वापरासाठी सुसज्ज असे हेलिकॉप्टर निर्माण करण्याचा निर्णय २0१९ मध्ये घेतला होता. २0२५ पर्यंत कदाचित हे हेलिकॉप्टर उत्पादित होऊन आपल्या सैन्य ताफ्यात समाविष्टसुद्धा होईल. त्यामुळे भारत सरकार देशाची सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत व्हावी आणि शस्त्रांस्त्रावर इतर देशांवर अधिक अवलंबून राहता येऊ नये, यासाठी सतत प्रयत्न करत आहेच.
मागील काही वर्षांत भारतात घडलेल्या लष्करी हवाई अपघातांची यादी
२१ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात प्रशिक्षणादरम्यान ‘आयएएफ’चे ‘मिराज २000’ विमान ‘क्रॅश’ झाले.
२५ ऑगस्ट रोजी राजस्थानच्या बाडमेर येथे प्रशिक्षण मोहिमेदरम्यान ‘आयएएफ’चे ‘मिग-२१’ लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले.
२0 मे रोजी पंजाबच्या मोगा जिल्ह्यात ‘मिग-२१’ विमान अपघातात ‘आयएएफ’ पायलटचा मृत्यू झाला.
१७ मार्च रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे ‘मिग-२१ बायसन विमानाच्या अपघातात ‘आयएएफ’च्या ‘ग्रुप कॅप्टन’चा मृत्यू झाला.
‘मिग २१ बायसन’ विमान दि. ५ जानेवारी रोजी राजस्थानच्या सुरतगडमध्ये लॅण्डिंग करताना ‘क्रॅश’ झाले.
याआधी फेब्रुवारी २0१९ मध्ये, ‘आयएएफ’च्या ‘एरोबॅटिक टीम सूर्यकिरण’ची दोन विमाने हवेत एकमेकांवर आदळल्यानंतर ‘क्रॅश’ झाली.
त्यात एक पायलट ठार झाला आणि ‘एरो इंडिया शो’च्या तालमीदरम्यान सुरक्षिततेसाठी बाहेर पडलेले दोघे जखमी झाले.
यापूर्वी ऑक्टोबर २0१७ मध्ये, अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ प्रशिक्षणादरम्यान भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याने किमान सातजणांचा मृत्यू झाला होता.
याआधी डिसेंबर २0१५ मध्ये, दिल्ली विमानतळाजवळ निमलष्करी दलाचे विमान कोसळल्याने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दहा जवान हुतात्मा झाले होते.
याचा अर्थ हेलिकॉप्टरच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे का?
जगभरात हेलिकॉप्टरचे अपघात होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. दरवर्षी जगभरात असे शेकडोंहून अधिक अपघात होत असतात. परंतु, रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण हे याहून कितीतरी पटीने अधिक आहे. दरवर्षी सरासरी १.३ दशलक्ष लोकांचा मृत्यू रस्त्यांवरील अपघातात होतो, जो हवाई अपघातामुळे होणार्या मृत्यूंपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. दुर्दैवाने रस्ते अपघातात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. हेलिकॉप्टरचे अपघात होण्यामागे अनेक कारणे असतात. काही नैसर्गिक, काही तांत्रिक, तर काही मानवनिर्मितही असतात. ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांच्या अपघातामागचे नेमके कारण आपल्याला चौकशीनंतरच कळेल.
जनरल बिपीन रावत यांच्या अपघातावर जागतिक मतमतांतरे : अपघात की घातपात?
नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. होमी भाभा यांचेही असेच अपघातात निधन झाले होते. ते संशयास्पदच आहे, असे इतिहासकार मांडतात. त्यामुळे देशाच्या सर्वात अनुभवी आणि कार्यक्षम सैनिकांचा असा मृत्यू झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक ब्रह्मा चेल्लानी यांच्या एका ट्विटवरून संपूर्ण जगभर गदारोळ माजला आहे. ब्रह्मा चेल्लानी यांनी ट्विट केले की, “जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात आणि २0२0च्या सुरुवातीला तैवानमध्ये घडलेल्या हेलिकॉप्टरच्या अपघातात एक विचित्र साम्य आहे, ज्यात तैवानचे ‘चीफ ऑफ जनरल स्टाफ’ जनरल शेन यी-मिंग आणि दोन प्रमुख जनरल यांसह इतर सात जण ठार झाले. प्रत्येक हेलिकॉप्टर अपघातामध्ये चीनच्या विरोधातील व्यक्तीचा मृत्यू कसा होतो?”
याला उत्तर देताना चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ वर्तमानपत्राने रिट्विट केले की, “या दोन्ही अपघातांत साधर्म्य असणे म्हणजे यात देशाबाहेरच्या व्यक्तीचा हात असणे, असा होत नाही आणि असेलच, तर रशियाबरोबर ‘एस-४00’ करार केल्यामुळे रागावलेल्या अमेरिकेचा असू शकतो.”
स्वतःचे ठेवावे झाकूनइतरांचे पाहावे वाकून!
‘ग्लोबल टाईम्स’ वर्तमानपत्र एवढ्यावरच थांबले नाही, तर त्याने या घटनेवरून एक लेख प्रकाशित केला. त्यात भारतीय सैन्याच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत ही घटना भारतीय सैन्याच्या बेशिस्तीमुळे घडली असे लिहिले. यावरून त्या वर्तमानपत्राने निष्कर्ष मांडला की, “चीन आणि भारत युद्ध झाले, तर भारताच्या या बेशिस्त वागण्यामुळेच त्याचा दारूण पराभव होईल.” मात्र, हे सांगताना हे वर्तमानपत्र चीनमध्ये याचवर्षी त्यांचे अद्ययावत लढाऊ विमान ‘जे-२0’ फक्त इंजिनमध्ये चिमणी अडकली म्हणून ‘क्रॅश’ झाले हे विसरते. त्यामुळे अशा अद्ययावत हेलिकॉप्टर किंवा विमानांचे अपघात नैसर्गिक कारणांमुळे होतात. यावरून भारतीय सैन्याच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवण्याचा अधिकार निकृष्ट वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनने तरी करूच नये.
भारतातील चिनी प्रवक्ते!
तैवाननेही ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केल्यानंतर नाकाला मिरच्या झोंबलेल्या चीनने अथवा चिनी वर्तमानपत्राने भारतीय सैन्यावर टीका करणे, हे साहजिकच. यात काही आश्चर्याची बाब नव्हे. मात्र, चीनचे भारतातील प्रवक्तेही या गोष्टींवरून भारतीय सैन्याला कात्रीत पकडू पाहत आहेत. चीनपेक्षा चीनच्या जाहिराती मोठा गाजावाजा करून प्रस्तुत करणार्या आणि भारतीय सरकारला किंवा सैन्याला सतत दूषणे देणार्या भारतीय चिनी प्रवक्त्यांकडून वस्तुतः भारतीयांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे.
घातपाताची शक्यता?
घातपाताची शक्यता टाळता येत नसली तरी फक्त तर्क-वितर्काच्या जोरावर काहीही निष्कर्ष काढणे उचित होणार नाही. त्यामुळे अशा चिनी प्रवक्त्यांना भारताच्या प्रशासनावर आरोप करण्याची संधीच आपण देतो. ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू अत्यंत दु:खद आणि गंभीर बाब आहे आणि याची सरकारला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे सरकारने अत्यंत सखोल अशी चौकशी म्हणजे ‘ट्राय सर्व्हिस इन्क्वायरी’ करण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकशीचे प्रतिनिधित्व ‘एअर मार्शल’ मानवेंद्र सिंग करत आहेत. तसेच तामिळनाडूमधील पोलिसांकडूनही याचा तपास सुरू आहे. हेलिकॉप्टरमधील ‘ब्लॅक बॉक्स’ही सापडल्यामुळे अपघातामागचे नेमके कारण लवकरच आपल्या समोर येईल. त्यामुळे आताच तर्क-वितर्क लढवत बसण्यात काहीच अर्थ नाही. याउलट ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत आणि इतर कार्यक्षम १२ सैनिकांच्या मृत्यूनंतर भारताची झालेली हानी लवकरात लवकर कशी भरून काढता येईल, यावर विचार करणे अधिक गरजेचे आहे.
