"विकासकामांना वेग आला की..."; धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून मंत्री आशिष शेलारांचे विरोधकांवर टीकास्त्र

    05-Jun-2025
Total Views | 7
 
Ashish Shelar
 
मुंबई : विकासकामांना वेग आला की, दिशाभूल करण्याला जोर येतो, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी विरोधकांवर केली आहे. विरोधकांकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सातत्याने होत असलेल्या विरोधाला त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले.
 
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "महायुती सरकारने धारावीच्या माथी लागलेला झोपडपट्टी हा कलंक पुसून इथल्या प्रत्येक रहिवाशांना हक्काचे मुंबईत घर देण्याचा संकल्प केला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात केवळ आश्वासने दिली आणि प्रकल्प रखडवला. आता या प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळू लागली आहे. मात्र, विरोधकांकडून जाणूनबुजून अडथळे निर्माण केले जात आहेत."
 
 
"अपात्र झोपडपट्टी धारकांनासुध्दा हक्काचे घर देणारा, मुंबईकरांना मोकळी मैदाने, बगिचा, वाहतूक हब अशा विविध सुविधा देणारा हा प्रकल्प आहे. पण स्थानिक आमदार आणि खासदारांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी लाखो धारावीकरांच्या भवितव्याशी खेळ सुरु केला आहे. अपप्रचार करुन प्रकल्पात अडथळे आणले जात आहेत. सरकारने मास्टर प्लॅन तयार केल्यानंतर आता त्या विषयी अफवा, गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र सुरु झाले आहे," असे ते म्हणाले.
 
धारावीकरांनो सावधान!
 
"धारावीकर हो, अफवा आणि गैरसमज पसरवणाऱ्यांपासून सावधान राहा. प्लॅनवर हरकती सूचना मागितल्या नाही असा गैरसमज पसरवला जात आहे. पण यावर हरकती मागवण्याची गरज नाही. विस्तृत आराखडा तयार होताना सूचना घेतल्या जातील. २००३ मध्ये काँग्रेस सरकारने डीआरपी तयार करताना सूचना मागवल्या नव्हत्या, हे वर्षाताईं गायकवाड विसरत आहेत.उलट सध्याची प्रक्रिया ही पारदर्शक असून सर्व दस्तावेज, निकष, सूचनांसाठी जनतेसमोर खुले आहेत. सध्याचा मास्टर प्लान २०२४ मधील एफएसआय आणि टीडीआर निकषांवर आधारित आहे. पण महाआघाडीच्या काळात अपात्र ठरवलेल्या नागरिकांनाही आताच्या प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार आहे. एकाही धारावीकराला बेघर केले जाणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तशी ग्वाही दिली आहे," असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121