महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार : संजय राऊत
05-Jun-2025
Total Views | 27
मुंबई : आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहे. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत, असे विधान उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीबाबत त्यांनी गुरुवार, ५ जून रोजी ही प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, "सरकार महाराष्ट्राचे हित पाहत नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढायचे आहे ते एकत्र येतील. मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटन उभे केले. अशा सगळ्या संघटनांनी, पक्षांनी एकत्र आलेच पाहिजे. नाहीतर मुंबई आपल्या हातात राहणार नाही. ती आताच आमच्याकडून खेचून घेतली जात आहे. आमचे नेते एका सुरात बोलत आहे की, आम्ही सकारात्मक आहोत. यावर कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहे. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या दोन नेत्यांकडूनच भविष्यात निरोप येईल," असे त्यांनी सांगितले.
सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीबाबत बोलताना ते म्हणाले की, "आमच्यासाठी सुधाकर बडगुजर यांचा विषय आता संपला आहे. कारवाई झाली आणि विषय संपला. आता त्यावर चर्चा करण्याइतपत त्या विषयाला महत्व नाही. पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते. त्या कारवाईसाठी स्थानिक पातळीवर चर्चा करू फार विचार केला जातो. त्यानंतरच अशी कारवाई केली जाते. आमच्याकडून चुकीची कारवाई होत नाही. मी म्हणजे पक्ष हे धोरण शिवसेनेत कधीच राबवले गेले नाही," असेही संजय राऊत म्हणाले.