मुंबई - २०२१ सालच्या उत्तरार्धात भारतात 5 जी सेवा उपलब्ध होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी मंगळवारी इंडिया मोबाइल कॉंग्रेस, २०२० मध्ये यासंदर्भात माहिती दिली. जिओने ऑफर केलेली 5 जी सेवा सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' धोरणाची साक्ष देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. देशात 5 जी बरोबरच जिओ कंपनी गुगलच्या सहकार्याने परवडणारे अँड्रॉइड फोन विकसित करणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये हे फोन बाजरात उपलब्ध होतील.
गेल्या काही काळापासून जिओ 5 जी नेटवर्कवर काम करत आहे. भारतात 5 जी नेटवर्क प्रत्यक्षात आणण्यासाठी कंपनी सॅमसंग आणि क्वालकॉम कंपन्यांसह काम करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जुलै महिन्यात झालेल्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानी यांनी जाहीर केले होते की, स्पेक्ट्रम उपलब्ध होताच जिओ देशात 5 जी नेटवर्कची चाचणी सुरू करेल. ऑक्टोबरमध्ये क्वालकॉम 5 जी शिखर परिषदेत, जिओने आपल्या 5 जी योजनांचा तपशीलवारपणे अभ्यास केला आणि त्याच्या 5 जी रेडिओ नेटवर्कच्या विकासाची घोषणा केली जी पुढच्या पिढीतील नेटवर्कची मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यात मदत करेल.
याविषयी अंबानी म्हणाले, “मी तुम्हाला खात्री देतो की, जिओ २०२१ च्या उत्तरार्धात भारतातील 5 जी क्रांतीचा पुढाकार घेईल. यात स्वदेशी-विकसित नेटवर्क, हार्डवेअर आणि तंत्रज्ञान घटक चालवले जातील". आपल्या 5G योजनांच्या व्यतिरिक्त, जिओ सध्या आपला एंट्री-लेव्हल 4 जी अँड्रॉइड स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी गुगलबरोबर काम करत आहे. नवीन मॉडेल पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होईल त्याची किंम अंदाजे ४ हजार रुपये असेल.