मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एमपीएससीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी 'केवायसी' (ओळख पडताळणी) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी चार पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना चार पर्यायांपैकी एक निवडावा लागेल. पहिला पर्याय आहे आधार ऑनलाइन ई-केवायसी, दुसरा आहे आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, तिसरा आहे आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, आणि चौथा आहे नॉन-आधार ऑफलाइन केवायसी. अर्ज सादर करण्यापूर्वी ही पडताळणी करणे सक्तीचे आहे. याशिवाय, तुम्हाला फक्त एकदाच तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवावा लागेल. जर तुम्ही आधार निवडला, तर तुमचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे २०१७ पासून एमपीएससी ऑनलाइन प्रणालीत आधारचा वापर करत आहे.
फायदा काय
ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या प्रमाणिकरण करता येणार असून, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसेल. विशेष म्हणजे, विशिष्ट ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) आणि राज्य शासनाने एमपीएससीला अधिकृत मान्यता दिली असून, आता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येणार आहे.