जनतेला कळले की, सध्या कोण मानसिक धक्क्यातून जात आहे. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आणि संवेदनशीलसुद्धा आहे. आघाडी सरकार बनवताना संजय राऊत उबग येईल, इतके डावपेच खेळले. हे महाराष्ट्राने हतबल होऊनच पाहिले.
त्यांच्यामुळेच तर महाराष्ट्राने नाकारलेल्या लोकांनी महाराष्ट्राला ठेंगा दाखवत पुन्हा सत्ताकारणात प्रवेश केला. मात्र, त्यानंतर श्रेष्ठींनी संजय राऊत यांना सत्तेच्या वर्तुळापासून दूरच ठेवले. त्यांना काहीच मिळाले नाही. पण संजय राऊत यांना न्याय मिळावा म्हणून कुणीही सैनिक, कुणीही सामान्य माणूस रस्त्यावर उतरला नाही की कुणीही त्यांच्या बाजूने बोलले नाही. यामुळे राऊतांना धक्का बसला, असे सगळ्यांचे मत आहे. पण त्यांचे असे का झाले? कारण स्पष्ट आहे, त्यांनी महाराष्ट्राचा केलेला विश्वासघात जनतेला बिलकुल आवडलेला नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांचे नाव अजरामरच राहणार ते बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, “राजकारण गजकर्णच असते.” साहेब अगदी बरोबर म्हणाले होते. आजच्या महाराष्ट्रातही काहीही होवो पण सत्तेवर आम्हीच असायला हवे. त्यासाठी तीनही पक्षांनी एकमेकांबद्दलचा तिरस्कार द्वेष लपवत सत्तेसाठी चालवलेली आघाडी आहे. यात जनता कुठे आहे? राजकारणात सगळेच क्षम्य असते. समाजाला नवी दिशा मिळणार असेल आणि म्हणून चौकटी मोडून राजकारण करणार असाल तर खरेच चांगले, पण ज्या राजकारणातून समाजाला फोडणार्यांना बळ मिळत असेल, ज्या राजकारणातून केवळ आणि केवळ प्रस्थापित धेंडांच्याच सात जन्माचे भले होत असेल, तर त्या राजकारणाला काय म्हणावे?
कोटातले बालमृत्यू..
राजस्थानच्या कोटा येथे जे. के. लोन इस्पितळात शेकडो बालकांचा हकनाक मृत्यू झाला. त्यावर राजस्थानचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, “प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ४ ते ५ बालक मरतच असतात. हे काही नवीन नाही.” शंभर बालके मेली याबद्दल गहलोत यांना काहीच वाटत नाही? उलट या महाशयांनी टिप्पणी केली की, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी थोडी कमी बालके मृत झाली. सीएए सारखे कायदे भारतात राबवले तर भारताचे रशियासारखे तुकडे पडतील, असे अकलेचे दिवे अशोक गहलोत यांनी पाजळले होते. भारताचे तुकडे पडण्याचे स्वप्न पाहण्याऐवजी आपली सत्ता असलेल्या राज्यात लोकांचे दुःख दूर करण्याची अक्कल गहलोत यांना असती तर? आज कोटामध्ये उमलण्याआधीच शेकडो कळ्या कोमेजल्या. यावर हायकमांडने म्हणे नाराजी व्यक्त केली, पण नाराजीच्या नाटकांनी ती बालके तर परत येणार नाहीत. मृत पावलेली बालके त्यांच्या त्यांच्या आईबाबांच्या काळजाचा तुकडाच होती. आपल्या बाळाने बरे व्हावे म्हणून मोठ्या आशेने त्यांनी बाळांना या इस्पितळात उपचाराला आणले असेल, पण इस्पितळातून त्यांना बाळाचे शव न्यावे लागले.
हे पाप कुणाचे? या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास, या इस्पितळाची पाहणी केली. त्यांच्या पाहणीचा निष्कर्ष होता की, इस्पितळाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. इथे आरोग्याच्या मूलभूत सुविधांची वानवा आहे. एकंदर सगळीच परिस्थिती बेपर्वाईची आणि निष्काळजीपणाची. आता चौकशा होतील, मृतांच्या कुटुंबीयांना अगदी मदतही दिली जाईल. पण त्यामुळे राजस्थान सरकारचे आणि तिथल्या आरोग्य खात्याचे नाकर्तेपण लपणार नाही. तसेच उत्तर प्रदेशमध्ये बालकांचा मृत्यू झाल्यावर गिधाडाने मृतदेहावर तुटून पडावे तशा प्रियांका आणि राहुल गांधीही या घटनेवर राजकारण करत होते. ते आज कुठे आहेत? राजस्थानच्या बालकांच्या मृत्यूंना काहीच किंमत नाही का? तिथली बालके, त्यांचे मातापिता यांचे दुःख, दुःख नाही? राजकारणाच्या पल्याड काँग्रेस कधी संवेदनशील होईल का? नाहीच होणार. कारण त्यासाठी देश आणि देशवासी आपले वाटावे लागतात. याबाबत काँग्रेस पक्षाच्या जाणिवा बथ्थडच आहेत. त्याचा पुरावा म्हणजे कोटातले बालमृत्यू.