‘२६/११’ मुंबई दहशतवादी हल्ल्याची चौकशी झालीच पाहिजे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2020
Total Views |
kasab_1  H x W:


मुंबईवरील हल्ला हे भारताविरुद्ध एक प्रकारचे युद्धच होय. मुंबईकरांनी त्याबाबत उदासीन राहणे योग्य नाही. आता केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकारे बदलली आहेत. त्यामुळे आता भूमिगत मदतनिसांचा तपास पुन्हा सुरू झाला पाहिजे.



‘२६/११’ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्या राकेश मारिया यांच्या ‘येस, लेट मी से इट नाऊ’ या शीर्षकाच्या आत्मचरित्रावरून असे दिसते की, राष्ट्रहितासाठी या हल्ल्याची नव्याने चौकशी होणे अत्यावश्यक आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे, असे कळते. मुख्यमंत्र्यांनी ती त्वरित मान्य करावी, ही अपेक्षा. एवढा मोठा सुनियोजित हल्ला स्थानिक मदतनिसांच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हता. परंतु, तरीही या हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक हस्तकांना आतापर्यंत पकडण्यात आलेले नाही. हल्ल्यात तुकाराम ओंबळे यांच्या बलिदानामुळे फक्त अजमल कसाब हा एकमेव पाकिस्तानी हल्लेखोर जीवंत सापडला. यामुळे कट पकिस्तानच्या मदतीने ‘लष्कर-ए-तोयबा’ने रचला होता, हे सिद्ध झाले.


ताज हॉटेलमधील धुमश्चक्रीत दहशतवादी सर्वत्र एखाद्या माहितगाराप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे चुकवून फिरत होते. हॉटेल मॅनेजरच्या फ्लॅटमध्ये अगदी अचूक घुसून दहशतवाद्यांनी त्याला ठार मारले. दहाही दहशतवाद्यांकडे भारतात-काही बंगळुरूमध्ये बनवलेली ओळखपत्रे होती. यावरून स्थानिक मदतनिसांचा सहभाग स्पष्ट होतो. हल्ल्याला मदत करणारे हे स्थानिक लोक देशासाठी घातक ठरू शकतात. सध्या देशात ज्या हिंसाचारी घटना घडत आहेत, त्यालाही स्लीपर सेलचे हेच सदस्य जबाबदार असण्याची शक्यता आहे. या स्थानिक मदतनिसांचा तपास सुरू करून त्यांच्यावर खटला भरण्याची नितांत आवश्यकता आहे. सुदैवाने मुंबईवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या अबू हमजा (जिंदाल) उर्फ झबिउद्दिन अन्सारी हा सध्या आर्थर रोड जेलमध्ये दुसऱ्या एका गुन्ह्याखाली शिक्षा भोगतो आहे. हल्ल्याच्या वेळी तो भारतात नव्हता. कराचीहून १० पाकिस्तानी दहशतवादी बोटीने समुद्रमार्गे निघाले, त्यावेळी त्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्यासाठी तो कराची बंदरात हजर होता. हल्ल्याच्या वेळी कराची येथे हाफीज सईदबरोबर तो सॅटेलाईट फोनवरून दहशतवाद्यांना मार्गदर्शन करीत होता. अबू हमजाने (जिंदाल) २००९मध्ये एक दिवस मुंबईतील आमदार निवासात महाराष्ट्र सरकारच्या भूतपूर्व मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौझिया खान यांच्या जागेत मुक्काम ठोकल्याचा ठोस पुरावा एटीएसकडे आहे. याने हल्ल्यामधील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या १० दहशतवाद्यांना हिंदी आणि उर्दू शिकविले. म्हणजेच हल्ल्यापूर्वी अनेक दिवस हा पाकिस्तानमध्ये होता. या अबू जिंदालकडे चौकशी केली आणि त्याच्यावर ब्रेन मॅपिंग व नार्को अॅनालिसीस टेस्ट केल्यास ‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सर्व स्थानिक मदतनिसांना अजूनही पकडता येईल.


