नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणावरील सुनावणीवेळी मुस्लीम पक्षकारांना जोरदार झटका दिला. बुधवारी अयोध्या प्रकरणाशी संबंधित सुनावणीच्या ३१व्या दिवशी आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून (एएसआय) आपली बाजू मांडण्यात आली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने एएसआयच्या अहवालावर प्रश्न उभे करणारी बाजू पहिल्या अपिलात ऐकून घेण्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यावेळी म्हणाले की, “एएसआयच्या अहवालावर जो आक्षेप घेण्यात येत आहे, तो सुनावणीवेळी घेतला गेला नव्हता. तसेच या मुद्द्यावरील तुमची बाजू बळकट आणि ठोस नाही, कारण न्यायालय अशा प्रकरणात विशेषज्ज्ञांची समिती तयार करते, त्यावेळी त्यात काही कमतरता वा चूक असेल तर त्याबाबत सांगितले जाते.”
पुढे ते म्हणाले की, “एएसआयच्या या अहवालाबाबत त्यावेळी असे काहीही झाले नव्हते. म्हणूनच सीपीसीच्या नियम २६ नुसारही आम्ही याला इथे म्हणजे पहिल्या अपिलात ऐकू शकत नाही. दरम्यान, मुस्लीम पक्षकारांकडून एएसआयच्या अहवालावर मीनाक्षी अरोरा यांनी सुनावणीच्या वेळी समोर न आलेले आक्षेप घेतले. परंतु, सरन्यायाधीशांनी यावेळी म्हटले की, “पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी सादर केलेला अहवाल न्यायिक आयुक्ताच्या अनुसार प्रकियेनुरूपच होता. तुम्ही घेतलेले कोणतेही आक्षेप योग्य नाहीत, कारण तुम्ही पहिल्या अपिलात आक्षेप घेतले नव्हते.”
राम चबुतरा जन्मस्थान नाही : मुस्लीम पक्षकार
एएसआयसंबंधित मुद्द्याआधी सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांनी आपली भूमिका मांडली. राम चबुतरा हे श्रीराम जन्मस्थळ असल्याचे आम्ही स्वीकारलेले नाही, तर त्यावर हिंदूंची आस्था असून न्यायालयाने असे म्हटल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी मुस्लीम पक्षकारांनी राम चबुतर्याशी संबंधित सुनावणीवेळी राम चबुतर्याबद्दल निराळे विधान केले होते. पण आज बुधवारी त्यांनी आपल्या विधानावरून मजाव केले.