आता मानसपूजा म्हणजे काय, तेही समर्थांनी थोडक्यात सांगितले आहे. बाहेरील सर्व उपचार मनाने कल्पून अंतर्यामी असलेल्या भगवंतास अर्पण करावे. जे जे उत्तम प्रकारचे पदार्थ देवाला अर्पण करावे, असे वाटते ते सर्व कल्पनेने निर्माण करुन देवाला वाहावे, ही मानसपूजेची पद्धत आहे.दासबोधाच्या सुरुवातीलाच समर्थांनी सांगून टाकले की, या दासबोध ग्रंथात भक्तिमार्ग विशद केला आहे.
ग्रंथा नाम दासबोध। गुुरुशिष्यांचा संवाद।
येथ बोलिली विशद। भक्तिमार्ग॥ (१.१.२)
जीव ईश्वरापासून वेगळा कल्पिल्याने मायेने लिप्त झाला. जीव मुळात ईश्वराचा अंश आहे हे तो विसरला. यासाठी भक्तीच्या साहाय्याने त्याला ईश्वराशी जोडून आपली मूळ परब्रह्माची स्थिती अनुभवत स्वानंदात विलीन व्हावे, हे भक्तीचे रहस्य आहे. आपण सदैव सगुणात, बाह्यांशात वावरत असल्याने निर्गुण ब्रह्म जाणणे कठीण जाते. त्यामुळे निर्गुण-निराकार, पण चैतन्यमय ब्रह्माची कल्पना मन-बुद्धी करू शकत नाही. सद्गुरुशिवाय निर्गुण परब्रह्म अनुभवता येत नाही, असे समर्थांनी म्हटले आहे. स्वामी पुढे सांगतात की, संतसंगतीत परब्रह्माची अनुभूती घेता येते. सगुणाकडून सुरुवात करुन भक्तीच्या साहाय्याने निर्गुणापर्यंत पोहोचण्याची युक्ती संतसंगतीत अथवा सद्गुरुमुखे आपल्याला समजते. तथापि त्यासाठी सगुणोपासना समजून उमजून केली, तर सगुणापलीकडे जाता येते. मानवाला कल्पनाशक्तीचे मोठे वरदान प्राप्त झाले आहे. त्या कल्पनाशक्तीचा उपयोग यासाठी करता येतो. कल्पनेने चित्त एकाग्र करता येते आणि चित्त एकाग्र झाल्यावर ते प्रापंचिक, ऐहिक मायाजाल सोडवून त्या पलीकडची स्थिती अनुभवू शकते. अशारीतीने मन स्थिर करून ऐहिक गोष्टींच्या पलिकडील स्वानंदाची स्थिती अनुभवणे याला ‘भक्ती’ म्हणता येईल. त्यातून अखंड समाधानाची अवस्था प्राप्त करुन घेता येते. यासाठी देवाच्या भक्तीचा अभ्यास केला पाहिजे. शास्त्रात नऊ प्रकारच्या भक्ती सांगितल्या आहेत. त्यांचे विवरण दासबोधात ‘नवविधा भक्ती’ या दशकात स्वामींनी केले आहे. भक्तिमार्ग प्रकारात भगवंताच्या खरेपणाबद्दल खात्री असते. त्यामुळे भगवंताला न विसरता जीव परमात्म्याशी जोडला जातो. काही काळाने भगवंताचा साक्षात्कार होऊन त्याचे गुण भक्तात उतरतात. भक्तांची इच्छा व भगवंताची इच्छा एक होऊन जातात. हे खर्या भक्तीचे फळ आहे. भगवंताच्या भक्तीकडे म्हणजे परमार्थाकडे दुर्लक्ष करुन केवळ संसारात सुख शोधण्याचा जे प्रयत्न करतात, त्यांना स्वामींनी ‘पढतमूर्ख’ म्हटले आहे. कारण, संसारात अनेक दु:खे अनुभवूनही तो सुखाचा आहे, असे हे लोक इतरांना सांगत सुटतात म्हणून ते ‘पढतमूर्ख.’ याचा अर्थ प्रपंच सोडून द्यावा, असा नव्हे. स्वामींच्या मते, प्रपंचात दु:ख आहे, हे स्वीकारून तो शूराप्रमाणे करावा. परमार्थ करताना प्रपंच सोडून द्यावा लागत नाही. प्रपंच शांतपणे, अलिप्तपणे सुखाने करता येतो. प्रपंच करतानाही परमार्थ साधता येतो, हे स्वामींच्या विचारांचे वैशिष्ट्य आहे. स्वामी सांगतात-
प्रपंच सुखे करावा।
परी काही परमार्थ वाढवावा।
परमार्थ अवधाचि बुडवावा।
परमार्थ साधनेत भक्तीचे महत्त्व आहे. भक्तिप्रकारात, स्वामींनी देवातार्जन करावे, असे सांगितले आहे. ही अर्चनभक्ती शास्त्रोक्त पद्धतीने करावी, असेही स्वामींनी सांगितले आहे. देवाची पूजा करताना आसने, पूजेची भांडी, वस्त्रे, अलंकार यांचा वापर करावा. देव, ब्राह्मण, अग्नी, साधुसंत, संन्यासी, आत्मज्ञानी, गाय या सर्वांची पूजा करावी. देवांच्या धातू पाषाण मृत्तिका आदींच्या मूर्ती, तसबिरी, उत्तम भांडी यांचीही पूजा करावी. त्यानंतर कोणकोणत्या देवांची पूजा करावी ती नावे स्वामींनी सविस्तर सांगितली आहेत.