विमान अपघातात मृत्यू झालेले काही महत्त्वाचे भारतीय
१. दोर्जी खांडू (२0११), अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
२. वाय. एस. राजशेखर रेड्डी (२00९), वाय. एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री.
३. ओ. पी. जिंदाल, सुरेंदर सिंग (२00५), ओ. पी. जिंदाल हे हरियाणाचे उद्योगपती आणि ऊर्जामंत्री होते. सुरेंदर सिंग हे त्यांचे कृषी खाते असलेले सहकारी मंत्री होते.
४. माधवराव सिंधिया (२00१), भारताचे माजी रेल्वेमंत्री.
५. संजय गांधी (१९८0), काँग्रेस नेते
६. सुरेंद्र मोहन कुमारमंगलम (१९७३), माजी लोकसभा खासदार सुरेंद्र मोहन कुमारमंगलम यांचे ३१ मे, १९७३ रोजी निधन झाले.
७. डॉ. होमी भाभा (१९६६), अणुशास्त्रज्ञ
८. लेफ्टनंट जनरल दौलत सिंग, लेफ्टनंट जनरल विक्रम सिंग आणि ‘एअर व्हाईस मार्शल’ ई. डब्ल्यू. पिंटो (१९६३), लेफ्टनंट जनरल विक्रम सिंग, लेफ्टनंट जनरल दौलत सिंग यांच्यासह भारतीय सशस्त्र दलातील सहा अधिकारी २३ नोव्हेंबर, १९६३ रोजी एका हवाई अपघातात मरण पावले.
ब्लॅक बॉक्स
‘ब्लॅक बॉक्स फ्लाईट रेकॉर्डर’ हे ‘हार्डडिस्क’ किंवा ‘मेमरीकार्ड’ प्रमाणेच मोठ्या प्रमाणात सुरक्षित ‘रेकॉर्डिंग डिव्हाईस’ आहे. ‘ब्लॅक बॉक्स’ ‘कॉकपिट’मधील संभाषणांव्यतिरिक्त सर्व संबंधित ‘फ्लाईट डेटा’ रेकॉर्ड करतो. पूर्वी हा डेटा दोन वेगवेगळ्या उपकरणांवर रेकॉर्ड करावा लागत होता.
जगभरातून ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूवर आलेल्या प्रतिक्रिया
१. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड जे. ऑस्टिन तिसरे यांनी ट्विट केले की, “या घटनेमुळे मी अत्यंत दु:खी आहे.” त्यांनी जनरल बिपीन रावत यांच्या शोकाकुल कुटुंबासाठी प्रार्थनासुद्धा केली.
२. “‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात दुःखद निधन झाल्याबद्दल आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो,” असे वरिष्ठ अमेरिकन अधिकारी म्हणाले.
३. ‘युनायटेड नेशन्स’चे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनीही अपघाताबद्दल हृदयपूर्वक शोक व्यक्त केला, अशी माहिती त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी बुधवारी दिली. २00८ आणि २00९ मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रशांती मोहिमेच्या नॉर्थ किवु ब्रिगेडचे ब्रिगेड कमांडर म्हणून जनरल रावत यांनी संयुक्त राष्ट्रांसोबत केलेल्या कामाचेही त्यांनी स्मरण केले.
४. भारतातील रशियाचे राजदूत निकोले कुडाशेव म्हणाले, “माझ्या देशाने एक जवळचा मित्र गमावला आहे.”
५. ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला.
६. भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओफॅरेल म्हणाले, “‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलिया-भारत संबंध वृद्धिंगत झाले आहेत.”