"त्यांची इच्छा असल्यास त्यांनी..."; ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया
05-Jun-2025
Total Views | 13
मुंबई : एकत्र येण्याबाबत राजसाहेब आणि उद्धवजी बोलले तरच काहीतरी होईल. त्यामुळे आता त्यांची इच्छा असल्यास त्यांनी फोन करावा, अशी प्रतिक्रिया मनसे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी दिली आहे. उबाठा गट आणि मनसेच्या यूतीबाबात आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर त्यांनी गुरुवार, ५ जून रोजी माध्यमांशी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणूकांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. विशेषत: उबाठा गटाकडून सातत्याने या यूतीबाबत इच्छाही व्यक्त करण्यात येत आहे. परंतू, राज ठाकरेंनी अद्याप या यूतीबाबत कोणतेही भाष्य केले नाही.
दरम्यान, महाराष्ट्राच्या हितासाठी जर कुणी सोबत यायला तयार असेल तर त्यांना सोबत घेऊन आम्ही महाराष्ट्र हितासाठी लढत राहू, असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले होते. यावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, "केवळ मीडियासमोर येऊन किंवा वर्तमानपत्रांमधून युत्या होत नाहीत. राजसाहेब आणि उद्धवजी यावर बोलले तरच काहीतरी होईल. आम्ही खालचे कुणीही बोलले तरी काहीच होऊ शकत नाही. आम्ही आमचे प्रयत्न करून झालेत. कोरोना काळातसुद्धा राज साहेबांनी फोन केला होता. त्यामुळे आता त्यांची इच्छा असल्यास त्यांनी फोन करावा," असे ते म्हणाले.