गणेशशारदाविठ्ठलमूर्ती। नृसिंहवामनभार्गवमूर्ती ।
रामकृष्णहयग्रीवमूर्ती। देवतार्जनीं पूजाव्या॥
नंतर केशव, माधव, नारायण आदी २४ नावे, त्याचप्रमाणे नारायणाच्या अनेक मूर्तींची नावे सांगितली आहेत. थोडक्यात, ‘ऐश्या परमेश्वराच्या मूर्ती। पाहो जाता अनंत असती।’असे सांगून सर्वांची भक्तिभावाने पूजा करावी, असे स्वामी सांगतात. स्वामींची दृष्टी सर्वसंग्राहक असल्याने कुलधर्म, कुलाचारही चालू ठेवायला त्यांनी सांगितले आहे. विविध तीर्थक्षेत्रांत जाऊन तेथील देवांचीही पूजा करावी. देवांचे वैभव वाढवावे. त्यासाठी देवाला, देवालयांना काय काय अर्पण करावे, यांची भलीमोठी यादी समर्थांनी दिली आहे. देवळाभोवती आड विहिरी, सुंदर वृंदावन, उपवन, मठ, धर्मशाळा, मोत्यांच्या माळा, हत्ती, घोडे, रथ इत्यादी देवालयांना अर्पण करावे. तसेच, अनेक पक्षी, उपयुक्त जनावरे देवालयांना अर्पण करावी, असे म्हटले आहे.
नाना पडदे चांदोवे। नाना रत्नघोष लोंबती बरवे।
नाना देेवाळई समर्पावे। हस्थि घोडे शकटे।
शुक शारिका मयोरें। बदके चक्रवाके चकोरें।कोकिळा चितळे सामरें। देवाळई समर्पावीं॥
नाना पशू, पक्षी त्याचबरोबर चितळ, सांबर याप्रकारची सुंदर हरणे देवालयांना अर्पण करावी. देवपूजेसाठी उपचार म्हणून पंचामृत, गंधाक्षता, सुगंधी फुले, अत्तरे, धूपदीप, खाद्यांचे सुंदर नैवेद्य, फळे, तांंबुल, दक्षिणा अर्पण करावी. टाळ, मृदंग इ. वाद्ये अर्पावी. त्यामुळे भक्तांच्या गायनाला साथ होते व त्यातून भगवंताबद्दल श्रद्धा उत्पन्न होते. समर्थांनी हे विधी सविस्तर सांगितले आहेत, ते सर्व वाचून, ऐकून वाटेल की, पूजन अर्चन हे भक्तिप्रकरण खूपच अवघड आहे. आपल्या आवाक्यापलीकडचे आहे. तथापि समर्थ शेवटी सांगतात की, बाहेरील या उपचाराने पूजन अशक्य वाटत असेल, तर पूजन मनाने तरी करावे. भगवंताला भाव प्रिय आहे. उपचारातील या त्याच्याच गोष्टी आपण त्याला अर्पण करतो. त्यामुळे आपला अहंभाव, आसक्ती कमी होते. यासाठी भक्ताने मानसपूजा अवश्य करावी.
ऐसी पूजा न घडे बरवी।
तरी मानसपूजा करावी।
मानसपूजा अगत्य व्हावी। परमेश्वरासी॥
आता मानसपूजा म्हणजे काय, तेही समर्थांनी थोडक्यात सांगितले आहे. बाहेरील सर्व उपचार मनाने कल्पून अंतर्यामी असलेल्या भगवंतास अर्पण करावे. जे जे उत्तम प्रकारचे पदार्थ देवाला अर्पण करावे, असे वाटते ते सर्व कल्पनेने निर्माण करुन देवाला वाहावे, ही मानसपूजेची पद्धत आहे.
मने भगवंतास पूजावें। कल्पून सर्वहि समर्पावें।
मानसपूजेचें जाणावें। लक्षण ऐसें॥
जे जे आपणांस पाहिजे। तेें तें कल्पून वाहिजे।
येणे प्रकारे कीजें। मानसपूजा॥
अनेक कारणांनी जेव्हा यथासांग पूजन शक्य नसते, तेव्हा ही मानसपूजेची पद्धत उपयुक्त आहे. कोरोनाच्या काळात आणि आजही मंदिरांतून गर्दी करणे योग्य वाटत नसेल, तर मानसपूजेचा पर्याय भक्तांसाठी खुला आहे. तेव्हा भावपूर्णतेने भगवंताचे स्मरण करुन मानसपूजा अवश्य करावी. भक्ताने भगवंताच्या पूजनाशिवाय राहू नये, असे समर्थांचे सांगणे आहे. आपल्याला जे हवे त्याची कल्पना करून उत्तम दर्जाचे पूजा साहित्य भगवंताला वाहावे. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी, ती मुख्य देवास पोहोचते. पूजाविधी व पूजेचे बाह्योपचार अनिच्छेने केले तर ते भगवंतास समजत नाही, असे थोडेच आहे? मानसपूजेत कल्पनादारिद्य्र नसावे. प्रसन्न मनाने कल्पू ते देवास वाहावे. या अभ्यासात मन सूक्ष्म होऊन भगवंत माझ्या अंत:करणात वास करुन आहे, याची जाणीव होऊ लागते. मानसपूजा साधली तर मन प्रसन्न होते, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. यासाठी सातत्याने मानसपूजा करणे जरुरीचे आहे.