या हल्ल्यात स्थानिक मदतनिसांचा सहभाग नव्हता, असे तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम म्हणाले आणि त्यामुळे स्थानिक मदतनिसांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला नसावा. परंतु, स्थानिक मदतनिसांच्या सहभागाशिवय इतका योजनाबद्ध हल्ला शक्य नाही, असे अनेक पोलीस अधिकारी म्हणतात. चिदंबरम यांच्या सूचनेपूर्वी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्थानिक मदतनिसांची बरीच माहिती शोधून काढली होती. ते म्हणाले होते : फहिम अहमद अन्सारी (वय ३५ वर्षे) आणि सबाहुद्दिन अहमद शब्बीर नावाच्या ‘लष्कर-ए-तोयबा’च्या हस्तकांनी हल्ले करण्याच्या सर्व ठिकाणांचे नकाशे हल्ल्याच्या बरेच दिवस आधी पाकिस्तानमध्ये पाठवले होते. त्यासाठी फहिम अन्सारी हा डिसेंबर २००७ ते जानेवारी २००८ या काळात साहिल पावसकर या नावाने गोरेगावमध्ये एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. या दोघांनी पुरवलेल्या नकाशांमुळेच दहशतवाद्यांना हव्या असलेल्या ठिकाणांवर अचूक हल्ले करणे सोपे गेले. या दोघांनी ताज महाल हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल इत्यादी १२ महत्त्वाच्या ठिकाणी टेहळणी केली होती. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी फहीम अन्सारीला पकडल्यानंतर एटीएसच्या ताब्यात दिले. तो मोतिलाल नगर, गोरेगाव, मुंबई येथे राहत असे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर भयंकर मोठा हल्ला करण्याची ‘लष्कर-ए-तोयबा’ची तयारी चालू आहे, असे अन्सारीने सांगितले. तो पाकिस्तानमधील मुझफ्फराबाद येथील प्रशिक्षण केंद्रात सहा महिने होता. फहिम अन्सारी आणि सबाहुद्दीन सिद्दिकी शेख या दोघांना पोलिसांनी पकडलेही. परंतु, पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांना सोडून दिले.


याबाबत प्रश्न असा निर्माण होतो की, पुरेसा पुरावा पोलिसांनी का मिळवला नाही? अथवा तो न्यायालयापुढे नीट का सादर केला नाही? फहिम अन्सारी आणि सबाहुद्दिन सिद्दिकी शेख यांच्या मुक्ततेमुळे, या हल्ल्यात स्थानिकांचा सहभाग नव्हता असे आपल्याला वाटते काय? असा प्रश्न विचारताच अनेकांनी संतापून त्याला नकारार्थी उत्तर दिले. उषा नावाची एक महिला म्हणाली, “न्यायालयाच्या या निर्णायाला आव्हान दिले पाहिजे आणि आणखी तपास केला पाहिजे.” भगवान थडाणी म्हणाले, “पुराव्याच्या अभावी सुटका म्हणजे आपले पोलीस किती भ्रष्ट आणि नालायक-अकार्यक्षम आहेत, तेच दाखविते. हे आपल्या देशाला लाजिरवाणे आणि देशाची प्रतिमा मलिन करणारे आहे.” ‘लष्कर-ए-तोयबा’चे सभासद असणे, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेणे, बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बाळगणे हा पुरेसा पुरावा नाही. मात्र, चार वर्षांपूर्वी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी विकलेल्या दुचाकीवर मालेगाव येथे २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला, हे एकच कारण त्यांना ८ वर्षे जामीन नाकारण्यास पुरेसा पुरावा ठरू शकतो, हे कसे? साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या महिला असूनही त्यांच्यावर त्यांच्या इच्छेविरुद्ध चार वेळा नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट्स करण्यात आल्या; तशा टेस्ट्स वरील संशयितांवर का करण्यात आल्या नाहीत?


हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे विचारतात, ‘‘हल्ल्यात सहभागी असलेला कसाब पाकिस्तानी होता, म्हणून त्याला फाशी दिली, पण स्थानिक अतिरेक्यांना का पकडले नाही?” कविताताईंनी आणखीही काही प्रश्न उपस्थित केले, ज्यांची उत्तरे देणे शासनास कठीण आहे.


अमेरिकेतील ११/९ (२००१) हल्ल्यानंतर आणि लंडनमधील ७/७ (२००५) हल्ल्यानंतर तेथील चौकशी समित्यांनी शेकडो पानांचे अहवाल लिहिले आणि ते सरकारला आणि तेथील जनतेलाही सादर केले. आपल्या सरकारने राम प्रधान समितीवर अनेक बंधने टाकून मर्यादित स्वरुपात अहवाल तयार करायला लावले. राम प्रधान यांनी गत वर्षी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सांगितले की, आमच्या समितीला शासकीय अधिकाऱ्यांनी नीट माहिती देऊ नये, असे वरिष्ठांकडून सागण्यात आले होते. राम प्रधान समितीने ६४ पानांचा अहवाल तयार केला. सरकारने त्यावरही उचित कारवाई केली नाही.


अमेरिका आणि अन्य परदेशी लोक दहशतवादाबाबात जेवढे जागरूक आहेत, तेवढे भारतीय लोक नाहीत, अशी खंत अॅड्रिअन लेव्ही आणि कॅथी स्कॉट-क्लार्क या ब्रिटिश पत्रकारांनी ‘रेडिफ’ या संस्थेला मुलाखत देताना व्यक्त केली. या द्वयीने खूप संशोधन करून ‘The Siege : The attack on the Taj’ नावाचे पुस्तक २०१३मध्ये लिहिले आणि ते ‘पेंग्विन प्रकाशन’ संस्थेने प्रसिद्ध केले आहे. दहशतवाद्यांचे दूरध्वनीवरील संभाषण, कसाबवरील खटला, शेकडो संबंधित लोकांच्या मुलाखती इत्यादी अनेक माहितीचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.


मुंबईवरील हल्ल्यात आयएसआयला मदत करणारी एक व्यक्ती दिल्लीत उच्चपदस्थ होती, असे अॅड्रिअन लेव्ही आणि कॅथी स्कॉट-क्लार्क यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. राकेश मारिया यांच्या पुस्तकाने याला पुष्टीच मिळते. त्या व्यक्तीला त्यांनी हनी बी (मधमाशी) असे संबोधले आहे. मुंबईतील मदतनिसांना त्यांनी ‘उंदीर’ म्हटले आहे. त्या मधमाशीबद्दल ठोस पुरावा नसल्यामुळे तिचे नाव दिलेले नाही, पण काही संशय व्यक्त केले आहेत आणि एक ना एक दिवस ती व्यक्ती सापडेल, असे म्हटले आहे. भारत सरकारने या मधमाशीचा आणि उंदरांचा शोध घेण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल लेखकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या मधमाशीचा शोध घेऊ, असे आश्वासन चिदंबरम यांच्यानंतर गृहमंत्रिपदावर आलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी दिले होते. परंतु, नंतर त्यांनी ते पाळले नाही.


अमेरिकेने ‘२६/११’ मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली (ऊर्फ दाऊद गिलानी) याला ३५ वर्षांची शिक्षा केली आहे. मुंबईवरील हल्ला हे भारताविरुद्ध एक प्रकारचे युद्धच होय. मुंबईकरांनी त्याबाबत उदासीन राहणे योग्य नाही. आता केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकारे बदलली आहेत. त्यामुळे आता भूमिगत मदतनिसांचा तपास पुन्हा सुरू झाला पाहिजे.

- केशव आचार्य  
 
@@AUTHORINFO_V1@@