कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या!
- ब्रिजेश सिंह; रत्नागिरीमध्ये पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा
31-May-2025
Total Views |
रत्नागिरी, "कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे ती आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. 'एआय'मुळे पत्रकारितेच्या देखील सीमा विस्तारल्या आहेत", असे प्रतिपादन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी शनिवार, दि. ३१ मे रोजी केले.
कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत 'कृत्रिम बुद्धीमत्ता, समाजमाध्यम आणि जबाबदार पत्रकारिता विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे. पत्रकारितेतील कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे कामांमध्ये सुलभता आली आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये लाईव्ह भाषणाचे भाषांतर करता येते, असे सांगून, समाज माध्यमांमध्ये 'एआय'चा अतिरेक, कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे होणारे फायदे आणि होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले. सत्य तुमच्याकडे आहे मात्र एआय ला सत्य काय आहे हे माहीत नसते, असेही त्यांनी सांगितले.
मी स्वत: पत्रकार कुटुंबातून आलो आहे. माझे वडील अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते. शासनाने मला त्याच विभागात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शासनाचा ऋणी आहे, असेही त्यांनी सांगितले.