तेथे कर माझे जुळती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Nandkumar Patil_1 &n
आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, आदरणीय विष्णुजी सवरा यांचं आपल्यातून असं निघून जाणं, हे मनाला चटका लावून गेलं. गेली २८ वर्षं साहेबांसोबत काम करण्याची संधी मिळाली. साहेबांना जवळून अनुभवता आलं. त्यांची काम करण्याची पद्धती, सामान्य माणसाला आपलंस करणं, जनसंपर्क, कार्यकर्त्यांच्याप्रति असलेलं प्रेम, कामाच्याप्रति ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा या सर्व गोष्टी जवळून बघितल्या. साहेबांचा शांत स्वभाव, मृदू बोलणं, समोरील व्यक्तीस आपलंस करणं, अपुरी साधन-सामग्री, तुटपुंजी व्यवस्था यामधून साहेबांनी एवढं मोठं समाजकार्य उभं केलं, अतिशय खडतर परिस्थितीत जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष उभा करण्यात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. मी ९२-९३च्या काळामध्ये पक्षाचे सक्रिय काम करू लागलो. त्याचवेळेस सन १९९५च्या विधानसभेचे काम केलं. त्यावेळेच्या वाडा विधानसभा मतदारसंघामध्ये सवरा साहेब विद्यमान आमदार म्हणून पुन्हा निवडणूक लढवून निवडूनही आले. मी माझ्या ग्रामपंचायतीचा सरपंच होतो. साहेबांचे वाड्यात एका छोट्याशा खोलीमध्ये कार्यालय होते. मी कामासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो व सर्वात मागे बसून होतो. साहेब अनेकांची कामे करत होते. मी शांत बसून होतो. साहेबांनी मला हाक मारून पुढे बोलावले, “सरपंच, पुढे या” आणि त्यानंतर शेवटपर्यंत साहेबांसोबतच राहिलो.
 
सन १९९५च्या निवडणुकीनंतर सतत साहेबांसोबत राहिलो. त्यानंतर २०००, २००४, २००९ व २०१४ या निवडणुकांमध्येदेखील साहेबांचं काम केलं. साहेब सातत्याने सहावेळा निवडून आले. १९९५च्या काळामध्ये युती सरकारमध्ये १९९९ साली साहेब कॅबिनेट मंत्री झाले. अवघ्या सहा-आठ महिन्यांचाच कालावधी त्यांना मिळाला. परंतु, इतक्या कमी कालावधीमध्येसुद्धा मंत्रिमंडळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. कातकरी वस्तीसाठी 'घरकुल योजना' राबविली. वाड्यासारख्या ग्रामीण भागात 'D+ Zone' मंजूर करून औद्योगिकीकरणाला चालना देऊन, तालुक्याचा विकास केला. भिवंडी, वाडा व मनोर रस्त्याचे चौपदरीकरण, जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रस्ते, नदीवरचे बंधारे, आश्रमशाळा यांसारखी अनेक विकासकामे त्यांनी केली. त्यानंतर २०१४ या वर्षी पुन्हा युतीचे सरकार आल्यानंतर साडेचार वर्षं मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. या कालावधीत पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी दिला. सर्वसामान्य वनवासी मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देऊन शिक्षण दिले. आपल्या समाजाप्रति असलेलं देणं साहेबांनी पूर्ण केलं. साहेबांचं काम करत असताना साहेबांनी आम्हाला घडवलं. समाजसेवेचं बाळकडू दिलं. कार्यकर्त्यांना आपलंस कसं करावं, हे त्यांनीच शिकवलं. पक्षनिष्ठा शिकवली. अनेक प्रसंगी कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा साहेब त्यांच्या घरी यायचे. साहेब जेवल्याशिवाय आम्हाला घरी जाऊ देत नव्हते. रात्री कितीही उशिरा साहेब आले तरी बाई गरम पोळी करून वाढत असत. आमच्यावर साहेबांनी पितृतुल्य प्रेम केलं. जेवण करून घरी जाण्यासाठी दुचाकी घेऊन निघालो की, बाहेर थंडी असल्याने साहेब चक्क त्यांचे मफलर व कानटोपीही द्यायचे. रात्री घरी पोहोचल्यावर साहेबांचा हमखास फोन यायचाच. अशाप्रकारे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना साहेबांनी घडविले. आज माझ्यावर पालघर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे आणि हे सर्व साहेबांमुळेच शक्य झाले.
 
खडतर परिस्थितीत काम करून पूर्वीच्या ठाणे ग्रामीण व आताच्या पालघर जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना त्यांनी वाढविली. स्टेट बँकेतील नोकरी सोडून साहेब ग्रामीण भागात काम करू लागले. घरची हलाखीची परिस्थिती असताना, घराची संपूर्ण जबाबदारी असताना, अशाप्रकारे शाश्वत नोकरी सोडून साहेब समाजासाठी काम करु लागले. दोन वेळा विधानसभेत अपयश आल्यानंतर सन १९९० पासून सतत सहा वेळा ते निवडून आले. २०१४ हे वर्ष पालघर भाजपसाठी सुवर्णकाळ होते. या कालावधीत जिल्ह्यात भाजपचे खासदार, आमदार, कॅबिनेट मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, अनेक पंचायत समित्या, ग्रामपंचायती भाजपकडे होत्या. पण, २०१९ नंतर पालघर जिल्ह्यात भाजप काहीसा मागे पडला. तेव्हा, साहेबांनी दिलेल्या आदर्शावर चालून ध्येयनिष्ठेने व पक्षनिष्ठेने वागून, आता पुन्हा या जिल्ह्यात भाजपला क्रमांक एकचा पक्ष करणे, हीच सवरा साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
- नंदकुमार पाटील
(लेखक भाजपचे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत.)
 
@@AUTHORINFO_V1@@